सोमवार, ११ एप्रिल, २०१६

कार्यकारण

कार्यकारण
कारणा कारण (कार्यकारण) वरियेले जेथें । जातों तेणें पंथें सादावित ||
 संतीं हें पईल  लाविलें निशाण । ते खूण पाहोन नाम गर्जे ॥
 तुका म्हणे तुम्ही चला याचि वाटे । पांडुरंग भेटे भरंवसेनी ||
( ज्या ठिकाणी कार्यकारण नाहीसे होते ( शेतात बी पेरले असता धान्य पिकते, यज्ञ केला असता स्वर्ग प्राप्त होतो, हा कार्यकारणभाव प्रवृत्ती मध्ये असतो. ही प्रवृत्ती ज्या मार्गात बाजूला सरली आहे त्या निवृत्तीच्या) मार्गाने मी लोकांना सांगत जात आहे. भवसमुद्राच्या पैलतीरास जाऊन संतांनी कीर्तीचा ध्वज उभारला आहे, ती खूण पाहून हरिनामाची गर्जना मी करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अहो जन हो, तुम्ही याच मार्गाने चला, म्हणजे भरंवशाने पांडुरंगाची भेट होईल .)
काय केले असता काय होते हे निश्चित सांगणारे जे विज्ञान आहे त्यात सर्वात प्रगत विज्ञान आहे क्वांटम मेकॅनिकस्. आणि त्यात आपल्याला आध्यात्मिक गोष्टी आढळतात. जसे गॉड पार्टीकल, नेमके काही मोजता न येणे, मॅटर तसेच अॅंटी मॅटर, स्थान नक्की असेल तर वेग नक्की नसतो, अनेक विश्वे असणे, वगैरे. विज्ञानात निश्चितता (  Determinism ) असल्याचा आपला समज अशाने डळमळतो. वैद्यक शास्त्रात तर कालची ठाम मते आज बाद झाली आहेत . जसे : ( भाजले तर पाणी लावू नये वगैरे ). आजकाल तर निश्चितता हवीच कशाला असे मत पुढे येऊ लागले आहे.
अशा वेळेस शनीची अवकृपा झाल्याने बलात्कार वाढतील हे वैज्ञानिक मानले तर ते क्वांटम शास्त्राने अनेक विश्वात खरे ठरू शकते. ह्यावर तुकाराम महाराजांचा सल्ला पटावा. ते म्हणतात कार्यकारणभाव हा प्रवृत्तीत असतो, निवृत्तीत नसतो. निवृत्तीत भरवसा असतो. मग पांडुरंग भेटतो. शेतकरी आत्महत्या का करतात, बलात्कार का वाढतात वगैरे चौकशी-प्रांत हेच मुळी आता भरवशाचे प्रांत झालेले आहेत. त्यामुळे त्यांना कार्यकारण लागू न करता लोक आपापले भरवसे देत आहेत !

-----------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा