रविवार, २९ मे, २०११

तुकारामाच्या गजला 2

तुकाराम महाराजांच्या ग़झला---२

ग़झल चारशे वर्षे जुनी तर तुकाराम साडेतीनशे वर्षे जुने. म्हणजे त्याकाळात त्यांनी ग़झला नक्कीच ऐकल्या असतील. त्याकाळी अभंग ह्या वृत्तात दुसर्‍या व तिसर्‍या चरणानंतर यमक ही परंपरा काटेकोरपणे सांभाळीत असत असे दिसते. ग़झलेत मात्र कायदे कडक असतात. जसे: ती एकाच वृत्तात असते, त्यात एक अंत्ययमक ( रदीफ ) असते, तर एक यमक ( काफिया) असते. २-२ ओळींचे किमान पाच किंवा त्याहून अधिक, शेर ग़झलेत असतात. प्रत्येक शेराचे स्वत:चे कविता म्हणून स्वतंत्र अस्तित्व असते.
अभंगात चार चरण असतात, सहा अक्षरांचे तीन, व शेवटचे चरण चार अक्षरांचे असते. दुसर्‍या व तिसर्‍या चरणा अंती यमक असावे लागते. ग़झल एकाच वृत्तात असावी लागते तर अभंग ही लवचिक रचना असलेला असतो.
ह्या फरकांमुळे रचनेच्या तुलनेने अभंग व ग़झल हे वेगळेच पडतात. पण रचनेशिवाय ग़झलेचे जे नियम असतात ते आपल्याला अभंगात दिसू शकतात. अभंग व ग़झल हे सबंध काव्यप्रकारच तुलना करण्यापेक्षा कुठे कुठे तुकाराम महाराजांचे अभंग अगदी ग़झलच्या वळणाचे वाटतात, ते एकेका स्वतंत्र उदाहरणावरून पाहू .
१) कैं वाहावे जीवन । कैं पलंगी शयन ॥
तुकाराम महाराजांचा हा अभंग पहा: कैं वाहावे जीवन । कैं पलंगी शयन ॥ जैसी जैसी वेळ पडे । तैसे तैसे होणे घडे ॥ कैं भोज्य नानापरी । कैं कोरडया भाकरी ॥ कैं बसावे वाहनी । कैं पायीं अनवाणी ॥ कैं उत्तम प्रावर्णे । कैं वसने ती जीर्णे ॥ कैं सकळ संपत्ती । कैं भोगणे विपत्ती ॥ कैं सज्जनाशी संग । कैं दुर्जनाशी योग ॥तुका म्हणे जाण । सुख दु:ख तें समान ॥
आता एक बहादुरशहा जफर ह्याची ग़झल ह्या अभंगाशेजारी अशी ठेवा :
कहीं मैं गुंचा हूं, वाशुद से अपने खुद परीशां हूं
कहीं गौहर हूं, अपनी मौज में मैं आप गलता हूं
कहीं मै सागरे गुल हूं, कहीं मैं शीशा-ए-मुल हूं
कहीं मैं शोरे-कुलकुल हूं, कहीं मैं शोरे-मस्तां हूं
कहीं मैं जोशे-वहशत हूं, कहीं मैं महवे-हैरत हूं
कहीं मैं आबे-रहमत हूं, कहीं मैं दागे-असियां हूं
कहीं मैं बर्के-खिरमन हूं, कहीं मैं अब्रे-गुलशन हूं
कहीं मैं अश्के-दामन हूं, कहीं मैं चश्मे-गिरियां हूं
कहीं मैं अक्ले-आरा हूं, कहीं मजनूने-रुसवा हूं
कहीं मैं पीरे-दाना हूं, कहीं मैं तिफ्ले-नादां हूं
कहीं मैं दस्ते-कातिल हूं, कहीं मैं हलके-बिस्मिल हूं
कहीं जहरे-हलाहल हूं, कहीं मैं आबे-हैवां हूं
कहीं मैं सर्वे-मौजूं हूं, कहीं मैं बैदे-मजनूं हूं
कहीं गुल हूं ’जफर’ मैं, और कहीं खारे-बयाबा हूं
इथे आपल्याला फक्त रचनेचे साधर्म्य आणि "कही" व "कैं" हे सारखे शब्द एवढेच जाणवत नाही तर आशयात सुद्धा जो सारखेपणा आहे त्याचे आश्चर्य वाटते. तुकाराम महाराज जसे कधी सुख तर कधी दु:ख असे म्हणतात तसेच जफर म्हणतात, कधी कृपेची वर्षा ( आबे-रहमत ) आहे तर कधी पापाचा कलंक ( दागे-असियां ).तुकाराम महाराजांचा "सज्जनाशी संग" हाच जफरचा "शोरे-कुलकुल" आहे तर "दुर्जनाशी योग" हा " शोरे-मस्तां " ( वेडयांचा गदारोळ) आहे. जफरच्या गजलेत कधी काय आहे तर कधी काय आहे याचे वर्णन आहे तर त्यापुढे जाऊन तुकाराम महाराज म्हणतात की कधी सुख आहे तर कधी दु:ख आहे व ते तुम्ही समान जाणा, माना. बहादुरशहा जफर हा तुकारामाच्या नंतरचा असल्याने त्याच्या ग़झलेवर तुकारामा महाराजांचा प्रभाव आहे असे आपण म्हणू शकतो. पण अभिव्यक्तीच्या दृष्टीने पाहिले तर दोन्ही रचनांमध्ये किती साम्य आहे हे जाणवावे. अर्थात वृत्त हा तांत्रिक भाग सोडला तर. ह्या तुलने नंतर तुकाराम महाराजांचा हा अभंग एक ग़झलच वाटावा.
ग़जलेबाबत पु.ल.देशपांडे म्हणतात ते फार महत्वाचे आहे. ते म्हणतात, ग़जल हे वृत्त नसून एक वृत्ती आहे. आणि तिच्यात एक सूक्ष्म नि सुंदर निवृत्तीही आहे. ही वृत्ती अभंगांतून फार ठळकपणे दिसते.
२) कवण जन्मता कवण जन्मविता ?
तुकाराम महाराजांचा हा एक अभंग पहा:
कवण जन्मता कवण जन्मविता ?
न कळे कृपावंता माव तुझी !
कवण हा दाता कवण हा मागता ?
न कळे कृपावंता माव तुझी !
कवण भोगता कवण भोगविता ?
न कळे कृपावंता माव तुझी !
कवण ते रूपता कवण अरूपता ?
न कळे कृपावंता माव तुझी !
सर्वां ठायी तूंचि सर्वही झालासी
तुका म्हणे यांसी दुजे नाही !
ह्या अभंगाचा पारंपारिक अर्थ असा : हे कृपावंता, जन्मणारा कोण व जन्म देणारा कोण ? ही तुझी माया मला कळत नाही. तसेच हे कृपावंता, देणारा कोण व मागणारा कोण ? ही तुझी माया मला कळत नाही. हे कृपावंता, सुखदु:खभोक्ता कोण व भोगविता कोण ? ही तुझी माया मला कळत नाही. हे कृपावंता, रूपवान कोण व रूपरहित कोण ? ही तुझी माया मला कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, सर्वांच्या ठायी तुझी व्याप्ती आहे. तुजवाचून किंचितसुद्धा दुसरे स्थान नाही.
आता ह्या अभंगाचे हिंदीत किंवा उर्दूत सरल भाषांतर केले तर असे होईल:
कौन जनमता कौन जनमाता ?
न समझे है दयालू, माया तेरी !
कौन दाता कौन मांगता ?
न समझे है दयालू, माया तेरी !
कौन भोग लेता कौन भोग देता ?
न समझे है दयालू, माया तेरी !
कौन रूपवान कौन रूपबगैर ?
न समझे है दयालू, माया तेरी !
सबके भीतर तू हि तू है
तुका कहे दूजा स्थानही नाही !
ग़झलेचे तांत्रिक अंग सोडले तर आता हा भाषांतरित अभंग ग़झलच वाटावा असा होतो. ग़झलेत जसे एकेका शब्दाभोवती पिंजण घालीत त्याचे नाद-माधुर्य खुलवतात तसेच ह्या अभंगात "न कळे" व "कवण" हे शब्द रुंजी घालतात अगदी ग़झलेसारखे !
३) बरे जाले देवा निघाले दिवाळे
आता तुकाराम महाराजांचा हा प्रसिद्ध अभंग पहा:
बरे जाले देवा निघाले दिवाळे । बरी या दुष्काळे पीडा केली ॥
बरे जाले देवा बाईल कर्कशा । बरी हे दुर्दशा जनामध्ये ॥
बरे जाले जगी पावलो अपमान । बरे गेले धन ढोरे गुरे ॥
बरे जाले नाही धरिली लोकलाज । बरा आलो तुज शरण देवा ॥
बरे जाले तुझे केले देवाईल ॥ लेकरे बाईल उपेक्षिली ॥
तुका म्हणे बरे व्रत एकादशी । केले उपवासी जागरण ॥
चांगल्या गजलेत एक प्रकारचा नाद असावा लागतो. इथे "बरे जाले देवा" हा नाद टिकवून ठेवलेला दिसून येतो. गजलेत शब्दांशी खेळही असतो. इथे काही शब्द पहा : देऊळ किंवा देवालय ऐवजी देवाईल, जे बाईल शी यमक साधताना बेमालूम साम्य साधते. तसेच रोजच्या वापरात असते गुरेढोरे तर इथे कवी त्याचे करतो ढोरे गुरे. खर्‍या गजलेत जो दर्द कवीने स्वत: घेतलेला असावा लागतो तो तुकाराम महाराजांचे चरित्र पाहिले तर दिवाळे, दुष्काळ, कर्कशा बाईल, दुर्दशा, अपमान, भक्तिशरणता ह्या शब्दांनी नेमके चित्रित होते व दर्द कसा साक्षात पुढे उभा राहतो.
पारंपारिक गजलेत शेवटी यमक यावे असा जर चंग बांधायचा तर अभंगाच्या रचनेत थोडा फेरफार करून ते सहजी जमले असते. जसे शेवटचे चरण तिसरे करणे, उदाहरणार्थ :
बरे जाले देवा निघाले दिवाळे । पीडा केली बरी या दुष्काळे ॥
बरे जाले जगी पावलो अपमान । ढोरे गुरे बरे गेले धन ॥
बरे जाले नाही धरिली लोकलाज । शरण देवा बरा आलो तुज ॥
बरे जाले तुझे केले देवाईल । उपेक्षिली लेकरे बाईल ॥
तुका म्हणे बरे व्रत एकादशी । जागरण केले उपवासी ॥
गजलेत जसे प्रत्येक शेर स्वतंत्र एकटा उभा राहायला हवा तसा इथला प्रत्येक अभंग एक स्वतंत्र सांगणे आहे व सगळे मिळून त्याची बेरीज, एकादशीच्या व्रताला घडणार्‍या उपवासाने दाखविली आहे.
नाद माधुर्याचे बर्‍यापैकी ज्ञान कवीला असल्याने त्याने "बरे झाले" असे न योजता "बरे जाले" असे योजले व झाले मुळे जे नाद-ओरखडे उमटले असते ते " जाले" मुळे सौम्य केले आहे. हे केवळ गजल-कवीलाच जमणारे कसब तुकाराम महाराज सहजी वापरताना पाहिले की तुकाराम महाराजांना गजल-सम्राटच का म्हणू नये असे कोणालाही वाटावे !
४) हेचि माझे तप हेचि माझे दान
एक बहादुरशहा ज़फरची ग़जल पहा:
रहता ज़ुबां पे आठ पहर किसका नाम है
करता है यह जो दिल में असर किसका नाम है
हमको किसी के ऐबो-हुनर की खबर नहीं
कहते हैं ऐब किसको, हुनर किसका नाम है
बदनाम है जहां में "ज़फर" जिनके वास्ते
वो जानते नहीं कि "ज़फर" किसका नाम है
इथे ज़फर काही प्रश्न विचारत आहे : जिभेवर आठ प्रहर कोणाचे नाव असते ? ह्या ह्रदयावर जो परिणाम करतो ते कोणाचे नाव आहे? आम्हाला कोणाच्या कला कुसरीची माहीती नाही, कशाला कला म्हणतात, वा कसब कशाचे नाव आहे?. ज्यांच्यामुळे जगात ज़फर बदनाम झाला आहे त्यांना माहीत नाही की ज़फर कोणाचे नाव आहे ?
आता तुकारामाचा हा अभंग बघा :
हेचि माझे तप हेचि माझे दान
हेचि अनुष्ठान नाम तुझे
हेचि माझे तीर्थ हेचि माझे व्रत
सत्य हे सुकृत नाम तुझे
हाचि माझा धर्म हेचि माझे कर्म
हाचि नित्यनेम नाम तुझे
हाचि माझा योग हाचि माझा यज्ञ
हेचि जपध्यान नाम तुझे
हेचि माझे ज्ञान श्रवण मनन
हेचि निजध्यासन नाम तुझे
हाचि कुळाचार हाचि कुळधर्म
हाचि नित्यनेम नाम तुझे
हा माझा आचार हा माझा विचार
हा माझा निर्धार नाम तुझे
तुका म्हणे दुजे सांगायासी नाही
नामेविण काही धनवित्त
ग़जलेच्या मुख्य लक्षणात एक लक्षण असते की प्रत्येक दोन ओळींचा शेर आपल्या आपण स्वतंत्र उभा राहू शकला पाहिजे. ग़जलेतल्या इतर ओळींची त्याला मदत लागली न पाहिजे. ही अट तुकारामाचा हा अभंग सहजी पुरी करतो. शिवाय ग़जलेची अजून एक अट असते की पहिल्या ओळीत जो विषय मांडला जातो ती त्या विषयाची प्रस्तावना, आणि ती दुसर्‍या ओळीत शिगेला पोचली पाहिजे. ही शीग त्या विषयाचा शिखर गाठणे, क्लायमॅक्स गाठणे, पलट मारणे, टर उडवणे अशीही असू शकते. वानगीदाखल पहा: तुझे नामस्मरण हाच माझा धर्म आहे, कर्म आहे ही झाली प्रस्तावनेची पहिली ओळ. तर दुसर्‍या ओळीत त्याचा परमोच्च आहे, हाच माझा नित्यनेमही आहे ! असेच धोरण सर्व अभंगात आहे.
परंपरेने अभंगात चार चरण असतात. पहिले चरण सहा अक्षरांचे ( ह्या चरणा शेवटी यमक नसते ) , दुसरे चरण सहा अक्षरांचे, तिसरे चरण सहा अक्षरांचे ( दुसर्‍या व तिसर्‍या चरणाशेवटी यमक असावे लागते ) व चौथे चरण चार अक्षरांचे ( शेवटी यमक नसते. ) . ( सोयीसाठी चार चरण दोन ओळीत मांडले आहे कारण लहान अभंग तसाही लिहितात.). आता ग़जल मध्ये दुसर्‍या ओळीनंतर यमक आवश्यक. परंपरा मोडून तुकाराम महाराज चौथ्या चरणांती "नाम तुझे" हे यमक योजतात हे लक्षणीय आहे आणि ग़जलाच्या वळणाचे आहे. ग़जलच्या पाच किंवा सहा शेरापैकी पहिला शेर ( ह्याला मतला म्हणतात ) मध्ये दोन्ही ओळीशेवटी यमक ( क़ाफिया व रदीफ ) असते पण तुकारामांना अभंगातली दुसर्‍या तिसर्‍या चरणांती असलेल्या यमकाची परंपरा मोडणे प्रशस्त वाटले नसावे. तरीही त्यांनी "तुका म्हणे दुजे " हे "नाम तुझे" ला जुळणार यमक शेवटच्या शेरात जोडले आहे तसे त्यांना सुरुवातीला "हेचि दान माझे" असे जराशा फरकाने सहज जमते.ते केले तर ग़जलेची तांत्रिक बाजूही सांभाळल्या गेली असती. ग़जलेत शेवटी तख़ल्लुस वापरावे लागते ( जसे "ज़फर") .ते अभंगात तुकाराम महाराज वापरतातच ( जसे: "तुका म्हणे").
ग़जलेबाबत पु.ल.देशपांडे म्हणतात ते फार महत्वाचे आहे. ते म्हणतात, ग़जल हे वृत्त नसून एक वृत्ती आहे. आणि तिच्यात एक सूक्ष्म नि सुंदर निवृत्तीही आहे. ही वृत्ती अभंगांतून फार ठळकपणे दिसते.
ग़जल-सम्राट सुरेश भट तुकारामा संबंधी म्हणतात : "तुझे दु:ख तुझे नाही , तुझे दु:ख अमचे आहे." इथे दु:खाचा सण साजरा करणार्‍या मध्ये आपल्याला तुकाराम आठवतात जे म्हणतात : बरे जाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली...शेक्स्पीयर सुद्धा म्हणतो "स्वीट आर द युजेस ऑफ ऍडव्हर्सिटी"
आणि मोठ्ठा योगायोग म्हणजे ज़फरने विचारावे "किसका नाम है" आणि तुकारामांनी उत्तर दिल्यासारखे म्हणावे "नाम तुझे" ! हे एक प्रकारे संवादीच वाटते आणि खात्री पटते की ही तुकाराम महाराजांची एक ग़जलच आहे.
५) नव्हती ते संत करिता कवित्व
नव्हती ते संत करिता कवित्व । संताचे ते आप्त नव्हती संत ॥
येथे नाही वेश सरते आडनावे । निवडे घावडाव व्हावा अंगी ॥
नव्हती ते संत धरिता भोपळा । करिता वाकळा प्रावरण ॥
नव्हती ते संत करिता कीर्तन । सांगता पुराणे नव्हती संत ॥
नव्हती ते संत वेदाच्या पठणे । कर्म आचरणे नव्हती संत ॥
नव्हती संत करिता तप तीर्थाटणे । सेविलिया वन नव्हती संत ॥
नव्हती संत माळामुद्रांच्या भूषणे । भस्म उद्धळणे नव्हती संत ॥
तुका म्हणे नाही निरसला देहे । तो अवघे हे संसारिक ॥
आता वरील रचनेची मिर्झा गालिब ह्यांच्या खालील रचनेशी तुलना करून पहा :
दीवानगी से दोष पे जुन्नार भी नहीं
यानी हमारी जैब में इक तार भी नहीं
दिल को नियाजे-हसरते-दीदार कर चुके
देखा तो हममें ताकते-दीदार भी नहीं
मिलना अगर तेरा नही आसां तो सहल है
दुश्वार तो यही है कि दुश्वार भी नहीं
बे इश्क उम्र कट नही सकती है और यां
ताकत बकदरे-लज्जते-आजार भी नहीं
शोरीदगी के हाथ से सर है वबाले-दोष
सहरा में ऐ खुदा कोई दीवार भी नहीं
गुंजाइशे-अदावते-अगयार इक तरफ
यां दिल में जोफ से हवसे-यार भी नहीं
डर नाला-हाए-जार से मेरे खुदा को मान
आखिर नवाए-मुर्गे-गिरफतार भी नहीं
दिल में है यार की सफे-मिजगा से रूकशी
हालांकि ताकते-खालिशे-खार भी नहीं
इस सादगी पे कौन न मर जाए ऐ खुदा
लडते है और हातमे तलवार भी नहीं
देखा "असद" को खल्वत-ओ-जल्वत में बारहा
दीवाना गर नही है तो हुशियार भी नही
अर्थ तूर्त जरा बाजूला ठेवा व ग़ालिब व तुकाराम " भी नही" आणि "नव्हती" ह्या शब्दांचा जो दरवळ ग़झलेत घुमवतात तो अनुभवा. किती सारखे वाटेल.
----(क्रमश: )
----अरूण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

रविवार, १५ मे, २०११

तुकारामाच्या गजला

तुकाराम महाराजांच्या ग़झला
साहित्यात वेगवेगळे अभिव्यक्तीचे प्रकार काळाप्रमाणे बदलत असतात. आता जुने कवी घेतलेत तर त्यांच्या कविता अक्षर-वृत्तात वा मात्रा-वृत्तात केलेल्या दिसतात. एवढेच नव्हे तर त्या काळी कवी लोक त्या कवितेची चालही कशी आहे त्याचा नमूना देत असत. आजकालचे कवी हे बहुतेक मुक्तछंदातच कविता करताना दिसतात. हेच निरिक्षण मग आपल्याला असे नोंदवावे लागेल की मुक्तछंद हा काव्यप्रकार वृत्तात कविता करण्यापासून उत्क्रांत झालेला आहे. किंवा आपल्या जुन्या शालेय पुस्तकात "नाट्यछटा" नावाचा छोटेखानी नाटुकल्यांचा प्रकार खूपच प्रचलित होता असे आठवेल. आजकाल हा प्रकार अजिबात दिसेनासा झाला आहे. तर साहित्यिक उत्क्रांतीच्या इतिहासात ह्याबद्दल म्हणावे लागेल की आता "नाट्यछटा" हा प्रकार "नाटका"तच विलीन झाला आहे. शेक्सपियरच्या प्रभावाखाली सुनीत नावाचा १२+२ ओळींचा ( अथवा ८+६ ओळींचा) प्रकार आजकाल लुप्तच झाला आहे. त्यालाच मुरड घालून पूर्वी कवी अनिल दशपदी नावाच्या कविता करीत. हे प्रकार जसे बदलतात तसाच काहीसा प्रकार ग़झलेच्या बाबतीत झाला असावा.
मराठीत ग़झल तशी जोमाने आणली माधव ज्युलियनांनी व ती जोपासली सुरेश भटांनी. तुकाराम महाराजांच्या काळात ग़झल हा काव्यप्रकार अस्तित्वात होता. तशात तुकाराम महाराज उर्दू, हिंदीतही अभंग रचीत हे आपण गाथेत पाहतोच. जसा अभंग हा काव्यप्रकार केवळ भक्तीमार्गासाठी खासा होता तसेच सूफी विचार व ग़झला ही त्याकाळी प्रचलित होते. राज्य तर मोंगलांचे होतेच. त्यामुळे तुकाराम महाराजांच्या एकूण लिखाणावर ग़झलेचा काही परिणाम दिसतो का हे ह्या लेखात पाहण्याचा मानस आहे. अर्थातच हे सर्व ऐतिहासिक पुराव्यांशिवाय करण्याचे योजले असल्याने केवळ भाषेच्या दृष्टीने हे पहावयाचे आहे.
उर्दूतली पहिली गझल कोणती असा प्रश्न पडतो. "हिस्ट्री ऑफ द पर्शियन लॅंग्वेज ऍट मुघल कोर्ट" नावाच्या श्री. एम.ए.गनी ह्यांच्या पुस्तकात एक सहा ओळीची रचना दिलेली आहे ( पहिली ग़झल म्हणून ) ती अशी: "हमन है इश्क मस्ताना, हमन को होशियारी क्या". दख्खनी उर्दूत ह्याअगोदरच्याही ग़झला आहेत. ( भीमराव पांचाळे ह्यांनी एका सदरात हीच ग़झल पुढे कबीराच्या नावे अशी दिली आहे: "हमन है इश्क मस्ताना, हमन को होशियारी क्या
रहे आजा़द या जग में, हमन दुनियांसे यारी क्या
जो बिछुडे है पियारे से, भटकते दरबर फिरते
हमारा यार है हम में, हमन को इंतजा़री क्या
"कबिरा" इश्क का नाता, दुई को दूर कर दिल से
जो जलना राह नाजुक है, हमन सरबोज भारी क्या" ह्यावरून कबीरानेही ग़जला लिहिल्यात असेच वाटते. )
रामबाबू सक्सेना नावाच्या एका लेखकाने "ए हिस्ट्री ऑफ उर्दू लिटरेचर" ह्या पुस्तकात चंद्रभान नावाच्या एका ब्राह्मणाने ग़झल लिहिलेली नमूद केलेले आहे. तुकारामाच्या गाथेत ज्या कबीराचा उल्लेख येतो त्याच्या रचनांविषयी लिहिताना श्री.प्रभाकर माचवे ( कबीर--साहित्य अकादमी प्रकाशन) म्हणतात की "कबीराने जरी उर्दू -फारसीतले वृत्त छंद हाताळलेले नसले तरी त्याने सुफी कलाम ऐकलेले असावेत. कबीराच्या काव्यात आढळून येणारे "प्रेम" व "दैवी मदहोशी" यांचे उल्लेख हे सुफी शैलीशी जुळणारे वाटतात". असेच निरिक्षण आपण तुकारामाच्या काही रचनांबाबत करू शकतो. कारण तुकारामही कबीराच्याच काळचा आहे व तुकारामाच्या कितीतरी रचनांवर कबीराचा प्रभाव पडलेला आपण पाहतो.
ग़झल चारशे वर्षे जुनी तर तुकाराम साडेतीनशे वर्षे जुने. म्हणजे त्याकाळात त्यांनी ग़झला नक्कीच ऐकल्या असतील. त्याकाळी अभंग ह्या वृत्तात दुसर्‍या व तिसर्‍या चरणानंतर यमक ही परंपरा काटेकोरपणे सांभाळीत असत असे दिसते. ग़झलेत मात्र कायदे कडक असतात. जसे: ती एकाच वृत्तात असते, त्यात एक अंत्ययमक ( रदीफ ) असते, तर एक यमक ( काफिया) असते. २-२ ओळींचे किमान पाच किंवा त्याहून अधिक, शेर ग़झलेत असतात. प्रत्येक शेराचे स्वत:चे कविता म्हणून स्वतंत्र अस्तित्व असते.
अभंगात चार चरण असतात, सहा अक्षरांचे तीन, व शेवटचे चरण चार अक्षरांचे असते. दुसर्‍या व तिसर्‍या चरणा अंती यमक असावे लागते. ग़झल एकाच वृत्तात असावी लागते तर अभंग ही लवचिक रचना असलेला असतो.
(क्रमश: )

बुधवार, १३ एप्रिल, २०११

तुकयाची नँनो 10

तुकयाची नॅनो---१०


१०) भाषासंपत्ती, भाषांतरे व अल्पाक्षरे :
शब्द-संपत्ती ( व्होकॅब्युलरी ) हा मोठा गहन विषय आहे. असे म्हणतात की पहिल्या इयत्ते पर्यंतच्या बालकाला साधारण २५००ते ५००० शब्द माहीत असतात व ते बालक दर वर्षाला ३००० हजार शब्द शिकत असते. किंवा दर दिवशी ८ शब्द ! कॉलेज शिक्षित तरुणाला साधारण १७००० शब्द माहीत असतात. ( तो दाखल होतो तेव्हा त्याला साधारण १२००० शब्द माहीत असतात. ). तुमची शब्दकळा-संपत्ती किती आहे त्यावरून तुमचे वाचण्यातले आकलन ठरत असते. भाषिक शब्दसंपत्ती किती आहे त्यावरून तुमची वैचारिक संपत्ती किती आहे ते ठरते. माणसाची महनीयता आपण त्याच्या शब्दसंपत्तीवरून जोखू शकतो. कदाचित हेच पुरेपूर जाणवून तुकाराम महाराज म्हणाले असतील: "आम्हा घरी धन । शब्दाची च रत्ने । शब्दाचीच शस्त्रे । यत्न करू ॥ शब्द चि आमुच्या । जीवाचे जीवन । शब्दे वाटू धन । जनलोका ॥ तुका म्हणे पाहा । शब्द चि हा देव । शब्दे चि गौरव । पूजा करू ॥" तुकाराम महाराजांच्या गाथेतली शब्दसंपत्ती आहे, ३०,००० शब्दांची. केव्हढी ही उपलब्धी !
इंग्रजी भाषेतला दहा लाखावा शब्द नुकताच शब्दकोशात आला. तो होता : "जय हो". त्या तुलनेत मराठी शब्दकोशात ( वा.गो.आपट्यांचा शब्दरत्नाकर ) आहेत फक्त: ६०,५५९ शब्द. इंग्रजी भाषेत शब्दकोशांवर प्रचंड संशोधनही झालेले आहे. फ्रान्सिस व कुसेरिया ह्यांनी किती शब्द भाषेतले किती व्याप सांभाळतात त्याचे कोष्टकच तयार केलेले आहे. जसे : १००० शब्द ७२ टक्के भाषा व्यापते, २००० शब्द ७९.७ टक्के भाषा व्यापते, ३००० शब्द--८४ टक्के, ४००० शब्द---८६.८ टक्के, ५००० शब्द--८८.७ टक्के, ६००० शब्द ८९.९ टक्के, तर १५,८५१ शब्द--९७.८ टक्के भाषा व्यापते. मायकेल वेस्ट ह्याने तर २००० सामान्यत: वापरल्या जाणारे शब्द असे निवडले आहेत की त्यातून ५० लाख शब्दांचा संभार उभा राहू शकतो.
इराक युद्धात सैन्याला वापरण्यासाठी मायक्रोसॉफ्ट ने जे संगणक तयार केले होते त्यात तर सर्व इंग्रजी-इराकी भाषेतले व्यवहार सहजी पार पाडण्याची क्षमता केवळ १ हजार शब्दांमार्फत केलेली होती. इतके हे मूलगामी १ हजार शब्द होते. असेच प्रत्येक भाषेत जोरकस वापराचे साधारण असेच हजार शब्द असतात. व बहुदा ते सर्व असे छोटे छोटे शब्दच असतात. तेव्हा दुसर्‍या भाषेत भाषांतर करायचे असेल तर अल्पाक्षरी शब्दच वापरणे हे चांगले धोरण ठरते. व ते तुकारामाला ठाऊक होते हाच त्याचा मोठेपणा आहे ! ( क्रमश: )

गुरुवार, १७ मार्च, २०११

तुकाराम बीज

तुकाराम-बीज :
आज, २१ मार्च २०११. आज तुकाराम बीज आहे. आज २ ते ३ लाख वारकरी भाविक देहूला जमा होतील. इ.स.१६५० मध्ये ह्याच दिवशी तुकाराम महाराज, शेवटचे कीर्तन करताना सदेह वैकुंठाला गेले . त्याचेच स्मरण म्हणून सर्व वारकरी हा दिवस ( दर वर्षी फाल्गुन मासातल्या कृष्ण पक्षातल्या द्वितीयेला ) तुकाराम -बीज म्हणून साजरा करतात. ही प्रथा, गेल्या शंभरावर वर्षापासून, देहू येथे पाळल्या जाते. गोपाळपुर्‍यातील नांदुरकीच्या झाडाखाली कीर्तन करताना तुकाराम महाराज अदृश्य झाले, त्याचे स्मरण म्हणून तुकाराम-बीजेच्या सोहळ्यात, भल्या पहाटे मुख्य देवळात विश्वस्तांच्या हस्ते पूजा होते ; तुकारामांच्या पादुका पालखीने वैकुंठगमनस्थानाकडे टाळ मृदुंगाच्या गजरात, पुष्पवृष्टीत प्रस्थान करतात ; गोपाळपुरातल्या मंडपात गाथाचे सामुदायिक पठण होते, वैकुंठगमनाचे कीर्तन होते व नांदुरकीच्या झाडाची पाने सळसळू लागली की "तुकाराम-तुकाराम" असा जयघोष होतो ; फुले उधळल्या जातात व वारकर्‍यांचा "जय जय रामकृष्ण हरी" चा घोष दुमदुमू लागतो. हाच तो क्षण तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठी जाण्याचा ! हीच तुकाराम-बीज !
आषाढ महिन्यातल्या एकादशीला १० ते १२ लाख वारकरी , पायी पंढरपुरची वारी करतात. ह्यात डोक्यावर तुळसीवृंदावन घेतलेल्या स्त्रिया, वीणाधारी, टाळकरी, मृदुंगवाले वगैरे वारकरी असतात. वारकरी संप्रदायात भेदभाव मानत नाहीत, भेटल्यावर एकमेकांच्या पाया पडतात, गुरू कडून तुळसीची माळ घालतात, दारू, अभक्ष्य भक्षण करीत नाहीत, एकादशीचा उपास करतात व नित्यनेमाने "हरिपाठ" व भजन करतात. वारी ज्या दिवसात असते त्यावेळी शेतीची कामे असतात. आजकाल आपण पाहतो की कुठल्याही सामाजिक कार्याला माणसांचा उत्साह व संख्या कमी पडते. अशात, आजही एवढया प्रचंड संख्येने वारकरी पायी चालत जातात व चालताना तुकारामाचे अभंग म्हणत जातात, हे पाहिले की ह्यांच्या भक्तिमार्गावरच्या विश्वासाचे व उत्साहाचे अपार कौतुक वाटते.
अशीच पावती आपल्याला ह्या भाविकांच्या तुकाराम-बीज साजरी करण्याला द्यावी लागेल. विज्ञानाच्या आधारे आपण पुष्पक विमान तुकाराम महाराजांना न्यायला आले होते, असे अजून तरी सिद्ध करू शकत नाही. एरव्ही पुण्यतिथीला तसबीरीसमोर किंवा समाधीच्या फरशीसमोर सरावाने माथा टेकवणार्‍या भाविकाला तुकाराम महाराजांचे असे अदृश्य होणे अदभुत व भांबावणारे खरेच. पण इथे विनोबा भावे एक दिशा दाखवतात. ते म्हणतात, भक्तियोगात चित्त ईश्वराने भरून जाते असा अनुभव येतो. तुकाराम महाराज भक्तिमार्गाचे कळसावर ह्यासाठी आहेत की त्यांचे नुसते चित्तच नाही तर त्यांची "कायाही हरिमय होते", अशा प्रकारची मुक्ती त्यांना साधलेली आहे. "गोविंद गोविंद मना लागलिया छंद । मग गोविंद ते काया ॥". अशी मुक्त आत्मस्थिती मिळवणारे तुकाराम महाराज ह्यावर म्हणून गेले आहेत की असे झाल्यावर "घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हातीं, मुक्तां आत्मस्थिती सांडवीन, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी ॥". आयुष्यभर खस्ता खाताना ज्या विठठलभक्तीने तुकाराम महाराजांची काया कीर्तनात ब्रह्मरूप झाली, तिचाच पुन:प्रत्यय भाविकांना तुकाराम वैकुंठी जाताना येत असावा. ज्या ज्ञानदेवाने भक्तिमार्गाचा पाया रचला त्याच्या कळसावरून, मुक्त आत्मस्थिती मिळवणारे तुकाराम महाराज, वैकुंठाला जाताना वारकरी भाविकांना निरोप देत आहेत: "आम्ही जातों आमुच्या गावां । आमुचा रामराम घ्यावा ॥ तुमची आमची हे चि भेटी । येथुनिया जन्मतुटी ॥ आतां असो द्यावी दया । तुमच्या लागतसे पायां ॥ रामकृष्ण मुखी बोला । तुका जातो वैकुंठाला ॥"

---------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

( १८६/ए-१, रतन पॅलेस, गरोडिया नगर, घाटकोपर ( पूर्व) , मुंबई : ४०००७७ ( भ्र: ९३२४६८२७९२ ) )

--------------------------------------

बुधवार, २३ फेब्रुवारी, २०११

ई-तुका
तुकयाची नॅनो---९

९) गेयता व अल्पाक्षरे :
गेयते साठी कमीत कमी अक्षरांचे शब्द असावेत हे तर जे शास्त्रीय संगीत ऐकतात त्यांच्या एव्हाना लक्षात आलेच असेल. कारण जेव्हा गायक ताना घेतात, त्यात चढ उतार करीत वेगवेगळ्या चालीत बदल करत असतात तेव्हा शब्दांऐवजी ते सरगम वापरतात जसे: म म ग ग रे ग सा वगैरे. नुसते स्वर हे एक अक्षरी शब्द असतात. आता दर वेळी एकाक्षरी शब्द सुचणे व ते वापरणे काव्यात शक्य होत नाही. तेव्हा त्यातल्या त्यात जवळचे अल्पाक्षरी शब्द असतात दोन अक्षरी. आणि आपण पाहिले की तुकाराम महाराज अभंगात ७० टक्क्यांनी असे दोन अक्षरी शब्द वापरतात. त्यामुळेच तुकारामाचे अभंग हे अप्रतीम गेय होतात.
तामिल शास्त्रीय संगीतात प्रत्येक गायकाने कमीत कमी दोन तरी तुकारामाचे अभंग गावेत अशी परंपरा आहे असे श्री गणेशकुमार सांगतात. हे गृहस्थ चेंबूरच्या फाइन आर्ट सोसायटीचे अध्यक्ष असून त्यांना पंढरपूरच्या देवस्थानाने अभंग-रत्न हा किताब दिलेला आहे.ह्यांचे मराठी अभंग विषयावर एक भाषण होते. अभंगाचे हे लेक्चर-डेमोंन्स्ट्रेशन होते. त्यादरम्यान त्यांनी काही माहीती सांगितली ती थक्क करणारी आहे. सर्वात मोठ्ठे विठ्ठल मंदीर भारतात कांचीपूरम येथे आहे. तिथे विठ्ठलाची १२ फूट उंचीची मूर्ती असून इतर संतांच्या १० फुटी मूर्ती आहेत. संपूर्ण पंढरपूरच्या देवळाची आसपासची प्रतिकृतीही केलेली आहे. तंजावरचा दक्षिण भजन संप्रदायात हटकून मराठी अभंग म्हटले जातात. तिथल्या गायकांना दोन तरी मराठी अभंग म्हणावेच लागतात. त्यांच्याकडची हरिकथा पद्धती म्हणजेच प्रवचनाचा एक प्रकार आहे. प्रसिद्ध तमिळ संगीतगुरू त्यागराज ह्यांच्या समाधी मागेच विठ्ठलाचे मंदीर आहे.
सर्वात ज्यास्त लोकप्रिय मराठी अभंग तामिळ नाडूत म्हटले जातात. म्हणूनच भीमसेनजी, कुमार गंधर्व, जितेंद्र अभिषेकी, अजित कडकडे ह्यांचे तुकारामाचे अभंग लोकप्रिय झाले असून सर्वात गेय आहेत हे जाणवते. ( क्रमश: )

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०११

तुकयाची नँनो 1

ई-तुका
तुकयाची नॅनो

८) लांबलचक शब्दांची मालगाडी व तिचा खडखडाट :
मराठी शब्दकोश पाहिला व त्यात पाच अक्षरे व त्याहून ज्यास्त असलेले शब्द मोजले तर आपल्याला आपल्या भाषेचाच कल अल्पाक्षराकडे आहे का ते समजेल. ह्या दृष्टीने वा.गो.आपट्यांचा शब्दरत्नाकर हा कोष पाहिला. आता सगळा कोश मोजणे जिवावर आले. म्हणून त्यात संख्येने ज्यास्त शब्द असलेले "स" पासून सुरू होणारे ५८८८ शब्द तपासले ( कोशात एकूण ६०,५५९ शब्द आहेत ). म्हणजे हा १० टक्क्याचा मासला ( सॅंपल ) होतो. तर " स"पासून सुरू होणारे ५व त्यापेक्षा ज्यास्त अक्षरांचे मोठे शब्द खुणा करून मोजले तर भरले एकूण ७१२. टक्केवारीत हे पडतात १२ टक्के. म्हणजे भाषेतच ८८ टक्के शब्द हे अल्पाक्षरी आहेत म्हणायचे. आता तुकाराम गाथेत आपल्याला अल्पाक्षरी शब्द आढळले होते एकूण ३० हजारापैकी २७४७९ म्हणजे ९१ टक्के. आता हे साहजिकच भाषेच्या कलाप्रमाणेच आहे हे दिसून येईल. आता साहजिकच लांबलचक मालगाडी सारखे शब्द असू नयेत हा नियम ओघानेच येतो व तो तुकारामांनी तंतोतंत पाळलेला आहे हेही लक्षात येते.
आपण जो आवाज काढतो तो टाळू, दात, दात व टाळू दरम्यानचा भाग, घसा, ह्या ठीकाणी जिभेचा वावर करून व नाक ह्यातून हे तर आता सर्वांना माहीतच असते. आपण जी हवा घेतो ती मोठे शब्द म्हणत असताना लगेच विरून जाते. म्हणजे आपली जी व्यवस्था आहे त्याप्रमाणेही अल्पाक्षरे हीच आपली निकड आहे. भाषेतले दोन अक्षरी शब्द मोजले ( स पासून सुरू होणार्‍या ५८८८ शब्दांपैकी ) तर ७५३ म्हणजे १२ टक्के. आणि नेमाडे संपादित अभंगगाथेतले पहिले १०० अभंग तपासले तर त्यात दोन अक्षरी शब्द निघाले २३०३ शब्द, म्हणजे २३ अल्पाक्षरे प्रति अभंग किंवा ३६ शब्दापैकी ( चार खंडांचा एक अभंग व एका अभंगात एकूण ३६ शब्द) २३ शब्द दोन अक्षरी भरले. तर अशा रितीने ७० टक्के शब्द तुकाराम महाराज दोन अक्षरी वापरतात हे दिसून येते. ते लांबलचक शब्दांची मालगाडी अशी टाळतात व त्यायोगे होणारा खडखडाटही मग टळतो.
हे अल्पाक्षरी काव्य करणे "येरा गबाळ्याचे " काम नाही हे आजकालच्या काही आधुनिक कवींच्या रचना अल्पाक्षरांसाठी मोजल्या तर लक्षात येऊ शकेल. "दृश्यांतर" ह्या चंद्रकांत पाटील संपादित पुस्तकातून विंदा करंदीकर, सुर्वे, कोलटकर, पाडगावकर, सुरेश भट, ह्यांच्या ३७७२ एकूण शब्द असलेल्या कविता तपासल्या तेव्हा त्यात अवघे १५६७ दोन अक्षरी शब्द आढळले. म्हणजे ४१ टक्के व हेच तुकारामाच्य अभंगात प्रमाण आहे दोन अक्षरी शब्दांचे ७० टक्के. अल्पाक्षरी काव्य ह्यात तुकाराम महाराजांची अशी हातोटी सिद्ध होते. ( क्रमश: )

-------अरूण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

गुरुवार, १३ जानेवारी, २०११

तुकयाची नँनो 7

ई-तुका
तुकयाची नॅनो--७

७) "न, ना" चे सांगणे संदर्भातले महत्व:
मतमतांचा इतका कोलाहल माजतो की साधकाला कोणता मार्ग बरोबर त्याचा संभ्रमच पडतो. व ही जाणीव सर्वकालीन असते. ती जशी तुकारामाच्या काळी होती तितक्याच तीव्रतेने आजच्या साधकालाही जाणवते. म्हणूनच कदाचित वारकरी संप्रदायामध्ये "माळ" म्हणजे गुरू करण्याचे फार महत्व आहे. खरा गुरू आपल्याला योग्य मार्गदर्शन करतो. कोणता मार्ग आपल्याला बरा राहील हे तर तो सांगतोच पण त्याचबरोबर कोणता मार्ग घेऊ नये हेही सांगतो. आजकालच्या संदर्भात तर हे फारच महत्वाचे ठरते. आपण शहरात पाहतो की एखाद्या ठिकाणी पोचायचे दोन तीन मार्ग असतात. पण काही मार्ग हे अडचणीचे असतात, ट्रॅफिक जामचे असतात. खरा मार्गदर्शक आपल्याला कोणता मार्ग घेऊ नकोस ते आधी सांगतो. हे त्याचे नकारार्थी मार्गदर्शन नसते तर तो आपल्या हिताचा कळवळा असतो. ह्याच कळवळ्यापायी काय काय करू नको असा नकाराचा दोष पत्करूनही तुकाराम महाराज त्यांच्या अभंगातून "न", "ना", "नाही" हे शब्द मुबलकपणे वापरून आपल्याला "सांगत" असतात.
प्रसिद्ध गुजराती कवी सुरेश दलाल ह्यांना एकदा मी विचारले होते की आजकाल कोणत्याही कवी लेखकाचे साहित्य त्याच्या मृत्यूपश्चात १५/२० वर्षात विस्मरणात जाते व असे असताना, ज्ञानेश्वर-तुकारामांचे साहित्य इतकी सातशे वर्षे कशामुळे टिकले असावे ? त्यांचे उत्तर मोठे बोलके होते. ते म्हणाले की त्यांची कलाकृती ही अगत्याने काहीतरी सांगण्याची होती, केवळ स्फूर्ती आलीय व लिहिले अशा प्रकारची नव्हती. तर "सांगणे" व ते ही कळकळीने, हे असे महत्वाचे ठरते, व ह्या सांगण्यात "हे हे करू नको" असे नकारार्थी सांगणे महत्वाचे व प्रत्ययकारी ठरते.
हे "सांगणे" प्रकरण किती सर्वदूर साहित्यात दबा धरून असते ते पहा. कादंबरी म्हणजे आजकाल नुसती कोणती तरी राजा राणीची कहाणी असत नाही तर तिने काही तरी सांगावे लागते. जसे भालचंद्र नेमाडे "हिंदू" ह्या कादंबरीतून ब्राह्मणांनी धर्म कसा बिघडवला हे सांगण्याचा निश्चय करतात. चित्र हे सुद्धा नुसते काही तरी टिपणारे नको असते तर ते बोलके असावे लागते. सिनेमाचेही आपण असेच परिक्षण करतो व चांगला उदात्त संदेश देणारा चित्रपट उत्तम असे ठरवतो. आपल्या जगण्यानेही काही तरी मानवतेला संदेश मिळावा अशीही आपली महत्वाकांक्षा असते. तर असे "सांगणे" मुख्य हेतू असताना साधकांची सोय म्हणून तुकाराम महाराज "काय करू नका" असे सांगतात व साहजिकच ते सांगताना "न", "ना", "नाही" हे शब्द भरपूर वापरतात. ह्या वापराने त्यांच्या सांगण्याचा संदर्भ सिद्ध होतो. ( क्रमश: )
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com