मंगळवार, २४ ऑगस्ट, २०१०

तुकयाची ग्वाही 6

तुक्याची ग्वाही-६
"तुका म्हणे हित होय तो व्यापार । करा काय फार शिकवावे ॥" ( ७६,जोत प्रत)
तुकाराम महाराज व्यवसायाने वाणी होते म्हणून त्यांनी व्यापाराचे उदाहरण द्यावे, हे खूपच साहजिक आहे. व्यापारात कसा माणूस नुकसान होत असेल, तर साहजिकच थोडया वेळाने तो धंदाच बदलतो, बंद करतो. तसेच इथे तुकाराम महाराज म्हणत आहेत की जिथे आपले हित होत नसेल ते प्रयत्न , ते काम, माणसाने सोडून द्यावेत. उगाच नुकसान करणार्‍या व्यापात माणसाने आपले आयुष्य खर्ची घालू नये. चित्त शुद्ध करावे, देवाचे चिंतन करावे, व असे आपले स्वहित पहावे.व्यापार करण्याच्या ह्या उपदेशात थोडे उदारीकरण करून असे जर पाहिले की असा धंदा करावा की ज्यात सगळ्यांचेच हित होईल, तर तो एक अप्रतीम असा सल्ला होईल.लोकांना चार घास मिळावेत म्हणून शेतकर्‍यांनी शेती करावी, तोच भाव मनी ठेवून वाणी लोकांनी त्याचा व्यापार करावा,खाणार्‍याचे आरोग्य चांगले राहील ह्या हिताच्या दृष्टीने खाण्याचे पदार्थ करणार्‍यांनी काळजी घ्यावी, असा सर्वंकश हिताचा विचार केल्यानेच "हिताचा व्यापार" होईल.

अरूण अनंत भालेराव
भ्र:९३२४६८२७९२ ( arunbhalerao67@gmail.com)

मंगळवार, १७ ऑगस्ट, २०१०

तुकयाची ग्वाही 5

तुक्याची ग्वाही-५
"आपुलाले हित आपण पाही । संकोच तो न धरी काही ॥ "(३१,जोग प्रत)
सामान्य माणसाला व्यवहारात कसे वागावे ही शिकवण तुकाराम महाराज फार छान देतात. एक माणूस तेल-घाणी चालविणार्‍या तेलणीशी रुसला व तिच्याकडून तेल कसे आणायचे ह्या संकोचापायी कोरडेच खाऊ लागला. आता तिच्याशी भांडण झालेय म्हणून बिना तेल कोरडेच खाणे ह्यात आपले काहीच हित नाही. तसेच एक बाई दुसर्‍याला अपशकून करण्यासाठी स्वत:चे डोके भादरून घेते ह्या रागात तिचे काय हित आहे बरे? एका माणसाने घरात पिसवा खूप झाल्या म्हणून घरालाच आग लावून दिली. ह्यात त्याचे घर जळाले, दुसरे काही हित झाले काय ? एका स्त्रीने लुगड्यात खूप उवा झाल्या म्हणून लुगडेच फेडले तर त्यात तिचीच फजीती आहे. ह्या सर्व व्यवहारातल्या प्रसंगी राग व भावनेच्या आहारी जावून व कसलाही संकोच बाळगून माणसाचे हित होत नाही अशी शिकवण इथे तुकाराम महाराज फार खुबीने देत आहेत.


अरूण अनंत भालेराव
भ्र:९३२४६८२७९२ ( arunbhalerao67@gmail.com)

बुधवार, ११ ऑगस्ट, २०१०

तुकारामाचे हाँट डाँग

तुकारामाचा हॉट डॉग !
मला वाटायचे की काही चित्रांमध्ये अंगभूत गुण असणार व त्यामुळे देश काल बदलला तरी त्याची जाणीव फार बदलू नये. पण नुकताच मला ह्याच्या विरुद्ध अनुभव आला.
माझ्या नातवंडांना मी अभिमानाने सांगत होतो की मी मराठीत तुकारामावर ब्लॉग लिहितो व तुमच्या सोयीसाठी आजकाल मी त्याचे इंग्रजी भाषांतरही देतो. झाले दहा वर्षाच्या नातवाने लगेच ब्लॉग उघडला व तुकारामाचे चित्र पाहून तो मला विचारायला लागला की "हा गाय हॉट डॉग विकतो आहे काय ?". तुकारामाच्या हातातल्या चिपळ्या त्याला हॉट डॉग सारख्या दिसत होत्या. मला लगेच प्रायश्चित्त म्हणून स्नान करावे की काय असे वाटले. तुकाराम महाराज बिचारे भारतातच बरे !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

मंगळवार, १० ऑगस्ट, २०१०

तुकयाची ग्वाही 4

तुक्याची ग्वाही-४
"आपुल्या हिता जो होय जागता । धन्य मातापिता तयाचिया ॥" ( ९,जोग प्रत)
पहिल्यांदा आपल्याला वाटते की तुकाराम महाराज असे कसे एखाद्या स्वार्थी मुलाबद्दल इतके चांगले लिहीत आहेत. पण तुकाराम महाराज हे फार रोकडे उपदेश देणारे संत आहेत. आता पहा की एखादा मुलगा आपले हित जपत नोकरीतून बचत करीत, कर्ज काढून फ्लॅट घेतो, तेव्हा प्रथम आपल्याला वाटते की हा स्वार्थी आहे. पण नंतर त्या घरात थकलेल्या आईबापांचीच सोय होते हे कळते. निदान त्याचा तो स्वत: फ्लॅट घेतोय, आई-बापांवर ओझे बनत नाही आहे हेही हिताचेच आहे हे कळते. आणि असे मातापिता धन्यच होणार. मुले चांगले निघणे, कर्तबगार निघणे, त्यांनी स्वता:ची प्रगती करणे ह्या बाबी आईबापांना अतिशय सुख देणार्‍या म्हणूनच वाटतात. आज आपण पाहतोच की आपल्याकडे जवळ जवळ घरटी एक तरी मुलगा अमेरिकेस वा परदेशी नोकरीस असतो. अशा वेळी नुसत्या त्याच्याच आईबापांना नव्हे तर संपूर्ण देशालाच अभिमान वाटू लागतो. फक्त तुकाराम महाराजांच्या उपदेशा प्रमाणे आपण आपले हित जपायला हवे व त्यासाठी आपले चित्तच ग्वाही असते.


अरूण अनंत भालेराव
भ्र:९३२४६८२७९२ ( arunbhalerao67@gmail.com)