
शुक्रवार, ७ जुलै, २०१७
रविवार, ४ डिसेंबर, २०१६
पैसा किती मिळवावा
पैसा किती मिळवावा ?
फेसबुकवर एका तरुणाची ह्या शीर्षकाची पोस्ट पाहून भरून आले. मूळ पोस्ट अशी :
“किती पैसा कमावला म्हणजे
माणूस श्रीमंत समजावा?
याचे फार छान उत्तर संत तुकाराम महाराजानी दिले आहे,
नीतिधर्माचे आचरण ठेवता यावे,
मुलाबाळांचे रक्षण करता यावे,
आईवडिलांची काळजी घेता यावी.
अब्रूने जगता यावे,
इतका पैसा जवळ असला
की तो मनुष्य श्रीमंत समजावा...”
अगदी सामान्यांना वाटावे,पटावे असे हे विचार प्रथम दर्शनी किती सालस वाटतात. पण खरेच तुकाराम महाराज असे म्हणाले होते ? आणि कुठे ? ह्याचा शोध घेताना एका मुलाने प्रसिद्ध संस्कृत सुभाषिताचा अर्थ कसा लावला त्याची आठवण आली. ( त्याला विचारले होते, “तमसो मा ज्योतिर्गमय ”चा अर्थ काय ? व त्याने त्याचा अर्थ केला होता, “तुम सो जाव मा, मै ज्योती के घर जा रहा हूं !” ). असेच काहीसे तर झाले नाही ना इथे ?
वरची पोस्ट लिहिणारा मुलगा अगदी तरुण असून अजून त्याने गृहस्थाश्रमात प्रवेश केलेला नसावा. कारण गृहस्थाश्रमाचे फळ सांगताना तुकाराम महाराज म्हणतात :
जोडोनियां धन उत्तम वेव्हारें । उदास विचारें वेच करी ॥1॥
उत्तम चि गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीव खाणी ॥ध्रु.॥
परउपकारी नेणें परनिंदा । परिस्त्रया सदा बहिणी माया ॥2॥
भूतदया गाई पशूचें पालन । तान्हेल्या जीवन वनामाजी॥3॥
शांतिरूपें नव्हे कोणाचा वाईट । वाढवी महत्व वडिलांचें ॥4॥
तुका ह्मणे हें चि आश्रमाचें फळ । परमपद बळ वैराग्याचें ॥5॥
( अर्थ : अहो जन हो, तुम्ही चांगला व्यापार करून द्रव्य मिळवा आणि त्याचा खर्च उदासीन विचाराने करा. असा जो करील त्याला उत्तम गति मिळेल आणि चांगल्या मनुष्ययोनी मध्ये जन्म घेऊन उत्तम भोग भोगील. दुसऱ्यावर नेहमी उपकार करतो व दुसऱ्याची निंदा करण्याचे जाणत नाही आणि परस्त्रिया आपल्या आईबहिणीसारख्या सर्व काळ मानतो. सर्व भूतांचे ठिकाणी दया करून गाई वगैरे पशूंचे पालन करतो आणि तृषित लोकांना अरण्याचे ठिकाणी पाणी पिण्याकरिता आड, विहिरी यथाशक्ती निर्माण करतो. आपली वृत्ती शांत असून कोणाशी वाईटपणाने वागत नाही व आपल्याहून जे श्रेष्ठ आहेत त्यांची महती वाढवितो. तुकाराम महाराज म्हणतात, गृहस्थाश्रमाचे हेच मुख्य फळ आहे आणि परमपदप्राप्तीला ( मोक्षाला) जे वैराग्याचे बळ
लागते तेही हेच . ).
विठ्ठल हेच खरे धन आहे असे मानणारा वारकरी संप्रदाय, वैराग्याची महती सांगणारे वैदिक दर्शन, भक्तिमार्गात सांगितले गेलेले परोपकार, हे सगळे काही वेगळेच सांगत असताना कोणाला असे कसे वाटू शकते की कुटुंबाची काळजी घेता येईल इतका पैसा मिळवावा. आणि तुकाराम महाराज असे सांगत आहेत !
आणि हे सर्व त्यांनी स्पष्ट खालील अभंगात सांगितले असताना ? :
आलिया संसारा उठा वेग करा । शरण जा उदारा पांडुरंगा ॥1॥
देह हें देवाचें धन कुबेराचें । तेथें मनुष्याचें काय आहे ॥ध्रु.॥
देता देवविता नेता नेवविता । येथ याची सत्ता काय आहे ॥2॥
निमित्याचा धनी केला असे झणी । माझेंमाझें ह्मणोनि व्यर्थ गेला ||
------------------------
बुधवार, ३० नोव्हेंबर, २०१६

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६
मी चोर तू पोलीस
चोर पोलीस खेळू ! मी चोर तू पोलीस !
-----------------------------------
आमच्या लहानपणीचा सगळ्यात लोकप्रिय खेळ होता चोर पोलीस. ह्यात कोणालाही पोलीस व्हायला आवडायचे नाही. प्रत्येकाला चोरच व्हायचे असायचे. अगदी नाईलाजाने ज्याच्यावर राज्य येई त्याला पोलीस व्हावे लागे.
चोराला लपून बसायला मिळे, पळून जायला मिळे, तर पोलिसाला एकेकाला पकडावे लागे.
व्यवहारात सुद्धा चोर हे नेहमी पोलिसांच्या पुढे एक पाऊल असतात. चोर हुशार असतात.
जे पदार्थ तब्येतीला वाईट असतात नेमके तेच चवीला छान असतात. आपल्याला वाईटच आवडते. अळणी नको असते.तुकाराम महाराज हेच सांगताना म्हणतात की चांगले सुगंध सोडून माशी पहा कशी दुर्गंधीपाशी जाते : राउळासी जातां त्रास मानी मोठा । बैसतो चोहोटां आदरेशीं ॥1॥
न करी स्नान संध्या ह्मणे रामराम । गुरुगुडीचे प्रेम अहनिऩशी ॥ध्रु.॥देवाब्राह्मणासी जाइऩना शरण । दासीचे चरण वंदी भावें ॥2॥सुगंध चंदन सांडोनियां माशी । बसे दुर्गंधीशीं अतिआदरें॥3॥तुका ह्मणे अरे ऐक भाग्यहीना । कां रे रामराणा विसरसी ॥4॥
ह्या सगळ्याच्या मुळाशी म्हणे माणसाचे रॅशनल नसणे आहे. आपण म्हणे ईरॅशनल बुद्धीचे असतो. आपली ठेवणच तशी आहे म्हणे ! अनेक लोकांच्या अथक प्रयत्नांनी आपण रॅशनल होतो ( ते ही झालो तर...!).
---------------------
-------------
सोमवार, १० ऑक्टोबर, २०१६
कारणा कारण
कारणा कारण
विज्ञानाच्या अभ्यासामुळे आपला असा समज होतो की जे काही आपल्या अवती भवती घडते आहे त्याला काही ना काही कारण असतेच. सगळ्याच ज्ञानशाखांचा रोख हे कारण शोधण्याकडे असतो.
आग, पाणी, तेज, वायू, आकाश, ही आदिम पंचमहाभूते घेतली तरी विज्ञान म्हणते की ती काही स्वयंभू अशी असत नाहीत. काही तरी कारण घडते आणि ही पंचमहाभूते प्रकटतात. सगळे जगच जर पंचमहाभूतांचे बनलेले असेल तर मग जगात विनाकारण असे काही नाहीच म्हणायचे !
आपण माणसे ह्या जगात अगदी एकमेवाद्वितीय आहोत असा भ्रम जरी खरा मानला तरी आपल्यावरही कोणा कोणाचा प्रभाव पडतच असतो असे कोणतेही प्राथमिक मानसशास्त्र आपल्याला सांगून जाते.
एकूण काय कुठलेही निरिक्षण, कुठलाही विचार, कुठलेही प्रमेय, कुठलाही वाद, काहीही घेतले तरी ह्या कार्य-कारणातून आपल्या समजाची काही सुटका दिसत नाही. आणि हे वैज्ञानिक कार्यकारण शोधणे इतके धोक्याचे असते की इथे किती टक्क्याचे कारण हे खरे कारण असा काही ठोकताळा नाही. अगदी नोबेल पारितोषिक मिळालेल्या ग्रॅंगर-कॉज च्या समीकरणातही किती टक्क्याचे प्रमाण म्हणजे खरे कारण असे काही सापडत नाही. म्हणजे सगळ्या ज्ञानाचा आटापिटा हा असा मोघमच !
ह्या गदारोळातून तुकाराम महाराजांनी भक्तिमार्गाचा उपाय सुचविला आहे. ते म्हणतात : ( २८७१, जोग प्रत,) : कारणा कारण ( कार्यकारण ) वरियेले जेथे । जातों तेणे पंथे सादावित ॥ संती हे पईल लाविले निशाण । ते खूण पाहोन नाम गर्जे ॥ तुका म्हणे तुम्ही चला याचि वाटे । पांडुरंग भेटे भरवंसेनी ॥ ( जोग प्रतीतला अर्थ : ज्या ठिकाणी कार्यकारण नाहींसे होते ( शेतात बी पेरले असतां धान्य पिकते, यज्ञ केला असता स्वर्ग प्राप्त होतो, हा कार्यकारण भाव प्रवृत्तीमध्ये असतो. ही प्रवृत्ती ज्या मार्गात बाजूला सारली आहे त्या निवृत्तीच्या ) मार्गाने मी लोकांना सांगत जात आहे. भवसमुद्राच्या पैलतीरास जाऊन संतांनी कीर्तीचा ध्वज उभारला आहे, ती खूण पाहून हरिनामाची गर्जना मी करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अहो जन हो, तुम्ही ह्याच मार्गाने चला, म्हणजे भरंवशाने पांडुरंगाची भेट होईल.
-------------------------------------
अरुण अनंत भालेराव
-------------------------------------
मंगळवार, २० सप्टेंबर, २०१६
शंका फिटणे
शंका फिटणे
--------------------
संत श्री ज्ञानेश्वरांची एक विराणी ( विरहिणी ) :
माझी शंका फिटले | लाजा सांडिले | आवघे घातले |
मज निरसुनिया ||१|| अठरा भार वनस्पती | सुरवर वोळंगती || देवोदेवि आदिपती | कृष्ण काळा गे माये ||२||ऐसा कृपानिधी सांवळा| कीं बापरखुमादेवीवरु गोंवळा || त्याचा मज चाळा | बहु काळ गे माये ||३||
माझी शंका फिटली, माझी लाज लुप्त झाली, आणि मला सर्व काही अगदी निवडून निरसून दिल्यासारखे दिल्या गेले आहे. हे सुरवर धारण करीत आहेत अठरा भार वनस्पती. तसेच ती धारण करीत आहेत देवोदेवी, आदिपती, व कृष्ण जो काळा आहे. ही कृपा करणारा सांवळा असा आहे की विठ्ठलही त्यात गोवला गेला आहे. त्या कृष्णाचा मला चाळा लागला आहे व तो खूप काळापासून.
ही कृष्णाची हुरहूर आहे तशीच ती अठरा भार वनस्पतीचीही हुरहूर आहे. काय असेल अठरा भार ? भार व धारण करणे ह्यावरून “अठरा भार” हे वनस्पतीचे खूप असण्याचे मोजमाप असावे. जगात वनस्पती किती, जलचर किती, पशू किती, किडे किती, माणसे किती हे मोजण्याचे शास्त्र आहे टॅक्सॉनॉमी नावाचे. ह्यात एक २० मैल बाय २० मैल आकाराचे क्षेत्र घेवून त्यातले स्पीसीज मोजतात. हे मोजणे कैक लक्ष डॉलर खर्चून अजून चालूच आहे.
ज्ञानेश्वरानंतर झालेल्या तुकारामाने त्याला ज्ञात असलेले हे आकडे एका अभंगात असे दिलेत (८४ लक्ष योनी ) : वीस लक्ष योनी वृक्षामाजी घ्याव्या | जलचरी भोगाव्या नव लक्ष || अकरा लक्ष योनी किड्यामाजी घ्याव्या | दशलक्ष भोगाव्या पक्ष्यांमध्ये || तीस लक्ष योनी पशूंचिये घरीं | मानवाभीतरी चार लक्ष || एकएक योनी कोटी कोटी फेरा | मनुष्यदेहवारा मग लागे || तुका म्हणे तेव्हा नरदेह नरा | तयाचा मातेरा केला मूढें ||
तुकारामाच्या काळात २० लक्ष योनी असलेल्या वनस्पती कदाचीत ज्ञानेश्वरांच्या काळात १८ लक्ष असतील तर मग “अठरा भार” हे वनस्पतीचे त्या काळातले मोजमाप असावे.
---------------------