रविवार, २६ सप्टेंबर, २०१०

तुकयाची ग्वाही 10

तुक्याची ग्वाही-१०
"अनुभवावाचून । सोंग संपादणे । नव्हे हे करणे । स्वहिताचे ॥" ( २५०१,जोग प्रत)
पूर्वी बहुरूपी नावाचे सोंग घेऊन मनोरंजन करणारे, खेळ करणारे लोक असत. अशा एखाद्या बहुरूप्याने देवाचे सोंग आणले पण तसा भाव, अनुभव घेतला नाही, तर त्याचे ते देवपण वाया जाणारे असते. दगडाच्या देवाला मनोभावे भजणारे भक्त तरून जातील, पण दगडाला मात्र दगड म्हणूनच रहावे लागते. धोत्र्याच्या झाडाला ( कनक ) आपण जरी सोन्याचे ( कनक ) झाड म्हणून मानले तरी ते काही सोन्याचे मोल पावणार नाही. संत तुकाराम महाराजांचे मोठेपण असे आहे की त्यांचे उपदेश व विचार सार्वत्रिक व वैश्विक असे ठरतात. कारण असाच उपदेश एके ठिकाणी शेक्सपीयरनेही दिलेला आहे. तो म्हणतो की जे चमकते ते सर्वच काही सोने नसते. व्यवहारात तर हा उपदेश फारच महत्वाचा आहे. आपण जर शेजार्‍याशी तुलना करीत त्याच्याच सारखे श्रीमंतीचे सोंग आणले, पण तसा खरा अनुभव नसेल तर आपली किती तारांबळ उडते ते प्रत्येकालाच माहीत आहे. असेच राजकारण्यांचे होते. ते आव भले आणतात, जनसेवेचा पण त्यांची अमाप संपत्ती पाहिली की लोकांना खरा अनुभव येतो. सर्व काळी खरे ठरणारे वचन हे असे असते.

अरुण अनंत भालेराव
भ्र: ९३२४६८२७९२
arunbhalerao67@gmail.com

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०१०

तुकयाची ग्वाही 9

तुक्याची ग्वाही--९
"आपुल्या हिताचे । न होती सायास । गृहदारा आस । धनवित्त ॥"(६३२,जोग प्रत)
बुद्धीचा पालट धरा रे कांही, मागुता हा नाही, मनुष्यदेह, अशी विनवणी करणारे तुकाराम महाराज, अध्यात्मातले तत्व सांगतात की जन्म मृत्यू ह्या उपाध्या माणसाने का भोगत रहाव्यात ? फारा पुण्यानंतर मिळणारा मनुष्यदेह मिळाल्यावर चांगले काम करणे हेच आपल्या हिताचे आहे. आपल्या जे हिताचे आहे ते करण्यात काही सायास होत नाहीत हे सोपे तत्व तसे पटण्यासारखे आहे. आणि सगळ्या घरादाराची, धनाची आस असणे हेही साहजिकच आहे. म्हणून हा मनुष्य देह लाभल्यावर भगवंताचे स्मरण ठेवणे हेच आपल्या हिताचे आहे, कारण त्याने पुढच्या गर्भवासापासून सुटका मिळणार आहे. खरोखर ज्या संबंधामध्ये आपले हित आहे अशा संबंधाची खटपट आपल्या हातून व्हायला हवी. ही खटपट न झाली तर मग मात्र मुद्दाम कराव्या लागणार्‍या सायासा सारखे अवघड जाणार आहे. इथेही स्वहिताची जपणुक करणे हाच व्यवहारी मार्ग तुकाराम महाराज सुचवत आहेत.

अरुण अनंत भालेराव
भ्र: ९३२४६८२७९२ arunbhalerao67@gmail.com

रविवार, १९ सप्टेंबर, २०१०

तुकयाची ग्वाही 8

तुक्याची ग्वाही-८
"जैसी कारंज्याची कळा । तो जिव्हाळा स्वहिताचा ॥" ( ८०१,जोग प्रत)
तुकाराम महाराजांच्या काळातही कारंजी होती हे ह्या उपमेवरून कळल्यावर मोठी गंमत वाटते. त्यातही कारंज्याचे रहस्य त्यांनी सांगून स्वहिताचा उपदेश द्यावा ह्याचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे. कारंज्यात धारा एकापेक्षा एक उंच उडाव्यात अशी योजना करायची असेल तर पाण्याला दाब असावा लागतो. ह्या तांत्रिक बाबीचा दृष्टांत तुकाराम महाराज असा देतात की कारंजाची शोभा वाढवायची असेल तर जसा पाण्यावर दाब असावा लागतो तसेच स्वहिताचे कारंजे थुइथुई उडायचे असेल तर त्यावर "जिव्हाळा" ह्या गोष्टीचा दाब, रेटा असणे आवश्यक आहे. स्वहित साधण्यास अंत:करणात प्रेमाचा जिव्हाळा पाहिजे. ह्या अभंगात पुढे तुकाराम महाराज अशी हमी देतात की भूतमात्रांना शांती साठी प्रेमाचा जिव्हाळा हवा हे मी खुद्द मोजलेले आहे. हीच "तुक्याची ग्वाही" समजायला हरकत नाही !

अरूण अनंत भालेराव
भ्र:९३२४६८२७९२ ( arunbhalerao67@gmail.com)

बुधवार, १ सप्टेंबर, २०१०

तुकयाची ग्वाही 7

तुक्याची ग्वाही-७
"तुका म्हणे नीत । न विचारितां नव्हे हित ॥" ( १४४६,जोत प्रत)
तुकाराम महाराज हिताचा, स्वहिताचा विचार करा असा उपदेश देतात तेव्हा हित कशात पहावे त्याचाही फार मोलाचा विचार देतात. ते म्हणतात, ज्या विचारात नीतीचा विचार होतो त्यातच हित असते. नीती म्हणजे अगदी सोप्या शब्दात, चांगले काय व वाईट काय ह्याची जाण. आणि हे कसे ठरवायचे तर, आपल्या चित्ताला साक्षी ठेवून. ह्यासाठी ते अगदी रोचच्या व्यवहारातली उदाहरणे देतात. जसे, दळण दळण्या आधी आपण खडे निवडतो, नाही तर भाकरीत कचकच लागेल. इथे आळस करून काही उपयोग नाही. शेत कामात पीक चांगले यायचे असेल तर आजूबाजूचे तण उपटून काढावे लागतात. इथे आपण जसा हिताचा विचार करून, आळस न धरता, काय चांगले त्या नीतीचा विचार करतो व त्याप्रमाणे वागतो, त्यातच माणूस मात्रांचे हित आहे. जीवनाचे सूत्र इतक्या सोप्या पद्धतीने सांगता येणे हे तुकाराम महाराजांचे खासे देखणे वैशिष्टय आहे.

अरूण अनंत भालेराव
भ्र:९३२४६८२७९२ ( arunbhalerao67@gmail.com)