बुधवार, ३१ मार्च, २०१०

ई-तुका सकल संपूर्ण

ई -तुका : ७

ईतुका सकल संपूर्ण !

तुकाराम महाराज जर संगणकावर अवतरले तर आपल्याला त्यांना ई-तुका म्हणावे लागेल. पण फरक इतुकाच राहणार नाही तर बरेच नवे काही संगणक आपल्याला सांगेल.
संगणकाचे युग हे वेगाचे युग असते. संगणकावर लिहिण्याचा वेग, तो अपलोड होण्याचा वेग, तुकारामाचे अभंग डाऊनलोड करण्याचा वेग, असे सगळे वेगवान जग, प्रथम मोजते तो वेगच ! तुकाराम महाराजांना सगळ्यात अप्रूप कशाचे होते तर ते शब्दांचे. म्हणूनच ते म्हणाले होते : "आम्हा घरी धन, शब्दाची च रत्ने । शब्दाचीच शस्त्रे, यत्न करू ॥ शब्द चि आमुच्या, जीवाचे जीवन । शब्दे वाटू धन, जनलोका ॥ तुका म्हणे पाहा, शब्द चि हा देव । शब्दे चि गौरव, पूजा करू ॥" तुकाराम महारांच्या गाथेचे देहू प्रत, जोग प्रत, शासकीय प्रत वगैरे अनेक प्रती आहेत. पैकी देहू प्रत संगणकावर उपलब्ध असून ती तुकाराम.कॉम ह्या वेबसाईटवर ही पाहता येते. तुकाराम महाराजांच्या ह्या गाथेत एकूण ४५८३ अभंग आहेत. आता इतक्या प्रचंड गाथेत एकूण शब्द किती असतील बरे ? प्रत्यक्ष पुस्तकात (हार्ड कॉपी) एकेका पानावर शब्द मोजायचे म्हणजे फार जिकीरीचे काम. शिवाय संगणक युगात असं मोजत बसलं तर हसं होईल ते होईलच. संगणकाकडूनच एकूण शब्द मोजता आले तर मात्र ते आधुनिक वाटेल. तर ही प्रत वर्ड हया प्रकारात उघडून त्यातल्या वर्ड-काऊंट सवलतीचा उपयोग केला तर? करून पाहिले तर एकूण शब्द गाथेत निघाले : दोन लाख,तीन हजार आणि सातशे पन्नास ( २,०३,७५० शब्द ). संगणकावर फार विश्वास टाकता येत नाही. कधी कधी आपल्या चुकीने चुकीचे उत्तरही येऊ शकते. म्हणतातच की संगणक म्हणजे गार्बेज इन गार्बेज आऊट ( कचरा आत तर कचरा बाहेर ! ). मग ह्याचा प्रत्यक्ष प्रतीतल्या (हार्ड कॉपी) एका पानावरचे शब्द मोजले तर ते निघाले :२१५ व अशी पाने भरली ९५५. म्हणजे अंदाजे शब्द २,०५,३२५. हे संगणकाच्या वर्ड-काऊंटच्या २,०३,७५० शब्दांच्या बरेच जवळचे आहे म्हणून बरोबर असणार. आता तुकाराम महाराजांनी हे सर्व शब्द वयाच्या ४२ व्या वर्षापर्यंत लिहिलेले आहेत. साधारण विसाव्या वर्षी त्यांचे कवित्व सुरू झाले असेल असा अंदाज धरला तर २२ वर्षांचा सर्जनशील कालखंड मिळतो. भागाकार केल्यावर हे भरतात दिवसाकाठी २५ शब्द !
दिवसाकाठी २५ शब्द हा वेग प्रचंड का खूप कमी हे आता पाहू या। मागच्या वर्षी महाराष्ट्र-काव्य भूषण हा किताब मिळालेले बहु-प्रसव कवी मंगेश पाडगावकर यांचा वेग तुलना करण्यासाठी बघू. मंगेश पाडगावकरांचे समग्र साहित्य तसे त्यांच्या प्रकाशकांकडे संगणकावर उपलब्ध असणार. पण ते आपण थोड्याशा अदमासाने ताडू शकतो. त्यांच्या "गिरकी" ह्या काव्यसंग्रहात एकूण शब्द आहेत ८,८००. त्यांचे अशी एकूण पुस्तके आहेत:४५ (शेवटच्या "शब्द" पर्यंत ). तर त्यांची एकूण शब्दसंपदा भरेल अंदाजे: ४५*८८००=३,९६,००० शब्द ! आणि त्यांनी हे सर्व उभे केले वयाच्या २० व्या वर्षापासून आत्ताच्या ८२ व्या वर्षापर्यंत म्हणजे एकूण ६२ वर्षात. मग हा वेग भरतो दिवसाकाठी १७ शब्द ! सध्याच्या युगातले अगदी हातखंडा चपखल शब्द देणारे कवी सराव करतात दिवसाकाठी १७ शब्दांचा, तर ईतुका त्यांच्या दीडपट ! कवी मंगेश पाडगावकरांना ह्या तुलनेचा राग येणार नाही हे तर नक्कीच पण इथे तुकाराम महाराजांच्या प्रचंड प्रतिभेचे दर्शन घडते आणि ईतुका आकाशाएवढा हे सप्रमाण पहायला मिळते ! अगदी त्यांच्याच शब्दात " सकल संपूर्ण गगन जैसे ! "

अरुण अनंत भालेराव , १८६ / ए -१ , रतन पलेस ,गरोदियानगर ,घाटकोपर (पूर्व ) मुंबई -४०००७७ टेलिफोन : ९३२४६८२७९२

न कळे कृपावंता माव तुझी

ई -तुका : ६

न कळे कृपावंता माव तुझी !

संत तुकाराम महाराज गजल लिहीत होते असे म्ह्टले तर दचकायला होईल. पण गजलेचे तंतोतंत कसब वापरीत त्यांनी एक गजल लिहिली आहे. ही देवाच्या सर्वांठायी असण्याविषयी असून माया ( माव ) कशी आपल्याला हे समजण्या पासून वंचित करते हे सांगणारी आहे.
ह्याचे हिंदीत भाषांतर केले तर गजल सहज दिसून येते. मूळ रचना अशी :
" कवण जन्मता कवण जन्मविता ?
न कळे कृपावंता माव तुझी !
कवण हा दाता कवण हा मागता ?
न कळे कृपावंता माव तुझी !
कवण भोगता कवण भोगविता ?
न कळे कृपावंता माव तुझी !
कवण ते रूपता कवण अरूपता ?
न कळे कृपावंता माव तुझी !
सर्वां ठायी तूंचि सर्वही झालासी
तुका म्हणे यांसी दुजे नाही !
पारंपारिक अर्थ असा : हे कृपावंता, जन्मणारा कोण व जन्म देणारा कोण ? ही तुझी माया मला कळत नाही. तसेच हे कृपावंता, देणारा कोण व मागणारा कोण ? ही तुझी माया मला कळत नाही. हे कृपावंता, सुखदु:खभोक्ता कोण व भोगविता कोण ? ही तुझी माया मला कळत नाही. हे कृपावंता, रूपवान कोण व रूपरहित कोण ? ही तुझी माया मला कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, सर्वांच्या ठायी तुझी व्याप्ती आहे. तुजवाचून किंचितसुद्धा दुसरे स्थान नाही.
हिंदीत किंवा उर्दूत भाषांतर केले तर असे होईल:
कौन जनमता कौन जनमाता ?
न समझे है दयालू, माया तेरी !
कौन दाता कौन मांगता ?
न समझे है दयालू, माया तेरी !
कौन भोग लेता कौन भोग देता ?
न समझे है दयालू, माया तेरी !
कौन रूपवान कौन रूपबगैर ?
न समझे है दयालू, माया तेरी !
सबके भीतर तू हि तू है
तुका कहे दूजा स्थानही नाही !


----अरूण अनंत भालेराव
भ्रमण : ९३२४६८२७९२
३ मार्च २०१०

भारवाही तंत्राची मंत्र-गीता

ई -तुका : ५

भारवाही तंत्राची मंत्र-गीता !
माझ्या नातवंडांना जेव्हा मी त्यांच्या आई-वडिलांचे ( म्हणजे आमच्या मुलांचे ) पहिली दुसरीतले पेपर दाखवतो तेव्हा, उलटे बी, डी, त्रिकोणात उगवलेल्या फुलाचे फ्लॉवर-पॉट,वगैरे बालसुलभ चुका पाहून त्यांना खूप हसू फुटते व मग दिवसभर नातवंडे त्यांच्या आई-वडिलांची खिल्ली उडवत राहतात. आता भले ते खूप हुशार आहेत, पण लहानपणी ते ही चुका करतच शिकले होते हा बोध मग नातवंडांना होतो.
"आऊटलायर्स" नावाच्या नुकत्याच आलेल्या माल्कम ग्लॅडवेल च्या पुस्तकात तर त्याने मांडलेय की जीनीयस अशी कोणी व्यक्ति नसते तर ज्याला खूप सराव होतो, तोच मग जीनीयस होतो. आता सचिनचेच बघा ! काय प्रचंड मेहनत ! त्याची ९३ शतके झळाळतात पण त्याने किती नाना तर्‍हेचे लाखो चेंडू सरावात झेलले ते आपल्याला माहीत नसते. गणिताचे तर हे नेहमीचे ठरलेलेच आहे. जितका सराव ज्यास्त तितका गणित कमी लचका तोडते. हुसेन आता प्रसिद्ध चित्रकार आहे पण किती असंख्य सिनेमाची पोस्टर्स त्याने रंगविली असतील ते तोच जाणे. तर सरावाची महती अशी !
तुकाराम महाराजांच्या गाथेची अशीच करावी तितकी मोजदाद कमीच भरेल. दोन लाख तीन हजार सातशे पन्नास शब्द, चार हजार पाचशे चौर्‍यांशी अभंग, एकूण २५६७० खंड किंवा चौक आणि हे सगळे वयाच्या बेचाळिस वर्षाच्या आत ! प्रत्येक चौकात एक यमक जोडी म्हणजे २५६७० यमके ह्या कवीने निर्माण केली. किती सराव, कसा हातखंडा !
आता इतका हातखंडा असलेला कवी अगदी सुरुवातीला कच्चा होता, असे कोणी म्हटले तर त्याचे कोण मानणार ? कुसुमावती देशपांडे ह्या खूप विद्वान बाई. त्यांनी साहित्य अकादेमी साठी "A History of Marathi Literature" नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. त्यात तुकारामासंबंधी लिहिले आहे :His first important work was Mantra Geeta. It was written after years of suffering and spiritual contemplation.Tukaram had studied sacred works and also composed some abhangas before he attempted this interpretation of Geeta. However, it was not a work of quality of the Jnaneshwari. It is tentative, more an expression of views of Tukaram and of contemporary conditions than than an elucidation of the Geeta. It is also unsophisticated and downright in its style, with the unadorned language of everyday usage..." सरावाने कवी महाकवी होतो हे जरी आपल्याला मंजूर असले तरी ते तुकाराम महाराजांना लागू करायला धीर होत नाही. आणि आजकाल तर हा विचार आधी कोणाची कोणती जात आहे त्यावरून ठरविला जाण्याची शक्यता. जे तुकाराम भक्त आहेत ते तर लागलीच म्हणतात की हा वेगळा तुकाराम आहे. हा कोणी नगरचा तुकाराम होता देहूचा नव्हे !
खुद्द तुकाराम महाराज लीनतेने म्हणतात :फोडिलें भांडार धन्याचा हा माल । मी तंव हमाल भारवाही ॥ पण तुकाराम भक्तांना वाटते हा काही सन्मान नाही, असे कसे असेल ? पण सुरुवातीची रचना कच्ची असणे, ह्यात सरावाचा व नंतरच्या प्रतिभेचा बहुमानच आहे. शिवाय हे किती जिवंत कलाकाराचे दर्शन आहे. मला तरी वाटते, हाच खरा तुकाराम आहे, कारण ह्यात भारवाही तंत्राची मंत्र-गीताच सांगितली आहे !

--अरूण अनंत भालेराव
भ्र:९३२४६८२७९२

मौखिक परंपरेचे मुख

Friday, March 5, 2010

मौखिक परंपरेचे मुख !
तुकाराम महाराजांच्या काळी जो वारकरी संप्रदाय होता,त्याची म्हणतात मौखिक परंपरा होती. म्हणजे जे काही संप्रदायाचे ज्ञान, नियम, रीती-रिवाज होते,ते कुठे लिखित स्वरूपात नव्हते तर सर्व तोंडी होते. जसे भजन, कीर्तन वगैरे सर्व मुखाने म्हणण्याचे प्रकार होते. अशी ही मौखिक परंपरा.
त्याच वेळी दुसरा एक महानुभावी संप्रदाय होता. तो वारकर्‍यांपेक्षा प्रगत होता.पण त्यांचे साहित्य,नियम,रूढी वगैरे सर्व मोडी लिपीत लिखित स्वरूपात होते.ह्या कठिण प्रकारापायी हा संप्रदाय लवकर लयाला गेला. मौखिक परंपरेमुळे वारकरी संप्रदाय बराच टिकला, वाढला.
आपल्याला वाटते, आज जग किती पुढे गेले आहे,सगळे कसे नीट,संगतवार लिहून ठेवलेले असते. मोठमोठे करार व्यवस्थित कलमे घालून लिहून ठेवलेल्या बाडातून असतात. सगळ्यात मोठ्ठा करार कोणता ? " आय डू " किंवा "शुभ लग्न सावधान" म्हणून होणारे लग्न ! का हा मोठ्ठा करार ? कारण ह्या करारान्वये संतती निर्माण करीत लोक एक नवीन पीढी तयार करतात. ह्यापेक्षा मोठी निर्मिती ती काय ? आणि कसा असतो हा करार ? तोंडी ! आणि त्याला कायद्याच्या सर्व बाबी लागू होतात. चालू आहे ना मौखिक परंपरा !
वीस पंचवीस वर्षापूर्वी शेअर बाजार,सट्टे बाजार हे सर्व तोंडी चालत. खूप दाटी होई. दलालांना लटकण्यासाठी बस मध्ये असतात तसे चामड्याचे पट्टे असत. मोठ्ठ्याने ओरडत, खाणाखुणा करीत हे सर्व चाले.मोठ मोठे लिलाव कसे होतात ? ( आयपीएल चा लिलाव आठवा ) बोली तोंडी लावावी लागते. लिलाव करणारा म्हणतो, दस लाख एक बार, दस लाख दो बार, दस लाख तीन बार, सोल्ड ! खल्लास इकडचा बंगला तिकडे ! निवडणुकींचे,क्रिकेटचे,सट्टे फोन वरून, तोंडीच असतात.
प्रत्येक माणूस भाषा शिकतो तो आईच्या तोंडून आपल्या तोंडी, मौखिक परंपरेने. गाणी तर बोलून चालून सगळा तोंडी मामला. हुशार मुलाला शिकवाल ते तोंडपाठ असते.पूर्वी परीक्षाही तोंडी असत. अजूनही डॉक्टरीची अवघड परीक्षा तोंडीच असते. पीएचडीचे डिफेन्स नावाचे भाषण व प्रश्नोत्तरे तोंडीच असतात. ग्रेट ग्रेट गुरू, लेक्चर्स देतात तोंडी. निवडणुका जिंकल्या जातात तोंडी भाषणांनी. देश चालवल्या जातो, लोकसभेत, तोंडी. माणसाचे सर्व महत्वाचे व्यवहार, जसे, शिक्षण, प्रेम, संसार, गुजगोष्टी, आरडाओरडा, त्रागा, आवाहने, आव्हाने,ऑफिसातल्या मीटींग्ज, रस्त्यावरची गजबज, मुलांचे संगोपन, नातेवाईकांशी संवाद, वगैरे ,तोंडीच होतात. म्हणजे मौखिक परंपरा आपण अजून पाळतोय तर !
आयटी ( संगणक ) युगामुळे सगळे संगणकाच्या भाषेत सांगितले तरच लवकर कळते. मौखिक परंपरा किती महत्वाची माहीती आहे ? अहो संगणकात सगळ्यात मोठी फाईल साऊंड बाइट्सचीच होते. म्हणजे मौखिक परंपराच ग्रेट !
---अरुण अनंत भालेराव
भ्र:९३२४६८२७९२

तुकाराम आणि शेक्सपियर 1

ई-तुका:३
तुकाराम महाराज आणि शेक्स्पीयर-१
नावात काय आहे ?
सर्व मोठी माणसे एकसारखाच विचार करीत असावेत. भाषा काळ वेगळाले असले तरी मुळात विचार एकसारखे असणे शक्य आहे का ? असा विचार शेक्स्पीयर आणि तुकाराम महाराज यांचे साहित्य वाचून करण्याचे ठरविले, तर खूपच सारखेपणा आढळतो. वानगीदाखल शेक्स्पीयरचे एक प्रसिद्ध वाक्य घेऊ: "नावात काय आहे ? " मुळात हे वाक्य रोमियो-ज्युलियट मध्ये ज्युलियटच्या तोंडी असे येते:"नावात काय आहे ? ज्याला आपण गुलाब म्हणतो ते दुसर्‍या कुठल्याही नावाने तेवढेच गोड, सुवासिक लागेल . ( व्हाट इज इन ए नेम? दॅट विच वि कॉल ए रोज, बाय एनी अदर नेम, वुड स्मेल ऍज स्वीट ! )." ह्याला समविचारी मराठी वाक्प्रचार लोक देतात: नाव सोनुबाई नि हाती कथलाचा वाळा ! म्हणजेच नावात काय आहे ? हाच मतितार्थ. हेच तुकाराम महाराज म्हणतात असे म्हणतात : "तुका म्हणे राजहंस ढोरा नावें । काय तया घ्यावे अळंकाराचे ॥ ( अभंग २००६,जोग प्रत ) ." म्हणजे एखाद्या बैलाचे राजहंस असे नाव ठेवले तर ह्या अलंकारिक नावाचा त्या बैलाला काय उपयोग ? असाच मतितार्थ असणारा अजून एक अभंग आहे : "सावित्रीची विटंबना । रांडपणा करीतसे ॥ काय जाळावे ते नाव । अवघे वाव असे तें ॥ कुबेर नाव मोळी पाहे । कैसी वाहे फजीती ॥ ( १४७७,जोग प्रत ). " नाव सावित्री पण विधवा झाल्यावर त्या नावाची फजीती. नाव कुबेर पण विकतो लाकडाच्या मोळ्या . अशी नावे काय जाळायची ? शेक्स्पीयरच्या अवतीभवतीच्या सुबत्तेमुळे गुलाबासारखे गोड उदाहरण तो घेऊ शकला असेल व जीवनाच्या खडतर धबडग्यामुळे तुकाराम महाराज रोखठोक, पण जमीनीवरचे ( भले ते गोड, आशावादी नसेल ) उदाहरण घेत असतील. पण मुळातला विचार दोघांचाही सारखाच !

अरुण अनंत भालेराव
टेल: ९३२४६८२७९२

संपत्ती

ई-तुका: २
संपत्ती
कवण दिस येइल कैसा । न कळे संपत्तीचा भरंवसा ॥
चौदा चौकडिया लंकापती । त्याची कोण जाली गती ॥
लंकेसारिखे भुवन । त्याचे त्यासी पारखे जाण ॥
तेहतीस कोटी बांदवडी । राज्य जाता न लगे घडी ॥
ऐसे अहंतेने नाडिलें । तुका म्हणे वाया गेले ॥

आयुष्यभर संपत्ती कमावयाची, अपार मेहनत करायची, दिवस-रात्र एक करायचा आणि आयुष्य़ाच्या उतरणीवर कळू यावे की हे सगळे "वाया गेले !" ही केवढी मोठी शोकांतिका ! कमवायला सुरुवात करताना आदर्श ठेवायचा "दहा पिढया बसून खातील एवढे कमवायचे" हा. आणि शेवटी शेवटी जाणवते की जगराहटीत हे शक्यच होत नाही.
रावण, लंकापती, लंकेत सोन्याच्या विटा, चौदा चौकडया ( म्हणजे खूप खूप ज्यास्त !)संपत्ती, तेहतीस कोटी बांदवडी, वगैरे जाऊ द्या. आजच्या काळातली उदाहरणे घ्या. एकेकाळी किर्लोस्कर घराणे किती श्रीमंत वाटायचे. पण आता तिसर्‍या पिढीत ते साधारण-श्रीमंतच म्हणायचे. आजुबाजूच्या श्रीमंतांची दखल घेऊन बघा, तिसर्‍या पिढीतच संपत्ती कंटाळायला लागते. आणि रहाटी अशी की मग पुढची पिढी परत कर्तबगार निघते, प्रयत्न करते, व परत संपत्ती जमवावयाला लागते.
संपत्तीचे हे चक्र कोणाला न टळणारे आहे. शिवाय ती वारसां मध्ये भांडणे लावते ते निराळेच.तसे हिशोब केला तर एका माणसाला लागते तरी किती संपत्ती.सरासरी आयुष्य समजा धरले ८० वर्षांचे तर: जेवण-खाण दरमहा:१०००+कपडालत्ता दरमहा:२००+दळणवळण:५००+शिक्षण:५००+इतर:५००=एकूण रु.२७०० दरमहा कींवा पूर्ण ८० वर्षांसाठी २५ लाख रु.घर साधारण १२० वर्षे टिकेल असे धरले तर ४० लाखाचे घर ८० वर्षांसाठी पडेल २५ लाखाला.म्हणजे एका माणसाला पूर्ण
आयुष्यभरासाठी लागतात फक्त ५० लाख आणि तो आजकाल मागे ठेवतो १ कोटी. अर्थात ह्या रकमा सगळ्यांनाच सरसकट लागू होणार नाहीत पण सरासरी सुखवस्तु माणसाला लागू होतील व त्यातून हे सहजीच जाणवेल की संपत्ती शेवटी "वाया जाते !"
तुकाराम महाराज हे अहंकाराने होते असे म्हणतात ते प्रथम आपल्या ध्यानात येत नाही. आपल्याला वाटते संपत्तीचे वाया जाणे हे मोहापायी घडते आहे. मोह हा आपल्या अहंकारापायीच होत आहे ही बारीक बाब आपल्या ध्यानात येत नाही.

---अरूण अनंत भालेराव
दूरभ्रमण: ९३२४६८२७९२

मंगळवार, ३० मार्च, २०१०

तुकारामाच्या गजला

इ-तुका
तुकारामाच्या गजला:
तुकाराम महाराज गजल लिहीत असतील असं कोणी स्वप्नातसुद्धा कल्पना करणार नाही. मोंगल साम्राज्याचा शेवटचा बादशहा बहादुर शहा जफर हा जसा साम्राज्य ब्रिटिशांना हवाली करण्यासाठी प्रसिद्ध होता त्यापेक्षा कितीतरी पटींनी ज्यास्त त्याची प्रसिद्धि आहे गजलांसाठी. त्याची एक गजल पहा उदाहरणादाखल:
कहीं मैं गुंचा हूं, वाशुद से अपने खुद परीशां हूं
कहीं गौहर हूं, अपनी मौज में मैं आप गलता हूं

कहीं मै सागरे गुल हूं, कहीं मैं शीशा-ए-मुल हूं
कहीं मैं शोरे-कुलकुल हूं, कहीं मैं शोरे-मस्तां हूं

कहीं मैं जोशे-वहशत हूं, कहीं मैं महवे-हैरत हूं
कहीं मैं आबे-रहमत हूं, कहीं मैं दागे-असियां हूं

कहीं मैं बर्के-खिरमन हूं, कहीं मैं अब्रे-गुलशन हूं
कहीं मैं अश्के-दामन हूं, कहीं मैं चश्मे-गिरियां हूं

कहीं मैं अक्ले-आरा हूं, कहीं मजनूने-रुसवा हूं
कहीं मैं पीरे-दाना हूं, कहीं मैं तिफ्ले-नादां हूं

कहीं मैं दस्ते-कातिल हूं, कहीं मैं हलके-बिस्मिल हूं
कहीं जहरे-हलाहल हूं, कहीं मैं आबे-हैवां हूं

कहीं मैं सर्वे-मौजूं हूं, कहीं मैं बैदे-मजनूं हूं
कहीं गुल हूं ’जफर’ मैं, और कहीं खारे-बयाबा हूं

आता हाच अंदाज जपत ’कहीं ’ ऐवजी मराटीत ’कैं’ वापरत तुकाराम महाराजांची ही गजल पहा:
कैं वाहावे जीवन । कैं पलंगी शयन ॥
जैसी जैसी वेळ पडे । तैसे तैसे होणे घडे ॥
कैं भोज्य नानापरी । कैं कोरडया भाकरी ॥
कैं बसावे वाहनी । कैं पायीं अनवाणी ॥
कैं उत्तम प्रावर्णे । कैं वसने ती जीर्णे ॥
कैं सकळ संपत्ती । कैं भोगणे विपत्ती ॥
कैं सज्जनाशी संग । कैं दुर्जनाशी योग ॥
तुका म्हणे जाण । सुख दु:ख तें समान ॥
इथे आपल्याला फक्त रचनेचे साधर्म्य आणि कही व कैं हे सारखे शब्द एवढेच जाणवत नाही तर आशयात सुद्धा जो सारखेपणा आहे त्याचे आश्चर्य वाटते. तुकाराम महाराज जसे कधी सुख तर कधी दु:ख असे म्हणतात तसेच जफर म्हणतात, कधी कृपेची वर्षा ( आबे-रहमत ) आहे तर कधी पापाचा कलंक ( दागे-असियां ).तुकाराम महाराजांचा "सज्जनाशी संग" हाच जफरचा "शोरे-कुलकुल" आहे तर "दुर्जनाशी योग" हा " शोरे-मस्तां " ( वेडयांचा गदारोळ)
आहे. जफरच्या गजलेत कधी काय आहे तर कधी काय आहे याचे वर्णन आहे तर त्यापुढे जाऊन तुकाराम महाराज म्हणतात की कधी सुख आहे तर कधी दु:ख आहे व ते तुम्ही समान जाणा, माना.