रविवार 19 डिसेंबर 2010

तुक्याची नॅनो---५
"न, ना" द्वारे सुजाण पालकत्व :
तुकाराम महाराज हे सदगुरू आहेत. सदगुरूचे उत्तरदायित्व मोठे कठिण असते. साधकाला संभ्रमात टाकणारे इतके मार्ग असतात की, "वाया आणिका पंथा जाशी झणी" अशी भीती वाटत असते. साधकाचे हित ध्यानात ठेवून त्याला योग्य व नेमका मार्ग सांगावाच लागतो. मग त्यात "असे करू नको", "तसे करू नको" किंवा बहुतेक पालक जसे "डोंट प्ले नाउ". "डोंट वेस्ट टाइम" अशी काय करू-नकोची भाषा बोलतात, तसे ते बोलतात. हे नाही केले तर हमखास "वाया जाणे" येतेच. मग सदगुरूला "बॅड पेरेंटिंग"चा दोष पत्करून नेमके मार्गदर्शन करावेच लागते. सुलभ रहदारीच्या नियमात सुद्धा आपण पाहतोच की "नो एंट्री" ची नितांत गरज भल्या भल्या ठिकाणी पडतेच. ही नकारात्मकता फायद्याचीच असते.
संसारात राहावे का परमार्थ करण्यासाठी संसारत्याग करावा हा खरे तर एक कूट प्रश्न आहे. संत रामदासांना अगदी कळकळीने वाटले की संसार करू नये. म्हणूनच तर ते सावधान म्हणताच लग्नमंडपातून पळ काढते झाले. प्रश्न असे गहन असता त्याचे थोडक्यात नेमके उत्तर देणाराच गुरू असतो. म्हणून ते सांगतात "जोडोनिया धन । उत्तम वेव्हारे । उदास विचारे । वेच करी ॥ ". ज्याला आपला कळवळा आहे तोच कोणा तत्वज्ञांची तमा न बाळगता असा व्यवहारी सल्ला देऊ धजेल. आणि हेच खरे पालकत्व निभावणे झाले. नकारात्मतेची फारशी तमा न बाळगता मग तुकाराम महाराज आपले, साधकाचे, असे पालकत्व स्वीकारतात. म्हणूनच ते रोखठोक सल्ला देतात की "नाही निर्मळ जीवन । काय करील साबण ॥".
इंग्रजीत कुठल्याही विषयावरचे दोन पर्याय असतात त्यांना म्हणतात : डूज आणि डोंट्स. म्हणजे काय करावे व काय करू नये. ह्यात काय करावे हे सकारात्मक सांगणारे नियम किंवा कमांडमेंटस असतात तितक्याच महत्वाचे डोंटस म्हणजे काय करू नये ते सांगणारे नियम असतात. खरा पालक नेहमी डोंटस वर ज्यास्त जोर देत असतो. त्याची ज्यास्त धास्ती बाळगतो. हे पालकत्व तुकाराम महाराज फार उत्तम निभावतात ते असे नकारात्मक डोंटस सांगून
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा