रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

 मुक्तीशी लग्न ?

———————


याजसाटी केला होता अट्टाहास | शेवटचा दिस गोड व्हावा ||

आता निश्चिंतीने पावलो विसावा | खुंटलिया धांवा तृष्णेचिया ||

कवतुक वाटे जालिया वेचाचे | नाव मंगळाचे तेणे गुणे ||

तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी | आता दिवस चारी खेळीमेळी ||

तुकाराम महाराज हे असे साधक होते की अगदी सामान्य माणसासारखे राहून संसारातली सुखदु:खे सोसून ते भक्तिमार्गात अत्युच्च पदाला पोचले होते. वारकरी जाहीरच करतात की “ तुका झालासे कळस ! “. 

आपण संसारात कसे सुरूवातीला काटकसर करीत, पैशाला पैशा जोडून बचत करतो व निवृत्त झाल्यावर आरामात राहण्याचे मनोरथ करतो तसेच ते इथे म्हणत आहेत की मी याचसाठी अट्टाहास केला होता की शेवटी सगळे आरामशीर गोड व्हावे. जे प्रयत्न केलेत त्याने निश्चित विसावा मिळणार आहे त्याची मला निचिंती आहे. तहान लागली की त्यामागे धावणे आता माझे खुंटले आहे. मी जे काही मार्ग वेचले व त्यामुळे जे मंगल गुण लाभले त्याचे मला खूप कौतुक वाटत आहे. जीवन मरणाच्या चक्रातून मोक्ष अथवा मुक्ती मिळते ती मला हमखास हक्काने मिळते आहे, जणु काही मी मुक्तीशी लग्न केलेय व मुक्ती ही माझी लग्नाची नवरीच आहे. लग्न झालेले नवीन जोडपे जसे चार दिवस खेळीमेळीने राहते तसे भक्तीमार्गातले मुक्तीबरोबरचे हे माझे खेळीमेळीचे चार दिवस आहेत. 

गृहस्थ धर्माची उपमा देत इथे तुकाराम महाराज अध्यात्मातली मुक्ती ही कशी हक्काची नवरी आहे हे सांगत आहेत. 

—————-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा