गुरुवार, १३ जानेवारी, २०११

तुकयाची नँनो 7

ई-तुका
तुकयाची नॅनो--७

७) "न, ना" चे सांगणे संदर्भातले महत्व:
मतमतांचा इतका कोलाहल माजतो की साधकाला कोणता मार्ग बरोबर त्याचा संभ्रमच पडतो. व ही जाणीव सर्वकालीन असते. ती जशी तुकारामाच्या काळी होती तितक्याच तीव्रतेने आजच्या साधकालाही जाणवते. म्हणूनच कदाचित वारकरी संप्रदायामध्ये "माळ" म्हणजे गुरू करण्याचे फार महत्व आहे. खरा गुरू आपल्याला योग्य मार्गदर्शन करतो. कोणता मार्ग आपल्याला बरा राहील हे तर तो सांगतोच पण त्याचबरोबर कोणता मार्ग घेऊ नये हेही सांगतो. आजकालच्या संदर्भात तर हे फारच महत्वाचे ठरते. आपण शहरात पाहतो की एखाद्या ठिकाणी पोचायचे दोन तीन मार्ग असतात. पण काही मार्ग हे अडचणीचे असतात, ट्रॅफिक जामचे असतात. खरा मार्गदर्शक आपल्याला कोणता मार्ग घेऊ नकोस ते आधी सांगतो. हे त्याचे नकारार्थी मार्गदर्शन नसते तर तो आपल्या हिताचा कळवळा असतो. ह्याच कळवळ्यापायी काय काय करू नको असा नकाराचा दोष पत्करूनही तुकाराम महाराज त्यांच्या अभंगातून "न", "ना", "नाही" हे शब्द मुबलकपणे वापरून आपल्याला "सांगत" असतात.
प्रसिद्ध गुजराती कवी सुरेश दलाल ह्यांना एकदा मी विचारले होते की आजकाल कोणत्याही कवी लेखकाचे साहित्य त्याच्या मृत्यूपश्चात १५/२० वर्षात विस्मरणात जाते व असे असताना, ज्ञानेश्वर-तुकारामांचे साहित्य इतकी सातशे वर्षे कशामुळे टिकले असावे ? त्यांचे उत्तर मोठे बोलके होते. ते म्हणाले की त्यांची कलाकृती ही अगत्याने काहीतरी सांगण्याची होती, केवळ स्फूर्ती आलीय व लिहिले अशा प्रकारची नव्हती. तर "सांगणे" व ते ही कळकळीने, हे असे महत्वाचे ठरते, व ह्या सांगण्यात "हे हे करू नको" असे नकारार्थी सांगणे महत्वाचे व प्रत्ययकारी ठरते.
हे "सांगणे" प्रकरण किती सर्वदूर साहित्यात दबा धरून असते ते पहा. कादंबरी म्हणजे आजकाल नुसती कोणती तरी राजा राणीची कहाणी असत नाही तर तिने काही तरी सांगावे लागते. जसे भालचंद्र नेमाडे "हिंदू" ह्या कादंबरीतून ब्राह्मणांनी धर्म कसा बिघडवला हे सांगण्याचा निश्चय करतात. चित्र हे सुद्धा नुसते काही तरी टिपणारे नको असते तर ते बोलके असावे लागते. सिनेमाचेही आपण असेच परिक्षण करतो व चांगला उदात्त संदेश देणारा चित्रपट उत्तम असे ठरवतो. आपल्या जगण्यानेही काही तरी मानवतेला संदेश मिळावा अशीही आपली महत्वाकांक्षा असते. तर असे "सांगणे" मुख्य हेतू असताना साधकांची सोय म्हणून तुकाराम महाराज "काय करू नका" असे सांगतात व साहजिकच ते सांगताना "न", "ना", "नाही" हे शब्द भरपूर वापरतात. ह्या वापराने त्यांच्या सांगण्याचा संदर्भ सिद्ध होतो. ( क्रमश: )
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

२ टिप्पण्या:

  1. प्रिय अरूण अनंत भालेराव,
    आपला लेख वाचला.आवडला.
    लेखन प्रयोजन अत्यंत सोप्या मात्र परखड अशा दाखल्यासहीत मांडलेत.अभिनंदन आणि शुभेच्छा !

    -सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

    उत्तर द्याहटवा
  2. आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
    अरुण अनंत भालेराव

    उत्तर द्याहटवा