शनिवार, २७ नोव्हेंबर, २०१०

तुकयाची नँनो 1

तुकारामाची नॅनो !

रचनेतली नॅनो रचना:
नाव जरी "मोठा अभंग" असले तरी रचनेच्या दृष्टीने अभंग हे अक्षरवृत्त तसे अल्पाक्षरीच आहे. कारण प्रत्येक चरणात असावे लागतात फक्त सहा अक्षरे. अशी तीन चरणे व शेवटच्या चरणात चार अक्षरे. प्रथम शेवटचे चरण पाहू. चार अक्षरात दोन शब्द बसवायचे म्हटले तर ते असू शकतात प्रत्येकी दोन अक्षरी किंवा एक तीन अक्षरी व दुसरा एक अक्षरी. त्यात शेवटच्या चरणात एक प्रकारचा पंच किंवा फटका यायला हवा असतो जो दोन अक्षरी शब्दांनीच बहुदा साधला जातो. आता पहिल्या तीन चरणात सहा अक्षरात परत तोच पेच पडतो व मग अल्पाक्षरी शब्दच निवडावे लागतात. उपक्रम.कॉम नावाच्या संकेतस्थळावर देवळेकर ह्यांनी सबंध गाथाच संगणकाद्वारे तपासली तेव्हा त्यांना आढळले की सबंध गाथेत एकदाच वापरलेले शब्द मोजले तर ते भरतात ३० हजार. त्यापैकी २७,४७९ शब्द हे अल्पाक्षरी म्हणजे १ ते ४ अक्षरी आहेत, तर ५ पेक्षा ज्यास्त अक्शरे असलेले शब्द आहेत;२६५३.
आता कोणी नवख्या कवीला जर हे कोडे घातले तर तो साहजिकच म्हणेल अगदी अल्पाक्शरी शब्दच योजावेत. मग एकच अक्षर असलेले शब्द आपल्याला वापरणे सर्वात सोयीस्कर. ( जसे भल्या मोठ्या कादंबरीचे नाव श्रीमती महाजन ठेवतात एकाक्षरी "ब्र", व कदाचित कोणी पुरुष कादंबरीकार लिहील "ब्रा" ! ). असे एकच अक्षर असलेले वापरण्यायोगे व अर्थ असलेले शब्द होतात: उ, ए, ये, का, की, खा, खो, गा, गे, गो, घी, घे, घो, चि ( हे चि ), छे, छू, जा, जे, जो, ठो, तो, ती, दो, न, ना, नि, पी, पै, फू, बा, बी, बे, भे, मा, मी, या, ये, री, रे, वा, शी, हा, ही, हे, हो. आता ह्या शब्दांचा अर्थ होत असला तरी विषयाप्रमाणे व तेही काव्यात वापरण्यासारखे एकाक्षरी शब्द फारच कमी असतात. गाथेतले शब्द मोजायला संगणक जाणण्यार्‍यासाठी कोडच्या कळी आहेत पण मी एक अगदी सोपी युक्ती वापरतो. जसे "फाइंड" वर टिचकी देऊन आपल्याला कुठला शब्द मोजायचा तो खिडकीत लिहायचा व "फाइंड नेक्स्ट" टिचकावायचे की गाथेत तो शब्द कुठे असेल तिथे ब्लॉकमध्ये दिसतो व मग परत "फाइंड नेक्स्ट" व मोजायचे मनात दोन.... असे करत एकाक्षरी शब्द मी मोजले ते निघाले असे : ये--१४९ वेळा, हे--६०६ वेळा, गे--४७ वेळा, रे--४५७ वेळा, या---९५०वेळा, वा--५ वेळा, हा---६०० वेळा, ही---३५० वेळा, हे---५०० वेळा, हो---१५० वेळा, तू---१० वेळा, का--३५ वेळा, की--२ वेळा, खा---२ वेळा, गा---१४३ वेळा, जा---१५ वेळा, जे---१०० वेळा, जो---११५ वेळा, तो---११०० वेळा, चि---१३०० वेळा, ती--२३ वेळा, दो--६ वेळा, पै--१ वेळा, बा---४२ वेळा, भे--२ वेळा, मा-- २ वेळा, मी---४५० वेळा, ए--५ वेळा. खो, शी, उ,घी, घो, छे, छू, पी, ठो, बी, आणि बे, ही-अक्षरे एकही वेळ वापरली नाहीत.
वरील मोजकामात सर्वात ज्यास्त वापरलेला शब्द गवसला : चि ( हे चि दान दे गा देवा---ह्या छोट्या छोट्या शब्दातला चि ) जो भरला ४५८३ अभंगात १३०० वेळा. म्हणजे टक्केवारीत ( अभंग संख्येच्या वर) वापर होतो अवघा : २८ टक्के. पण तुकाराम महाराज हे निष्णात कवी आहेत. ते "न" हा शब्द वापरतात ; १७०९ वेळा, "ना" हा शब्द वापरतात: १२४ वेळा, व "नाही" हा शब्द वापरतात: २००० वेळा ज्यावरून तेच त्यांचे लाडके शब्द आपण म्हणू शकतो. ( कारण हा वापर भरतो ८३ टक्के ). हीच आहे तुकाराम महाराजांची रचनेतली नॅनो रचना ! ( क्रमश: )

मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०१०

मोठे अभंगकार

तुकाराम महाराज हे मोठे अभंगकार !
अभंग हे एक अक्षरवृत्त आहे. त्यात दोन मुख्य प्रकार आहेत. एक मोठा अभंग व दुसरा लहान अभंग.
मोठा अभंग चार चरणांचा असतो, पहिल्या तीन चरणात प्रत्येकी सहा अक्षरे, दुसर्‍या व तिसर्‍या चरणांशेवटी यमक असते. चौथे चरण फक्त चार अक्षरांचे असते. उदाहरण म्हणून प्रसिद्ध मंगलाचरण पहा: सुंदर ते ध्यान । उभे विटेवरी । कर कटेवरी । ठेवूनिया ॥
लहान अभंगात दोन चरण असतात, त्यात साधारणपणे प्रत्येकी आठ आठ अक्षरे असतात. उदाहरण म्हणून पहा: लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥ ज्याचे अंगी मोठेपण । तया यातना कठिण ॥ ( आठ अक्षरांऐवजी कधी नऊ तर कधी दहाही अक्षरे असतात.)
आता स्वत: तुकाराम महाराजांना कोणता अभंग आवडत होता ? जोग प्रतीत एकूण अभंग दिलेत ४१४९ व क्षेपक ( म्हणजे हे तुकारामाचेच आहेत ह्याविषयी संशय आहे असे ) अभंग ४०९. तर प्रथम मोजण्याच्या सोयीसाठी लहान अभंग कोणते आहेत त्यावर खुणा केल्या. हे सोयीचे कसे ? तर फक्त शेवटच्या शब्दांकडे पहायचे. ते यमकांनी शेवट होणारे असतील तर लहान अभंग. जसे : दया , क्षमा, शांती । तेथे देवाची वसती ॥ खुणा करून झाल्यावर त्यांची संख्या मोजली. १ ते १००० ह्या अभंगात लहान अभंग भरले : १५४३ ( खंड, चार किंवा पाच खंडांचा एक अभंग असतो ). आता १००० अभंगात खंड होते ४२३३. म्हणजे लहान अभंगांचे प्रमाण भरते: ३६.४५ टक्के. साहजिकच उरलेले मोठे अभंग मग भरतात : ६३.५४ टक्के. असेच १००१ ते २०००, २००१ ते ३०००, ३००१ ते ४००० व ४००१ ते ४१४९ व क्षेपक ह्यातून मोजले तर मोठया अभंगांचे प्रमाण अनुक्रमे भरले : ६१.११, ७०, ७०.८९, व ७०.७१ टक्के. म्हणजे मोठे अभंग सरासरीने आढळतात : ७० टक्के.
तर तुकाराम महाराज असे आहेत, मोठे अभंगकार !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

सोमवार, २५ ऑक्टोबर, २०१०

ढेकणाचे संगे अमेरिकन डायमंड भंगले

ढेंकणाचे संगे, अमेरिकन डायमंड, भंगले !
तुकाराम महाराज म्हणाले होते, ढेंकणाचे संगे हिरा जो भंगला !
कोणी ह्याची शहानिशा करायला धजत नाही. कारण न जाणो, खरेच जर हिरा ढेंकणाजवळ ठेवल्याने भंगला तर त्याचे पैसे भरावे लागतील. पण खर्‍या हिर्‍यापेक्षा, अमेरिकन डायमंड बरेच स्वस्त असतात. आता त्यावर पडताळा करून पहायला हरकत नव्हती. पण, इतके दिवस हे पडताळणे अवघड होते. कारण अमेरिकेत, अमेरिकन डायमंड आहेत, पण ढेंकूण नसायचे. पण आता अमेरिकेत, न्यू यॉर्कला, नुकत्याच आलेल्या बातमीवरून भरपूर ढेंकूण झाले आहेत.
ढेंकणाचे संगें हिरा जो भंगला । कुसंगें नाडला तैसा साधु ॥१॥ओढाळाच्या संगें सात्विक नासलीं । क्षण एक नाडलीं समागमें ॥ध्रु.॥डांकाचे संगती सोनें हीन जालें । मोल तें तुटलें लक्ष कोडी ॥२॥विषानें पक्वान्नें गोड कडू जालीं । कुसंगानें केली तैसी परी ॥३॥
भावें तुका म्हणे सत्संग हा बरा । कुसंग हा फेरा चौर्‍याशीचा ॥४॥
ह्या मूळ अभंगाचे अमेरिकेला आता चांगलेच प्रत्यय येत आहेत. भारतीय, कोरियन, चिनी, मेक्सिकन वगैरे लोक प्रचंड प्रमाणात गेल्या कित्येक वर्षांपासून स्थलांतरित होत आहेत. इतके की आता तिथे मॉल्स मध्ये मूळचे गोरे लोक फारच कमी दिसतात व काळे, मेक्सिकन, भारतीय, चिनी हेच लोक ज्यास्त दिसतात. आता राहणीमानाच्या दृष्टीने तुलना केली तर आपला त्यांना "कुसंग"च वाटणे साहजिक आहे. पचापच थुंकणे काय, नाकात बोटे घालणे काय, शरीराला दुर्गंधी येणे काय, दात खराब असणे काय, शिवाय एक ना अनेक व्याधी. तरी बरे पूर्वीचे खरूज, नायटे, सर्दीपडसे, खोकला वगैरे आजकाल नाहीयत. आता ह्या कुसंगाचा त्यांना प्रत्यक्ष फटका दिसतोय तो ढेंकणाच्या अमेरिकेत येण्याने.
आताच्या अमेरिकेला जाणार्‍यांना कल्पना नाही, पण पूर्वी ( ३० वर्षांपूर्वी ), अमेरिकेला जायच्या आधी एक पी फॉर्म भरून द्यावा लागायचा. त्यात सरकारी डॉक्टरांकडून तपासून घ्यावे लागे की तुम्हाला कॉलरा, पीतज्वर, टी.बी. वगैरे रोग नाहीत. आता कस्टम्सना नवीन यंत्रे बसवावी लागतील, सामानात, अंगावर, ढेकूण आहेत की नाही ते बघायला. हाच तो कुसंगाचा फेरा असावा !
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

सोमवार, ११ ऑक्टोबर, २०१०

तुकयाची ग्वाही 12

तुक्याची ग्वाही-१२
"मुंगिचिया घरा कोण जाय मूळ । देखोनिया गूळ धाव घाली ॥" ( १६२०, जोग प्रत)
ज्याला आपल्या स्वहिताची चाड, काळजी आहे त्याने आपण होऊन हरीकथेवर लक्ष द्यावे असे म्हणत असताना इथे तुकाराम महाराज व्यवहारातला दाखला देत आहेत तो असा की मुंगीला गूळ आवडतो तर ती आपण होऊन गुळाकडे धाव घेते, कोणी आमंत्रण ( मूळ पाठवणे) देण्याची वाट पहात नाही. तसेच जो दाता आहे त्याला देण्यात आनंद आहे तर त्याने कोणी याचना करण्या आधीच आपण होऊन दान द्यावे. अन्न व पाणी आपल्याला निमंत्रण देण्याअगोदरच आपण ते गिळंकृत करतो. ज्याला काही व्याधी, रोग झाला आहे तो आपण होऊनच वैद्याकडे धाव घेतो. असेच आपले हित हवे असेल तर आपण होऊन आपण हरीकथेकडे धाव घ्यायला हवी. आपल्या हिताचा कळवळा आपल्यालाच सहजतेने यायला हवा तरच तो परिणामकारक होईल, दुसर्‍याने सांगून करून काही उपयोग होत नाही असा हा रोकडा उपदेश आहे.

अरुण अनंत भालेराव
भ्र: ९३२४६८२७९२ arunbhalerao67@gmail.com

सोमवार, ४ ऑक्टोबर, २०१०

तुकयाची ग्वाही 11

तुक्याची ग्वाही-११
"डोळ्यामध्ये जैसे कणु । अणु तेंहि न साहे ॥ तैसे शुद्ध राखा हित । नका चित्त बाटवू ॥" ( १५७७, जोग प्रत )
आपल्या बाळाचा जसा कळवळा असतो तसा स्वहिताचा कळवळा राखावा असे इथे तुकाराम महाराज सांगत आहेत. एक छोटासा कण जरी डोळ्यात गेला तरी तो जसा डोळ्याला खुपतो, सहन होत नाही, तसेच इतर अनेक वासनांना दूर सारून फक्त स्वहिताचाच विचार करावा. इतर वासना चित्ताला जणु बाटवतात, तर त्या डोळ्यातल्या शल्यागत समजून त्या दूर साराव्यात. कुठलाही विचार दीर्घ पल्ल्याचा करायचा असेल तर तो सार रूप करून त्याचा प्रसार करतात तसे आपल्या स्वहिताचे करावे. इथे बीज रूपात साठवण करणे ही बाब फार मोलाचे दर्शन देणारी आहे. धान्याचे बीज चारशे पाचशे वर्षे टिकवलेले आपण जुन्या इजिप्शियन ममीच्या शेजारी सापडलेल्या बीजांवरून जाणतो, तसेच स्वहित हे माणसाने मूळ बीज समजावे.

अरुण अनंत भालेराव
भ्र: ९३२४६८२७९२ arunbhalerao67@gmail.com

रविवार, २६ सप्टेंबर, २०१०

तुकयाची ग्वाही 10

तुक्याची ग्वाही-१०
"अनुभवावाचून । सोंग संपादणे । नव्हे हे करणे । स्वहिताचे ॥" ( २५०१,जोग प्रत)
पूर्वी बहुरूपी नावाचे सोंग घेऊन मनोरंजन करणारे, खेळ करणारे लोक असत. अशा एखाद्या बहुरूप्याने देवाचे सोंग आणले पण तसा भाव, अनुभव घेतला नाही, तर त्याचे ते देवपण वाया जाणारे असते. दगडाच्या देवाला मनोभावे भजणारे भक्त तरून जातील, पण दगडाला मात्र दगड म्हणूनच रहावे लागते. धोत्र्याच्या झाडाला ( कनक ) आपण जरी सोन्याचे ( कनक ) झाड म्हणून मानले तरी ते काही सोन्याचे मोल पावणार नाही. संत तुकाराम महाराजांचे मोठेपण असे आहे की त्यांचे उपदेश व विचार सार्वत्रिक व वैश्विक असे ठरतात. कारण असाच उपदेश एके ठिकाणी शेक्सपीयरनेही दिलेला आहे. तो म्हणतो की जे चमकते ते सर्वच काही सोने नसते. व्यवहारात तर हा उपदेश फारच महत्वाचा आहे. आपण जर शेजार्‍याशी तुलना करीत त्याच्याच सारखे श्रीमंतीचे सोंग आणले, पण तसा खरा अनुभव नसेल तर आपली किती तारांबळ उडते ते प्रत्येकालाच माहीत आहे. असेच राजकारण्यांचे होते. ते आव भले आणतात, जनसेवेचा पण त्यांची अमाप संपत्ती पाहिली की लोकांना खरा अनुभव येतो. सर्व काळी खरे ठरणारे वचन हे असे असते.

अरुण अनंत भालेराव
भ्र: ९३२४६८२७९२
arunbhalerao67@gmail.com

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०१०

तुकयाची ग्वाही 9

तुक्याची ग्वाही--९
"आपुल्या हिताचे । न होती सायास । गृहदारा आस । धनवित्त ॥"(६३२,जोग प्रत)
बुद्धीचा पालट धरा रे कांही, मागुता हा नाही, मनुष्यदेह, अशी विनवणी करणारे तुकाराम महाराज, अध्यात्मातले तत्व सांगतात की जन्म मृत्यू ह्या उपाध्या माणसाने का भोगत रहाव्यात ? फारा पुण्यानंतर मिळणारा मनुष्यदेह मिळाल्यावर चांगले काम करणे हेच आपल्या हिताचे आहे. आपल्या जे हिताचे आहे ते करण्यात काही सायास होत नाहीत हे सोपे तत्व तसे पटण्यासारखे आहे. आणि सगळ्या घरादाराची, धनाची आस असणे हेही साहजिकच आहे. म्हणून हा मनुष्य देह लाभल्यावर भगवंताचे स्मरण ठेवणे हेच आपल्या हिताचे आहे, कारण त्याने पुढच्या गर्भवासापासून सुटका मिळणार आहे. खरोखर ज्या संबंधामध्ये आपले हित आहे अशा संबंधाची खटपट आपल्या हातून व्हायला हवी. ही खटपट न झाली तर मग मात्र मुद्दाम कराव्या लागणार्‍या सायासा सारखे अवघड जाणार आहे. इथेही स्वहिताची जपणुक करणे हाच व्यवहारी मार्ग तुकाराम महाराज सुचवत आहेत.

अरुण अनंत भालेराव
भ्र: ९३२४६८२७९२ arunbhalerao67@gmail.com