सोमवार, ११ ऑक्टोबर, २०१०

तुकयाची ग्वाही 12

तुक्याची ग्वाही-१२
"मुंगिचिया घरा कोण जाय मूळ । देखोनिया गूळ धाव घाली ॥" ( १६२०, जोग प्रत)
ज्याला आपल्या स्वहिताची चाड, काळजी आहे त्याने आपण होऊन हरीकथेवर लक्ष द्यावे असे म्हणत असताना इथे तुकाराम महाराज व्यवहारातला दाखला देत आहेत तो असा की मुंगीला गूळ आवडतो तर ती आपण होऊन गुळाकडे धाव घेते, कोणी आमंत्रण ( मूळ पाठवणे) देण्याची वाट पहात नाही. तसेच जो दाता आहे त्याला देण्यात आनंद आहे तर त्याने कोणी याचना करण्या आधीच आपण होऊन दान द्यावे. अन्न व पाणी आपल्याला निमंत्रण देण्याअगोदरच आपण ते गिळंकृत करतो. ज्याला काही व्याधी, रोग झाला आहे तो आपण होऊनच वैद्याकडे धाव घेतो. असेच आपले हित हवे असेल तर आपण होऊन आपण हरीकथेकडे धाव घ्यायला हवी. आपल्या हिताचा कळवळा आपल्यालाच सहजतेने यायला हवा तरच तो परिणामकारक होईल, दुसर्‍याने सांगून करून काही उपयोग होत नाही असा हा रोकडा उपदेश आहे.

अरुण अनंत भालेराव
भ्र: ९३२४६८२७९२ arunbhalerao67@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा