रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०

न वजे वाया, वाया न वजे

 तुकारामाची एक गज़ल 

—————————-

न वजे वायां काही ऐकता हरिकथा । आपण करिता वायां न वजे ।।

न वजे वायां काही देवळासी जाता । देवासी पूजितां वायां न वजे ।।

न वजे वायां काही केलिया तीर्थ  । अथवा कां व्रत  वायां न वजे ।।

 न वजे वायां काही झाले संतांचे दर्शन ।  शुद्व आचरण वायां न वजे ।।

तुका म्हणे भाव असतां नसतां  । सायास करिता वायां न वजे ।।

( जोग प्रतीतला अर्थ : श्रीहरीची कथा दुसऱ्याच्या मुखाने श्रवण केली, अथवा आपण केली तर ती काही वायां जाणार नाही. देवळात जाऊन देवीचे दर्शन घेतले अगर त्याचे पूजन केले कर ते काही वायां जाणार नाही. एखाद्या तीर्थयात्रेस जाणे अगर कोणतेही व्रत करणे , हे काही वायां जाणार नाही. संतांचे दर्शन घेतले असता वाया जाणार नाही ; अशा प्रकारची कोणत्याही चांगली आचरणे वायां जाणारी नव्हेत. तुकाराम महाराज म्हणतात, अशा कर्तव्यामध्ये भाव, श्रद्धा, असो अगर नसो, चांगल्या आचरणाचे श्रम केले असतां वायां जाणार नाहीत. )

न वजे वायां — —- — । — — —- वायां न वजे ।। हे शब्द व त्यांचा क्रम चारही ओळीत सारखा ठेवून एक अप्रतीम कुसर इथे दिसून येते. नेपोलियन बोनापार्ट ज्या एल्बाच्या लढाईत हरला त्याबद्दलचे एक त्याचे वाक्य फार प्रसिद्ध आहे: Able was I ere I saw Elba. ह्यातली अक्षरे पुढून मागे वा मागून पुढे वाचली तरी वाक्य तेच राहते. तशीच कुसर तुकाराम महाराज इथे करीत आहेत, तेच शब्द उलट सुलट वापरून. ह्याने नादमयता साधली जाते, जसे गजलेचे वृत्त देते. 

गजलेत एकाच कल्पनेला उलट सुलट करून, त्याच रूपकाला फिरवून शेर केलेला असतो व एक तत्व सांगितलेले असते. जसे: हजारों ख्वाइशे ऐसी की हर ख्वाइश पे दम निकले. तसेच इथे चांगल्या आचरणाचे तत्व, फिरवून, सांगितलेय. जसे: हरिकथा आपण आपल्या मुखाने केली काय वा दुसऱ्याने केलेली ऐकली काय, ते आचरण चांगलेच होय. देवळात जाऊन देवांचें दर्शन केले काय किंवा घरच्या देवांची पूजा केली काय ते आचरण चांगलेच होय. 

एरव्ही हेच तुकाराम महाराज “भाव तेथे देव” म्हणणारे आहेत पण इथे चांगले आचरण वाखाणण्यासाठी ते भाव नसला तरी चालेल अशी मुभा देत आहेत. हे जमीनीवरचे संत असल्याचेच द्योतक आहे. 

———

रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

मरण पाषाण

 

 

मरण पाषाण

पूर्वी समाधी घेत, त्याचे वर्णन साधारण असे असायचे की एक बेसमेंट आहे; त्याला वर येण्याची वाट आहे; व वर एक आडवे दार आहे व समाधी घेणारा आतून त्या दारावर एक भला मोठा दगड ठेवतो. हळू हळू बेसमेंट मधली हवा श्वासागणिक कमी कमी होत जाते व श्वास बंद होत माणसाचा प्राण जातो. स्वतः घ्यायची ती हीच समाधी. आपसुक मरण यायच्या आधी आणलेले मरण. मरणाचे मरण.

हे दृश्य बघताना दगड व त्याचे आतून सरकवणे हे मोठे नाट्यमय दिसते. त्याला दगडाच्या सरकण्याचा आवाज पार्श्वसंगीत म्हणून दिला तर ते फारच प्रभावी दृश्य. हा दगड कशाचे प्रतीक आहे ? तर तुकाराम महाराज इथे हा दगड ज्ञानाचे प्रतीक आहे असे सांगत आहेत. कसले ज्ञान ? तर सुख दु:खे, हे भोग, हे देहाला होत आहेत व मी ह्या देहापासून वेगळा आहे हे ज्ञान. अशा यथार्थ ज्ञानाचा दगड आम्ही भोगावर टाकून दिला आणि देहादिकाला येणार्या मरणाला ह्याच यथार्थ ज्ञानाने मारले.

अद्वैत तत्वात जर देव सर्व व्यापून आहे तर मी वेगळा कुठे आहे ? आणि मग कशाची प्राप्ती करण्यासाठी मी अंगात बळ आणू ?

जर अंतरबाह्य केवळ तूच भरलेला आहेस तर आतून बाहेर काय काढू व बाहेरून आत काय आणू ?

कितीही वाद केला तरी तो कोरडाच राहतो. देहादिक प्रपंच हे मग स्वप्नवत वाटतात व त्याची पीड़ा कोणी घ्यावी ?

जगातले सगळे वाण सामान तुमच्या घरी आलेले आहेत. तुम्ही फक्त मजूराची रोख मजूरी द्यायची आहे.

मला काही लाभ किंवा हानी असे काही नाहीय. जो कोणी ह्या देहाचा धनी असेल तो आमच्या देहरुपी वाड्याचे रक्षण करील !

देवाक् काळजी !

--------------------

भोगावरी  म्ही घातला पाषाण । मरणा मरण आणियेलें ॥1॥

विश्व तूं व्यापक काय मी निराळा । काशासाठीं बळा येऊं आतां ॥ध्रु.॥

काय सारूनियां काढावें बाहेरी । आणूनि भीतरी काय ठेवूं ॥2॥

केला तरी उरे वाद चि कोरडा । बळें घ्यावी पीडा स्वपनींची हे ॥3॥

वघेचि वाण आले तुम्हां घरा । मजरी मजुरा रोजकीर्दी ॥4॥

तुका म्हणे कांहीं नेणें लाभ हानी । असेल तो धनी राखो वाडा ||५||

-----------------------

 मुक्तीशी लग्न ?

———————


याजसाटी केला होता अट्टाहास | शेवटचा दिस गोड व्हावा ||

आता निश्चिंतीने पावलो विसावा | खुंटलिया धांवा तृष्णेचिया ||

कवतुक वाटे जालिया वेचाचे | नाव मंगळाचे तेणे गुणे ||

तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी | आता दिवस चारी खेळीमेळी ||

तुकाराम महाराज हे असे साधक होते की अगदी सामान्य माणसासारखे राहून संसारातली सुखदु:खे सोसून ते भक्तिमार्गात अत्युच्च पदाला पोचले होते. वारकरी जाहीरच करतात की “ तुका झालासे कळस ! “. 

आपण संसारात कसे सुरूवातीला काटकसर करीत, पैशाला पैशा जोडून बचत करतो व निवृत्त झाल्यावर आरामात राहण्याचे मनोरथ करतो तसेच ते इथे म्हणत आहेत की मी याचसाठी अट्टाहास केला होता की शेवटी सगळे आरामशीर गोड व्हावे. जे प्रयत्न केलेत त्याने निश्चित विसावा मिळणार आहे त्याची मला निचिंती आहे. तहान लागली की त्यामागे धावणे आता माझे खुंटले आहे. मी जे काही मार्ग वेचले व त्यामुळे जे मंगल गुण लाभले त्याचे मला खूप कौतुक वाटत आहे. जीवन मरणाच्या चक्रातून मोक्ष अथवा मुक्ती मिळते ती मला हमखास हक्काने मिळते आहे, जणु काही मी मुक्तीशी लग्न केलेय व मुक्ती ही माझी लग्नाची नवरीच आहे. लग्न झालेले नवीन जोडपे जसे चार दिवस खेळीमेळीने राहते तसे भक्तीमार्गातले मुक्तीबरोबरचे हे माझे खेळीमेळीचे चार दिवस आहेत. 

गृहस्थ धर्माची उपमा देत इथे तुकाराम महाराज अध्यात्मातली मुक्ती ही कशी हक्काची नवरी आहे हे सांगत आहेत. 

—————-

काळाचा वळसा

 काळाचा वळसा

आजकाल भौतिक शास्त्रात काळ ही चौथी मिति धरतात. लांबी, रुंदी, उंची ह्या तीन मिति आपण सहज समजू शकतो, पण काळ काही दिसत नाही. क्वांटम मेकॅनिक्स मध्ये तर ते लोक दहा अकरा मिति आहेत असे सांगतात. ते तर अजिबातच कळत नाही. पृथ्वीच्या स्वत:भोवती घुमण्याने एका फेरीत एक चोवीस तासांचा दिवस होतो व मग त्याचे लहान मोठे भाग करीत आपण काळ मोजतो खरा, पण तो कळत नाही का वळत नाही. बालपण किती लवकर संपले असे वाटते तर तेव्हढ्याच वर्षांचे म्हातारपण सरता सरत नाही. असा कसा हा काळ ? 

तुकाराम महाराजांना काळाचा हा वळसा चांगला माहीत आहे. चांगल्या दिवसानंतर वाईट दिवस आले की त्या काळाचा तो वळसा त्यांना सोसावा लागलेला असल्याने ते म्हणत आहेत की किती या काळाचा सोसावा वोळसा ? आणि हे काळाचे वळणे अगदी सारखे पाठोपाठ लागलेले आहे. 

जो जन्मतो त्याला मरण आहेच. तसेच त्याला लगेच मेल्यानंतर कुठ्ल्याना कुठल्या जीवजातीत जन्मही घ्यावा लागतो अशीही एक समजूत आहे. आणि हे अशा चौर्यांशी लक्ष योनीत जन्म घ्यावा लागतो. हे चक्र भेदायचे असेल तर भक्तिमार्गाचे पुरस्कर्ते असल्याने तुकाराम महाराज म्हणताहेत की पांडुरंगाला शरण या. 

जन्म मरणाच्या ह्या रहाट-गाडग्यात आपण एक केवळ गाडगे आहोत आणि आपली सुटका तेव्हाच होइल जेव्हा हे गाडगे फुटेल.

------------------  

किती या काळाचा सोसावा वोळसा । लागला सरिसा पाठोपाठीं ॥1॥

लक्ष चौर्यांशीची †करा सोडवण । रिघा या शरण पांडुरंगा ॥ध्रु.॥

उपजल्या पिंडा मरण सांगातें । मरतें उपजतें सवेंचि तें ॥2॥

तुका म्हणे  माळ गुंतली राहाटीं । गाडग्याची सुटी फुटलिया ॥3॥

--------------------