शुक्रवार, १६ एप्रिल, २०१०

धावता अभंग

ई-तुका : १२
धावता अभंग , धाव
बॅंकॉकला असताना तिथल्या लुंपीनी गार्डन मध्ये एकदा एक अनोखा संगीत प्रकार ऐकायला मिळाला होता. तिथे दर रविवारी बॅंकॉक-सिंफनी नावाचा प्रसिद्ध ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ५ ते ८ वेगवेगळे संगीत ऐकवतो. आपल्याकडे जसे काही मंदीरातून गायक देवाला सेवा म्हणून गातात तसाच हा लोकांना अर्पण करण्याचा प्रकार तिथे खूप वर्षांपासून सुरू आहे. अभिजात संगीताची जाण ह्याने जन-सामान्यांना पोंचते. तर एका रविवारी ते दाखवीत होते की संगीत-दिग्दर्शकाचे वेगवेगळे मूडस संगीतातून कसे पहायला मिळतात. जसे दिग्दर्शक रागावलेला असेल तर संगीत कसे जोर जोरात व वेगळ्या लयीत वाजते.
असेच तुकाराम महाराजांनी एक अनोखा प्रकार केला आहे. धाव किंवा धावता अभंग. असे एकूण ३४ अभंग गाथेत आढळतात. हे अभंग अगदी धावत्या चालीत व जणु आपण धावतच म्हणत आहोत अशा लयीत केलेले आहेत. हे जरा धावत्या चालीत म्हणून बघा म्हणजे ह्या शैलीची प्रतीती येईल व तुकारामाला धावती भेट दिल्यासारखेही होईल. ( नेऊरगावकर प्रतीत अभंग क्रमांक ७१३ ते ७४५ ह्यात "धाव" ह्या शीर्षकाने हे अभंग दिले आहेत. इथे फक्त दोनच वानगीदाखल देत आहे ):

आळस आला अंगा । धांव घाली पांडुरंगा ॥ सोसू शरीराचे भाव । पडती अवगुणांचे घाव ॥ करावी व्यसनें । दुरी येउनि नारायणे ॥ जवळील दुरी । झालो देवा घरी करी ॥ म्हणवुनि देवा । वेळोवेळा करी धांवा ॥ तुका म्हणे पांडुरंगा । दुरी धरूं नको अंगा ॥


इथे क्लिक करा व ऐका

येगा येगा पांडुरंगा । घेई उचलुनि वोसंगा ॥ ऐसी असोनिया वेसी । दिसतो मी परदेशी ॥ उगवूनि गोवा । सोडवूनि न्यावे देवा ॥ तुज आड काही । बळ करी ऐसे नाही ॥ तुका म्हणे ऋषिकेशी । काय उशीर लाविलासी ॥


इथे क्लिक करा व ऐका

------
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

बुधवार, १४ एप्रिल, २०१०

निर्मळ तुका, तमिळ तुका

ई-तुका : ११
निर्मळ तुका, तमिळ तुका
परवा आय आय टी पवईला गणेशकुमार ह्यांचे मराठी अभंग विषयावर एक भाषण होते. अभंगाचे हे लेक्चर-डेमोंन्स्ट्रेशन होते. त्यादरम्यान त्यांनी काही माहीती सांगितली ती थक्क करणारी आहे. हे गणेशकुमार चेंबूरच्या फाइन आर्टस सोसायटीचे अध्यक्ष असून त्या संस्थेत गायन वादन नृत्य वगैरे कलांचे ९०० विद्यार्थी शास्त्रोक्त शिक्षण घेत आहेत. त्यांना पंढरपूर देवस्थानाने "अभंग-रत्न" हा किताब दिलेला आहे. ते वामनराव पै चे मोठे भाऊ मोहनराव पै ह्यांचे शिष्य आहेत. त्यांनी सांगितले ते असे:
१) सर्वात मोठ्ठे विठ्ठल मंदीर भारतात कांचीपूरम येथे आहे. तिथे विठ्ठलाची १२ फूट उंचीची मूर्ती असून इतर संतांच्या १० फुटी मूर्ती आहेत. संपूर्ण पंढरपूरच्या देवळाची आसपासची प्रतिकृतीही केलेली आहे.
२) तंजावरचा दक्षिण भजन संप्रदायात हटकून मराठी अभंग म्हटले जातात। तिथल्या गायकांना दोन तरी मराठी अभंग म्हणावेच लागतात.
३) त्यांच्याकडची हरिकथा पद्धती म्हणजेच प्रवचनाचा एक प्रकार आहे.
४) एकदा मलेशियाला गेले असता त्यांना तिथल्या स्थानिक मंडळींनी अभंग म्हणायचा आग्रह केला तर काय आश्चर्य तिथले २०० लहान मुले "सुंदर ते ध्यान" व्यवस्थित म्हणत होते. देश वेगळा भाषा वेगळी पण अभंग तेच मराठी.
५) प्रसिद्ध तमिळ संगीतगुरू त्यागराज ह्यांच्या समाधी मागेच विठ्ठलाचे मंदीर आहे.
६) सर्वात ज्यास्त लोकप्रिय मराठी अभंग तामिळ नाडूत म्हटले जातात.
म्हणूनच वाटते, निर्मळ तुका आता तमिळ तुका झाला आहे !

अरूण अनंत भालेराव
भ्रमण: ९३२४६८२७९२

शनिवार, ३ एप्रिल, २०१०

तुकारामाच्या गजला

ई-तुका: १०
तुकारामाच्या ग़जला
ही एक बहादुरशहा ज़फरची ग़जल पहा:

रहता ज़ुबां पे आठ पहर किसका नाम है
करता है यह जो दिल में असर किसका नाम है
हमको किसी के ऐबो-हुनर की खबर नहीं
कहते हैं ऐब किसको, हुनर किसका नाम है
बदनाम है जहां में "ज़फर" जिनके वास्ते
वो जानते नहीं कि "ज़फर" किसका नाम है
इथे ज़फर काही प्रश्न विचारात आहे : जिभेवर आठ प्रहर कोणाचे नाव असते ? ह्या ह्रदयावर जो परिणाम करतो ते कोणाचे नाव आहे? आम्हाला कोणाच्या कला कुसरीची माहीती नाही, कशाला कला म्हणतात, वा कसब कशाचे नाव आहे?. ज्यांच्यामुळे जगात ज़फर बदनाम झाला आहे त्यांना माहीत नाही की ज़फर कोणाचे नाव आहे ?
आता तुकारामाचा हा अभंग बघा :
हेचि माझे तप हेचि माझे दान
हेचि अनुष्ठान नाम तुझे
हेचि माझे तीर्थ हेचि माझे व्रत
सत्य हे सुकृत नाम तुझे
हाचि माझा धर्म हेचि माझे कर्म
हाचि नित्यनेम नाम तुझे
हाचि माझा योग हाचि माझा यज्ञ
हेचि जपध्यान नाम तुझे
हेचि माझे ज्ञान श्रवण मनन
हेचि निजध्यासन नाम तुझे
हाचि कुळाचार हाचि कुळधर्म
हाचि नित्यनेम नाम तुझे
हा माझा आचार हा माझा विचार
हा माझा निर्धार नाम तुझे
तुका म्हणे दुजे सांगायासी नाही
नामेविण काही धनवित्त
ग़जलेच्या मुख्य लक्षणात एक लक्षण आहे की प्रत्येक दोन ओळींचा शेर आपल्या आपण स्वतंत्र उभा राहू शकला पाहिजे. ग़जलेतल्या इतर ओळींची त्याला मदत लागली न पाहिजे. ही अट तुकारामाचा हा अभंग सहजी पुरी करतो. शिवाय ग़जलेची अजून एक अट असते की पहिल्या ओळीत जो विषय मांडला जातो ती त्या विषयाची प्रस्तावना, आणि ती दुसर्‍या ओळीत शिगेला पोचली पाहिजे. ही शीग त्या विषयाचा शिखर गाठणे, क्लायमॅक्स गाठणे, पलट मारणे, टर उडवणे अशीही असू शकते. वानगीदाखल पहा: तुझे नामस्मरण हाच माझा धर्म आहे, कर्म आहे ही झाली प्रस्तावनेची पहिली ओळ. तर दुसर्‍या ओळीत त्याचा परमोच्च आहे, हाच माझा नित्यनेमही आहे ! असेच धोरण सर्व अभंगात आहे.
परंपरेने अभंगात चार चरण असतात. पहिले चरण सहा अक्षरांचे ( ह्या चरणा शेवटी यमक नसते ) , दुसरे चरण सहा अक्षरांचे, तिसरे चरण सहा अक्षरांचे ( दुसर्‍या व तिसर्‍या चरणाशेवटी यमक असावे लागते ) व चौथे चरण चार अक्षरांचे ( शेवटी यमक नसते. ) . ( सोयीसाठी चार चरण दोन ओळीत मांडले आहे कारण लहान अभंग तसाही लिहितात.). आता ग़जल मध्ये दुसर्‍या ओळीनंतर यमक आवश्यक. परंपरा मोडून तुकाराम महाराज चौथ्या चरणांती "नाम तुझे" हे यमक योजतात हे लक्षणीय आहे आणि ग़जलाच्या वळणाचे आहे. ग़जलच्या पाच किंवा सहा शेरापैकी पहिला शेर ( ह्याला मतला म्हणतात ) मध्ये दोन्ही ओळीशेवटी यमक ( क़ाफिया व रदीफ ) असते पण तुकारामांना अभंगातली दुसर्‍या तिसर्‍या चरणांती असलेल्या यमकाची परंपरा मोडणे प्रशस्त वाटले नसावे. तरीही त्यांनी "तुका म्हणे दुझे " हे "नाम तुझे" ला जुळणार यमक शेवटच्या शेरात जोडले आहे तसे त्यांना सुरुवातीला "हेचि दान माझे" असे जराशा फरकाने सहज जमते.ते केले तर ग़जलेची तांत्रिक बाजूही सांभाळल्या गेली असती. ग़जलेत शेवटी तख़ल्लुस वापरावे लागते ( जसे "ज़फर") .ते अभंगात तुकाराम महाराज वापरतातच ( जसे: "तुका म्हणे").
आणि मोठ्ठा योगायोग म्हणजे ज़फरने विचारावे "किसका नाम है" आणि तुकारामांनी म्हणावे "नाम तुझे" हे एक प्रकारे संवादीच वाटते आणि खात्री पटते की ही तुकाराम महाराजांची एक ग़जलच आहे.

अरुण अनंत भालेराव
भ्रमण : ९३२४६८२७९२

शुक्रवार, २ एप्रिल, २०१०

तुकाराम आणि शेक्सपियर 3

ई-तुका: ९

तुकाराम आणि शेक्स्पीयर:(३)

शिर्डीच्या साईबाबांचे प्रसिद्ध वचन आहे :"सबूरी का फल मीठा ". ह्याच सबूरीबद्दल रविंद्रनाथ टागोरांनी म्हटलेय की "वि आर टू पुअर टु वेट ( आपण सबूरी राखू शकत नाही इतके गरीब आहोत )." ऑथेल्लो ह्या शेक्स्पीयरच्या नाटकात असेच एक प्रसिद्ध सुभाषित येते : "हाऊ पुअर आर दे दॅट हॅव्ह नॉट पेशन्स" ऑथेल्लो नाटकात इऍगो हे पात्र डेस्डेमोनाला ऑथेल्लो पासून खलनायक रॉड्रीगोला मिळवून देण्याचा कट रचतो. पण उतावीळ होऊन रॉड्रीगो लवकरच व्हेनिसला परततो व त्याला डेस्डेमोना मिळत नाही, असा ह्या वचनाचा संदर्भ आहे. अधीर असणे ह्या दोषामुळे शेक्स्पीयरच्या बर्‍याच पात्रांना अपयश येते असे दाखवण्यात येते. धीराचे महत्व सांगणार्‍या ह्या वचना पुष्ट्यर्थ शेक्स्पीयर म्हणतो की, "असा कोणता घाव आहे जो थोडा थोडा न भरता एकदम मिळून येतो ?". अर्थातच शेक्स्पीयरच्या काळातली युद्धसदृष्य परिस्थिती तुकाराम महाराजांच्या काळी नसावी म्हणून धीराचे महत्व ते वेगळ्या उदाहरणांनी सांगतात. "तुका म्हणे धीरा । विण कैसा होतो हिरा ॥". इथे हिरा कसा तयार होतो हे जाणावे लागते. पृथ्वीच्या आत खोल थरात असा प्रचंड दाब यावा लागतो की कार्बन असलेल्या वस्तू "हिरा" होतात. जुन्या चित्रपटात खाणींची दृश्ये आठवून पहा. ह्या हिरा होण्याच्या प्रक्रियेत प्रचंड काळ वाट पाहणे व दाब सोसणे ह्या सद्‍गुणांचा निर्देश तुकाराम महाराज असा करतात, ( फळाची वाट पाहण्यासाठी धीर धरावाच लागतो असे ते एका अभंगात असे म्हणतात) :"फळ कर्दळी सेवटी येत आहे । असे शोधिता पोकळीमाजी काये ॥ धीर नाही ते वाउगे धीर झाले । फळ पुष्प ना यत्न ते व्यर्थ गेले ॥". केळीच्या झाडास केळी व फूल अगदी शेवटी येणार. त्या अगोदर उतावीळपणा करून सर्वत्र उपटले तर सर्व व्यर्थच जाणार. हेच प्रमेय ते एके ठिकाणी असे देतात : "धीर तो कारण । साह्य होतो नारायण ॥". धीर धरणार्‍या सृष्टीतली काही मनोज्ञ उदाहरणे तुकाराम महाराज अशी देतात : "धीर तो कारण एकविध भाव । पतिव्रते नाहो सर्वभावे ॥ चातक हे जळ न पाहती दृष्टी । वाट पाहे कंठी प्राण मेघा ॥ सूर्यविकसिनी नेघे चंद्रामृत । वाट पाहे अस्त उदयाची ॥ धेनू येऊ नेदी जवळी आणिका । आपुल्या बाळकाविण वत्सा ॥ तुका म्हणे नेम प्राणां संवसाटी । तरीच माझ्या गोष्टी विठोबाच्या ॥ ( १३२१, जोग प्रत ) ." असं म्हणतात की, चातक हा पक्षी प्रत्यक्ष पडणार्‍या पावसाचेच थेंब पितो, इतर पाण्य़ाकडे बघत नाही. त्याचे हे वाट पाहणे अगदी धीराचे आदर्श उदाहरण आहे. जी कमळे सकाळी उमलतात ती रात्रीचे चांदणे सोडून सकाळच्या सूर्योदयाची वाट पाहतात. गाय इतर वासरांना दूध न देता आपले वासरू लुचायला येण्याची वाट पाहते. धीराचा मूलमंत्र अजून एका ठिकाणी तुकाराम महाराज असा देतात : " चरफडे चरफड शोकें शोक होये । कार्यमूळ आहे धीरापाशी ॥" किंवा "धीर शुद्धबीजें गोमटा तो । ". धीराचा महिमा हा कसा वैश्विक आहे हेच जणुं इथे तुकाराम व शेक्स्पीयर मिळून सांगत आहेत.

---अरूण अनंत भालेराव
भ्रमण: ९३२४६८२७९२

गुरुवार, १ एप्रिल, २०१०

तुकाराम आणि शेक्सपियर 2

-तुका :
तुकाराम आणि शेकस्पीयर --

असेच एक प्रसिद्ध सुभाषित आहे, शेक्स्पीयरचे, "चमकते ते सर्व सोनेच नसते"(ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड). मर्चंट ऑफ व्हेनिस (ऍक्ट २ सीन ७) ह्या नातकातल्या ह्या वाक्याचा संदर्भ मजेशीर आहे. पोर्टियाचे स्वयंवर असते. तिच्या बापाच्या मृत्यूपत्राबरहुकूम. तीन परडया असतात. एक सोन्याची,एक चांदीची, नि एक शिसाची. परडीत पोर्टियाचे चित्र निघाले तर तो राजपुत्र तिला वरणार. मोरोक्कोच्या राजपुत्राला वाटते हिचे चित्र सोन्याच्या परडीतच असणार. तो सोन्याची परडी उचलतो. पण त्यात पोर्टिया ऐवजी मरणाचे चित्र असते व ओळी असतात : "ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड;ऑफन हॅव यू हर्ड दॅट टोल्ड; मेनी ए मॅन हिज लाइफ हॅथ सोल्ड; बट माय आउटसाइड टु बिहोल्ड; गिल्डेड टूम्ब्‍स डू वर्म्स एनफोल्ड ". राजपुत्र तिथून पळ काढतो व पोर्टिया म्हणते : ए जेंटल रिडन्स ! ( कटकट गेली!). सुभाषिताचा रूढ मतितार्थ आहे की सोन्यासारखे चमकणारे दिसत असले तरी सगळेच सोने नसते. म्हणचे खर्‍या खोटयाचा निवाडा नीट समजून उमजून करावा. ह्याच थेट अर्थाचे तुकाराम महाराजांचे वचन आहे : "तांबियाचे नाणे न चले खर्‍या मोलें । जरी हिंडवले देशोदेशी ॥". अजून एका अभंगात असेच आहे: "सोने दावी वरी तांबे तया पोटी । खरियाचे साठी विकू पाहे ॥ पारखी तो जाणे तयाचे जीवीचे । निवड दोहींचे वेगळाले ॥ क्षीरा नीरा कैसे होय एकपण । स्वादी तोचि भिन्न भिन्न काढी ॥ तुका म्हणे थिता आपणचि खोटा । अपमान मोठा पावईल ॥ ( ५४५ जोग प्रत )." थोडासा फरक करीत अशाच अर्थाचे अजून एक वचन आहे : " सोनियाचा कळस । माजी भरिला सुरा रस ॥ काय करावे प्रमाण । तुम्ही सांगा संतजन ॥ मृत्तिकेचा घट । माजी अमृताचा सांठ ॥ तुका म्हणे हित । ते मज सांगावे त्वरित ॥ ( ६७३ जोग प्रत )." इतक्या थेट, सारख्या विचाराचे असणे पाहून आसमंतातच असे सारखे विचार असतात की काय असा संशय यावा. कारण त्या काळात दळणवळण अगदी नगण्य आणि तरीही विचार पहा थेट ताजे आणि शेक्स्पीयरीयन ! भारतात आज जगाच्या एकूण सोन्याच्या उत्पादनातले जवळ जवळ ६० टक्के सोने वापरले जाते. आणि हे पूर्वापार चालत आलेले आहे. त्यामुळे शेक्स्पीयरपेक्षा तुकाराम महाराजांना सोन्यासंबंधी ज्यास्त जाण असणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे सोन्यासारखे चकाकणारे पितळ व खरे सोने ह्यासंबंधी तुकाराम महाराज सांगतात : "काळकूट पितळ सोने शुद्ध रंग । अंगाचेच अंग साक्ष देती ॥". म्हणजे पितळ हे जरी पिवळे आहे तरी कलंकाने काळेकुट्ट होते; आणि सोने हे पिवळे असून निरंतर शुद्ध राहते.

अरुण अनंत भालेराव
भ्र: ९३२४६८२७९२