बुधवार, २३ फेब्रुवारी, २०११

ई-तुका
तुकयाची नॅनो---९

९) गेयता व अल्पाक्षरे :
गेयते साठी कमीत कमी अक्षरांचे शब्द असावेत हे तर जे शास्त्रीय संगीत ऐकतात त्यांच्या एव्हाना लक्षात आलेच असेल. कारण जेव्हा गायक ताना घेतात, त्यात चढ उतार करीत वेगवेगळ्या चालीत बदल करत असतात तेव्हा शब्दांऐवजी ते सरगम वापरतात जसे: म म ग ग रे ग सा वगैरे. नुसते स्वर हे एक अक्षरी शब्द असतात. आता दर वेळी एकाक्षरी शब्द सुचणे व ते वापरणे काव्यात शक्य होत नाही. तेव्हा त्यातल्या त्यात जवळचे अल्पाक्षरी शब्द असतात दोन अक्षरी. आणि आपण पाहिले की तुकाराम महाराज अभंगात ७० टक्क्यांनी असे दोन अक्षरी शब्द वापरतात. त्यामुळेच तुकारामाचे अभंग हे अप्रतीम गेय होतात.
तामिल शास्त्रीय संगीतात प्रत्येक गायकाने कमीत कमी दोन तरी तुकारामाचे अभंग गावेत अशी परंपरा आहे असे श्री गणेशकुमार सांगतात. हे गृहस्थ चेंबूरच्या फाइन आर्ट सोसायटीचे अध्यक्ष असून त्यांना पंढरपूरच्या देवस्थानाने अभंग-रत्न हा किताब दिलेला आहे.ह्यांचे मराठी अभंग विषयावर एक भाषण होते. अभंगाचे हे लेक्चर-डेमोंन्स्ट्रेशन होते. त्यादरम्यान त्यांनी काही माहीती सांगितली ती थक्क करणारी आहे. सर्वात मोठ्ठे विठ्ठल मंदीर भारतात कांचीपूरम येथे आहे. तिथे विठ्ठलाची १२ फूट उंचीची मूर्ती असून इतर संतांच्या १० फुटी मूर्ती आहेत. संपूर्ण पंढरपूरच्या देवळाची आसपासची प्रतिकृतीही केलेली आहे. तंजावरचा दक्षिण भजन संप्रदायात हटकून मराठी अभंग म्हटले जातात. तिथल्या गायकांना दोन तरी मराठी अभंग म्हणावेच लागतात. त्यांच्याकडची हरिकथा पद्धती म्हणजेच प्रवचनाचा एक प्रकार आहे. प्रसिद्ध तमिळ संगीतगुरू त्यागराज ह्यांच्या समाधी मागेच विठ्ठलाचे मंदीर आहे.
सर्वात ज्यास्त लोकप्रिय मराठी अभंग तामिळ नाडूत म्हटले जातात. म्हणूनच भीमसेनजी, कुमार गंधर्व, जितेंद्र अभिषेकी, अजित कडकडे ह्यांचे तुकारामाचे अभंग लोकप्रिय झाले असून सर्वात गेय आहेत हे जाणवते. ( क्रमश: )

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०११

तुकयाची नँनो 1

ई-तुका
तुकयाची नॅनो

८) लांबलचक शब्दांची मालगाडी व तिचा खडखडाट :
मराठी शब्दकोश पाहिला व त्यात पाच अक्षरे व त्याहून ज्यास्त असलेले शब्द मोजले तर आपल्याला आपल्या भाषेचाच कल अल्पाक्षराकडे आहे का ते समजेल. ह्या दृष्टीने वा.गो.आपट्यांचा शब्दरत्नाकर हा कोष पाहिला. आता सगळा कोश मोजणे जिवावर आले. म्हणून त्यात संख्येने ज्यास्त शब्द असलेले "स" पासून सुरू होणारे ५८८८ शब्द तपासले ( कोशात एकूण ६०,५५९ शब्द आहेत ). म्हणजे हा १० टक्क्याचा मासला ( सॅंपल ) होतो. तर " स"पासून सुरू होणारे ५व त्यापेक्षा ज्यास्त अक्षरांचे मोठे शब्द खुणा करून मोजले तर भरले एकूण ७१२. टक्केवारीत हे पडतात १२ टक्के. म्हणजे भाषेतच ८८ टक्के शब्द हे अल्पाक्षरी आहेत म्हणायचे. आता तुकाराम गाथेत आपल्याला अल्पाक्षरी शब्द आढळले होते एकूण ३० हजारापैकी २७४७९ म्हणजे ९१ टक्के. आता हे साहजिकच भाषेच्या कलाप्रमाणेच आहे हे दिसून येईल. आता साहजिकच लांबलचक मालगाडी सारखे शब्द असू नयेत हा नियम ओघानेच येतो व तो तुकारामांनी तंतोतंत पाळलेला आहे हेही लक्षात येते.
आपण जो आवाज काढतो तो टाळू, दात, दात व टाळू दरम्यानचा भाग, घसा, ह्या ठीकाणी जिभेचा वावर करून व नाक ह्यातून हे तर आता सर्वांना माहीतच असते. आपण जी हवा घेतो ती मोठे शब्द म्हणत असताना लगेच विरून जाते. म्हणजे आपली जी व्यवस्था आहे त्याप्रमाणेही अल्पाक्षरे हीच आपली निकड आहे. भाषेतले दोन अक्षरी शब्द मोजले ( स पासून सुरू होणार्‍या ५८८८ शब्दांपैकी ) तर ७५३ म्हणजे १२ टक्के. आणि नेमाडे संपादित अभंगगाथेतले पहिले १०० अभंग तपासले तर त्यात दोन अक्षरी शब्द निघाले २३०३ शब्द, म्हणजे २३ अल्पाक्षरे प्रति अभंग किंवा ३६ शब्दापैकी ( चार खंडांचा एक अभंग व एका अभंगात एकूण ३६ शब्द) २३ शब्द दोन अक्षरी भरले. तर अशा रितीने ७० टक्के शब्द तुकाराम महाराज दोन अक्षरी वापरतात हे दिसून येते. ते लांबलचक शब्दांची मालगाडी अशी टाळतात व त्यायोगे होणारा खडखडाटही मग टळतो.
हे अल्पाक्षरी काव्य करणे "येरा गबाळ्याचे " काम नाही हे आजकालच्या काही आधुनिक कवींच्या रचना अल्पाक्षरांसाठी मोजल्या तर लक्षात येऊ शकेल. "दृश्यांतर" ह्या चंद्रकांत पाटील संपादित पुस्तकातून विंदा करंदीकर, सुर्वे, कोलटकर, पाडगावकर, सुरेश भट, ह्यांच्या ३७७२ एकूण शब्द असलेल्या कविता तपासल्या तेव्हा त्यात अवघे १५६७ दोन अक्षरी शब्द आढळले. म्हणजे ४१ टक्के व हेच तुकारामाच्य अभंगात प्रमाण आहे दोन अक्षरी शब्दांचे ७० टक्के. अल्पाक्षरी काव्य ह्यात तुकाराम महाराजांची अशी हातोटी सिद्ध होते. ( क्रमश: )

-------अरूण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com