गुरुवार, ६ जून, २०१३

हंगामा

------------------------------------------
जब के तुझ बिन नहीं कोई मौजूद
फिर ये हंगामा ऐ ख़ुदा क्या है ?
---------------------------------------
    माझे असे एक पाहणे आहे की साधारणपणे ज्या काळात एका मोठ्या माणसाला जे वाटत असते अगदी तसेच दुसर्‍या कोणाला तरी तसेच वाटत असते व तोही तसेच म्हणत असतो. फरक असतो तो भाषेचा, प्रदेशाचा किंवा श्रेणीचा ( डिग्रीचा )  !
    आता वरील गालिबचा शेर आपण सरळ अर्थाने काय म्हणतोय हे पाहिले तर कळेल की
"जर तुजविण नाही कोणी हजर दुसरे
तर गोंगाट/गडबड/बोभाटा हा देवा, काय रे ?"
    आता असेच तुकाराम महाराजांनी म्हटले आहे काय, ह्याचा शोध घेता हा अभंग सापडतो :
पावलें पावलें तुझें आह्मां सर्व । दुजा नको भाव होऊं देऊं ॥
जेथें तेथें तुझीं च पाउलें । त्रिभुवन संचलें विठ्ठला गा ॥ध्रु.॥
भेदाभेदमतें भ्रमाचे संवाद । आह्मां नको वाद त्यांशीं देऊं ॥
तुका म्हणे अणु तुजविण नाहीं । नभाहूनि पाहीं वाढ आहे ॥
    "तुज बिन नही कोई मौजूद" च्या ऐवजी तुकाराम महाराज म्हणत आहेत : "तुका म्हणे अणु तुजविण नाही" . इथे गालिबच्या "कोई"ची वरची डिग्री "अणु"ने दाखविली आहे. तसेच तू सर्व व्यापून आहेस हे सांगताना वरची श्रेणी दाखविलीय ती अणू असूनही "नभाहूनि पाही वाढ आहे" असे म्हटले आहे.
    तसेच "हंगामा"चे हुबेहुब वर्णन "भेदाभेदमते भ्रमाचे संवाद" ह्या भाषांतराने साधले आहे. "तुजबिन नही कोई मौजूद" ह्याचाच अर्थ असा होतो की "सगळीकडे तूच व्यापून आहेस". आणि ह्या अर्थासाठी तुकाराम महाराज म्हणतात : "जेथे तेथे तुझीच पाउले । त्रिभुवन संचले विठ्ठला गा ॥"
    गालिबने जो गझल मध्ये प्रश्न विचारला आहे ( फिर ये हंगामा ऐ खुदा क्या है ? )  त्याचे जणु उत्तरच तुकाराम महाराज देत आहेत ते असे : "पावले पावले तुझे आम्हा सर्व । दुजा नको भाव होऊ देऊ ॥"
    असे पाहिले तर ही तुकारामाची गझलच झाली की, अगदी गालिबच्या हंगामाच्या तोडीची !
-------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा