बुधवार, ३१ मार्च, २०१०

ई-तुका सकल संपूर्ण

ई -तुका : ७

ईतुका सकल संपूर्ण !

तुकाराम महाराज जर संगणकावर अवतरले तर आपल्याला त्यांना ई-तुका म्हणावे लागेल. पण फरक इतुकाच राहणार नाही तर बरेच नवे काही संगणक आपल्याला सांगेल.
संगणकाचे युग हे वेगाचे युग असते. संगणकावर लिहिण्याचा वेग, तो अपलोड होण्याचा वेग, तुकारामाचे अभंग डाऊनलोड करण्याचा वेग, असे सगळे वेगवान जग, प्रथम मोजते तो वेगच ! तुकाराम महाराजांना सगळ्यात अप्रूप कशाचे होते तर ते शब्दांचे. म्हणूनच ते म्हणाले होते : "आम्हा घरी धन, शब्दाची च रत्ने । शब्दाचीच शस्त्रे, यत्न करू ॥ शब्द चि आमुच्या, जीवाचे जीवन । शब्दे वाटू धन, जनलोका ॥ तुका म्हणे पाहा, शब्द चि हा देव । शब्दे चि गौरव, पूजा करू ॥" तुकाराम महारांच्या गाथेचे देहू प्रत, जोग प्रत, शासकीय प्रत वगैरे अनेक प्रती आहेत. पैकी देहू प्रत संगणकावर उपलब्ध असून ती तुकाराम.कॉम ह्या वेबसाईटवर ही पाहता येते. तुकाराम महाराजांच्या ह्या गाथेत एकूण ४५८३ अभंग आहेत. आता इतक्या प्रचंड गाथेत एकूण शब्द किती असतील बरे ? प्रत्यक्ष पुस्तकात (हार्ड कॉपी) एकेका पानावर शब्द मोजायचे म्हणजे फार जिकीरीचे काम. शिवाय संगणक युगात असं मोजत बसलं तर हसं होईल ते होईलच. संगणकाकडूनच एकूण शब्द मोजता आले तर मात्र ते आधुनिक वाटेल. तर ही प्रत वर्ड हया प्रकारात उघडून त्यातल्या वर्ड-काऊंट सवलतीचा उपयोग केला तर? करून पाहिले तर एकूण शब्द गाथेत निघाले : दोन लाख,तीन हजार आणि सातशे पन्नास ( २,०३,७५० शब्द ). संगणकावर फार विश्वास टाकता येत नाही. कधी कधी आपल्या चुकीने चुकीचे उत्तरही येऊ शकते. म्हणतातच की संगणक म्हणजे गार्बेज इन गार्बेज आऊट ( कचरा आत तर कचरा बाहेर ! ). मग ह्याचा प्रत्यक्ष प्रतीतल्या (हार्ड कॉपी) एका पानावरचे शब्द मोजले तर ते निघाले :२१५ व अशी पाने भरली ९५५. म्हणजे अंदाजे शब्द २,०५,३२५. हे संगणकाच्या वर्ड-काऊंटच्या २,०३,७५० शब्दांच्या बरेच जवळचे आहे म्हणून बरोबर असणार. आता तुकाराम महाराजांनी हे सर्व शब्द वयाच्या ४२ व्या वर्षापर्यंत लिहिलेले आहेत. साधारण विसाव्या वर्षी त्यांचे कवित्व सुरू झाले असेल असा अंदाज धरला तर २२ वर्षांचा सर्जनशील कालखंड मिळतो. भागाकार केल्यावर हे भरतात दिवसाकाठी २५ शब्द !
दिवसाकाठी २५ शब्द हा वेग प्रचंड का खूप कमी हे आता पाहू या। मागच्या वर्षी महाराष्ट्र-काव्य भूषण हा किताब मिळालेले बहु-प्रसव कवी मंगेश पाडगावकर यांचा वेग तुलना करण्यासाठी बघू. मंगेश पाडगावकरांचे समग्र साहित्य तसे त्यांच्या प्रकाशकांकडे संगणकावर उपलब्ध असणार. पण ते आपण थोड्याशा अदमासाने ताडू शकतो. त्यांच्या "गिरकी" ह्या काव्यसंग्रहात एकूण शब्द आहेत ८,८००. त्यांचे अशी एकूण पुस्तके आहेत:४५ (शेवटच्या "शब्द" पर्यंत ). तर त्यांची एकूण शब्दसंपदा भरेल अंदाजे: ४५*८८००=३,९६,००० शब्द ! आणि त्यांनी हे सर्व उभे केले वयाच्या २० व्या वर्षापासून आत्ताच्या ८२ व्या वर्षापर्यंत म्हणजे एकूण ६२ वर्षात. मग हा वेग भरतो दिवसाकाठी १७ शब्द ! सध्याच्या युगातले अगदी हातखंडा चपखल शब्द देणारे कवी सराव करतात दिवसाकाठी १७ शब्दांचा, तर ईतुका त्यांच्या दीडपट ! कवी मंगेश पाडगावकरांना ह्या तुलनेचा राग येणार नाही हे तर नक्कीच पण इथे तुकाराम महाराजांच्या प्रचंड प्रतिभेचे दर्शन घडते आणि ईतुका आकाशाएवढा हे सप्रमाण पहायला मिळते ! अगदी त्यांच्याच शब्दात " सकल संपूर्ण गगन जैसे ! "

अरुण अनंत भालेराव , १८६ / ए -१ , रतन पलेस ,गरोदियानगर ,घाटकोपर (पूर्व ) मुंबई -४०००७७ टेलिफोन : ९३२४६८२७९२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा