रविवार, ४ जुलै, २०१०

तुकयाची व्वाही 3

तुक्याची ग्वाही-३
"कोणी निंदा कोणी वंदा । आम्हा स्वहिताचा धंदा ॥" (क्षेपक-२३,जोग प्रत)
एक प्रसिद्ध गोष्ट आहे. एक मुलगा व त्याचा बाप घोडा घेऊन जात असतात. मुलाला वाटते वडील म्हातारे आहेत, त्यांनी घोडयावर बसावे. मुलगा पायी जातो. लोक म्हणायला लागतात, बघा या बापाला काही आहे का ? स्वत: घोडयावर बसलाय व मुलगा पायी. मग बाप उतरतो व मुलाला घोडयावर बसवतो. आता लोक म्हणायला लागतात, पहा म्हातार्‍याला पायी चालवतोय व स्वत: घोडयावर बसलाय. शेवटी दोघेही कंटाळून पायीच चालतात. तरी लोक म्हणतात पहा मूर्ख बाप-लेक, घोडा रिकामा चालवताहेत व स्वत: पायी चाललेत. तर लोकांच्या अशा बोलण्याकडे लक्ष देण्यात अर्थ नसतो. ज्यांना आपले स्वहित साधायचे असते त्यांनी लोकांच्या बोलण्याला महत्व द्यायचे नसते. स्वहित साधणे हाच धंदा समजून नेटाने , नियमित प्रयत्न चालू ठेवायचे असतात. कोणी निंदा केली तरी त्याने खिन्न व्हायचे नसते व कोणी मान दिला तरी त्याने हरखून जायचे नसते.


अरूण अनंत भालेराव
भ्र:९३२४६८२७९२ ( arunbhalerao67@gmail.com)

तुकयाची ग्वाही 2

तुक्याची ग्वाही-२
"स्वहिताची चाड । ते ऐका हे बोल । अवघेचि मोल । धीरा अंगी ॥
सिंपिले ते रोप वरीवरी बरे । वाळलिया पुरें कोंभ नये ॥
तुका म्हणे टाकीघायें देवपण । फुटलिया जन कुला पुसे ॥" ( जोग प्रत:२१०२)
सर्व प्रयत्नांचे, कामाचे, प्रोजेक्टचे, प्रबंधाचे रहस्य व मोल "धीर" व नेटाने प्रयत्न करणे हे आहे. आणि आपल्याला आपल्या हिताची काळजी असेल तर हे "धीर" जपणे अगत्याचे आहे. ह्यालाच आधुनिक व्यवसाय मार्गदर्शक "फोकस" असे म्हणतात. सर्वसाधारण व्यवहारातले उदाहरण देत तुकाराम महाराज म्हणतात, जसे काही हेळसांड होऊन रोप वाळले तर मग त्याला पुन्हा कोंभ उगवणार नाही. म्हणून रोपाला नियमीत, वरचेवर, पाणी द्यावे लागते. एखादा मूर्तिकार दगडाला छिन्नी लावून, त्याला तासून, नेटाने मूर्तीचा आकार प्रकट होईपर्यंत टाकीचे घाव देत राहतो तेव्हाच त्यातून देवपण ( देवाची मूर्ती ) प्रकट होते. ते काम मध्येच अर्धवट सोडून दिले तर तो एक कुचकामाचा दगड समजून लोक त्याला शी पुसतील.( पूर्वी पाण्याच्या दुर्भिक्षामुळे अशी रीत होती.). तेव्हा स्वहिताचा विचार करायचा तर नेटाने, धीराने, फोकस ठेवून प्रयत्न चालू ठेवावे लागतात तेव्हाच देवपण येते.

अरूण अनंत भालेराव
भ्र:९३२४६८२७९२ ( arunbhalerao67@gmail.com)

तुकयाची ग्वाही 1

तुक्याची ग्वाही-१
"चित्त ग्वाही तेथे लौकिकाचे काई ।
स्वहित ते ठायी आपणापें ॥" ( जोग प्रत: ५५०)
ग्वाही म्हणजे साक्ष देणे, हमी देणे, ग्यारंटी देणे. आपण आजूबाजूला नेहमी पाहतो की सर्वांसमक्ष मारामारी, लूट, खून झालेला असतो, पण कोणी साक्ष द्यायला पुढे येत नाही. कारण असते, नसत्या लचांडाचे. उपदेश देण्यातही असेच असते.बघा बुवा, करून पहा, गुण येईल असे सांगणारे, मोघम सांगतात व त्यामुळे ऐकायला बरे वाटले तरी फारसे आपण त्या वाटेला जात नाही.पण संतांचे तसे नसते. त्यातही तुकाराम महाराज हे स्वत: साधक राहून, सामान्य माणसाचे हाल सोसून, संतपदी पोहोचलेले. त्यांच्या सर्व शिकवणुकीत अगदी कळवळा असतो तो माणसाला "स्वहित" कसे साधता येईल,त्याचा. अध्यात्म सांगते परोपकाराच्या गोष्टी पण इथे तुकाराम महाराज सांगत आहेत, त्या स्वहिताच्या गोष्टी.अगदी स्वार्थ म्हटले तरी हरकत नाही. आणि ते म्हणत आहेत की तुमचे स्वहित कशात आहे ते तुमच्या मनाशिवाय, चित्ताशिवाय दुसरे कोण अधिक जाणेल बरे ? लोक काय म्हणतील किंवा लौकिकाची चाड धरण्याचे काही कारण नाही. आपल्या स्वहितासाठी आपले चित्तच साक्षी ठेवावे व त्याप्रमाणे वागावे. बरे हे सांगणे अगदी आधुनिकतेचे आहे. कारण आजकाल मोठमोठ्या कंपन्यातल्या अधिकार्‍यांना त्यांचे मालक विचारतात "तुमचे गट फीलींग काय आहे". हीच आहे "चित्ताची ग्वाही !"