मंगळवार, १२ जानेवारी, २०२१

 कळसाची विराणी !

“आधिल्या भ्रतारें काम नव्हे पुरा । म्हणोनि व्यभिचारा टेकलियें || रात्रंदिस मज पाहिजे जवळी । क्षण त्यानिराळी न गमे घडी || नाम गोष्टी माझी सोय सांडा आतां । रातलें अनंता तुका म्हणे ||

( पहिला देहाकार जो नवरा त्याच्या संगतीने कामना ( सुखाची इच्छा ) पूर्ण होत नाही, म्हणून त्याचा त्याग करून श्रीहरीशी व्यभिचार ( आश्रय ) केला. रात्रंदिवस तो माझ्या जवळ पाहिजे ; त्याचेखेरीज मला एक क्षणदेखील करमत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझे नाव व हकीगत ह्यांचा तुम्ही आता सम्बन्ध सोडून द्या. मी अनंताच्या ठिकाणी रत झाले आहे. ---अर्थ जोग प्रतीमधून ). 

------------------  

संत मंडळींचे मोठे गंमतीचे असते. त्यांना ऐहिक भावनांचे काही सोयरसुतक नसते. त्या भावना त्यांना चांगल्याच माहीत असतात पण ते त्या पल्याड गेलेले असतात. त्यांना सुख काय अन् दु:ख काय, असेच विरह काय अन् व्यभिचार काय ? ह्याच बेदरकारीतून संतशिरोमणी तुकाराम महाराज विराणी लिहितात, व्यभिचाराच्या रूपकातून. आणि पारंपारिक व्यासंगी शिष्य त्याची नोंदणी करतात : “व्यभिचाराच्या रूपकाने केलेले अभंग: व्यभिचारिणी स्त्रीचे रूपक : विराण्या ”.  

संस्कृतातले “विरह”चि व्युत्पत्ती बि + रह् काय किंवा फारसीतले “बिरह” काय दोन्हीकडे बढेजाव आहे तो “रह्” किंवा राहण्याचा. आणि हे काही नुसते शारीरिक राहणे नसून त्यात काही तरी वरच्या दर्जाच्या प्रेमाचे असणे गृहित आहे. म्हणजे “विरह” व्हायचा तर आधी दोघात खूप प्रेम असणे आवश्यक आहे. प्रियकर-प्रेयसी, आई-मूल, भाऊ-बहीण, अशा जोड्यात नुसते जुजबी प्रेम असले व मग ताटातूट झाली तर तो “विरह” गणल्या जात नाही. तर ह्यांच्यात कोटीचे प्रेम असले व मग त्यांच्यात शारीरिक ताटातूट झाली तरच तो “विरह” म्हणायचा . आता राहण्याच्या विरुद्ध जसे विरह तसे ह्या उदात्त प्रेमाविरुद्ध काय ? तर अनेकांशी प्रेम ? व्यभिचार ? आपले अस्तित्व आपल्याला खासम् खास वाटणारच पण त्याच्याविरुद्ध जसे आपले “नसणे” असते, तसेच अनेकांचे “असणे”, हेही असते. असेच प्रेम असून विरह-भावना ह्याच्या विरुद्ध अनेकांशी प्रेम/ व्यभिचार असणे ! आणि अशी भावना ही पारंपारिक विरहाच्या विराणीच्या तोडीची !

तुकाराम महाराज हे एक कळस तर विरहाच्या विराणीचा हा कळस. अशी ही कळसाची विराणी ! 

----------------------- 

अरुण अनंत भालेराव                                                                                               https://e-tuka.blogspot.in/

 विरह आहे म्हणून विरहिणी


---------------------------- 


विज्ञानात जसे कार्यकारण हे जसे महत्वाचे ( जसे पाण्याची वाफ होऊन ढग झाले, ते थंड झाले, त्याचा पाऊस आला ! ) तसेच ह्या विरहिणीत चांगल्या सगुणांची “लावणी” केल्याने सर्व चांगले होते, माझा “बापरखुमादेविवरु” सुद्धा हा माझ्या मानसीचा आहे म्हणून मला त्याची सय येते व मी जागी राहते, असे कार्यकारणभावाने सांगितले आहे. संपूर्ण विरहिणी अशी :


सुख शेजारी असतां कळी जाली वो पहातां | देठु फेडुनि सेवतां अरळ केले ||१|| अंगणीं कमळणी जळधरू वोले वरी | वाफा सिम्पल्यावरी वाळून जाये ||२|| मोतियाचे पाणी वाहे निळिये सारणी | सगुणाची लावणी लाउनि गेला ||३|| अंगणीं वोळला मोतें वरुषला | धन्य दिवसु जाला सोनियाचा ||४|| चोरट्या मधुकरा कमळीं घेतलासे थारा | मोत्यांचा चारा राजहंसा ||५|| अंगणीं बापया तूं परसरे चांपया | असुवीं माचया भिनलया ||६|| वाट पाहे मी एकली मज मदन जाकळी | अवस्था धाकुली म्हणो नये ||७|| आता येईल म्हूण गेला वेळु कां लाविला | सेला जो भिनला मुक्ताफळा ||८|| बावन चंदनु मर्दिला अंगी वो चर्चिला | कोणे सदैवे वरपडा जाला वो माये ||९|| बापरखुमादेविवरु माझे मानसींचा होये | तयालागी सये मी जागी सुती ||१०|| 


एखाद्या वस्तूचे नाव मागे राहते व वस्तू गायब होते, तसे ह्या “सारणी” शब्दाचे आहे. पूर्वी आठ आण्यात मध्य रेल्वेचे टाईम टेबल मिळायचे. त्याला हिंदीत सारणी असे लिहिलेले असे . आता जशा गाण्याच्या भेंड्या ( अंताक्षरी ) खेळतात तशा तेव्हा गावांच्या नावाच्या भेंड्या खेळत असत व त्यात ही सारणी खूप कामी येई. आजकाल ही सारणी कुठे पहायला मिळत नाही . मोतियाचे पाणी वाहे निळिये सारणी || तर काय आहे ही “सारणी” ? पूर्वी शेतातल्या विहिरीवर मोटी असत. मोट म्हणजे चामड्याची एक मोठ्ठी पिशवी असे. ही विहिरीत खाली सोडत, त्याचे तोंड बंद करीत व बैलांच्या सहाय्याने ती वर ओढीत व पाणी सोडत कालव्या कालव्याने. बैलांना ओढायला सोपे जावे म्हणून एक उतार केलेला असे, विहिरीजवळ चढ व विहिरीपासून दूर उतार. ह्या उतरणीला “सारणी” म्हणत. मोटेचे तोंड उघडून जे पाणी पाटात पडे ते फेसाळे व मोत्यासारखे दिसे. म्हणून“मोतियाचे पाणी ”. आता सगळीकडे विहिरींना पंप आले आहेत त्यामुळे मोट, बैल, सारणी हे कसे कळावे व मोतियाचे पाणीही ? म्हणजे विरहिणीत अर्थ होतो की बैलांना ओढण्यासाठी जो उतार ( सारणी ) केला त्या सगुणाने मोटेचे पाणी मोत्यासारखे होऊन वाहते आहे.


असेच शेजारी सुख आहे म्हणून कळी होते आहे. देठ तसा जाड असतो पण तो मृदू ( अरळ ) करून सुखाने त्याची कळी होते आहे. अंगणातल्या पाण्यावर कमळ येते आहे पण तेच ते वाफा शिंपून लावले तर वाळून जाईल. पाऊस आला तो दिवस सोनियाचा होतो आहे. फुलांचा मध चोरणारा मधुकर ( मधमाशी/भृंग ) कमळाचा आसरा घेतो आहे. राजहंसाला मोत्याचा चारा मिळतो आहे. मी एकटी वाट पाहते आहे व मला ह्या पौगंडावस्थेत मदन जाळतो आहे. ह्या अवस्थेला कमी महत्वाचे ( धाकुली ) समजू नका. शेला हा मोत्यांनी भरला तेव्हाच सुंदर झाला. चंदन अंगाला चोळून कायमसाठी सुवासिक ( चंदनाने ग्रासलेला, वरपडा ) झालेला हा कोण झालाय माय ? हा बापरखुमादेविवरु माझ्या मनातला ( मानसींचा ) आहे म्हणून त्याच्या सयेने मी जागी राहते आहे.


विरह आहे म्हणून विरहिणी आहे !


----------------------