शनिवार, २९ ऑक्टोबर, २०११

वैद्य झाला तुका

----------------------------------------------------------------------------------------

वैद्य झाला तुका:१
----------------------------------------------------------------
वैद्य एक पंढरिराव । अंतर्भाव तो जाणे ॥1॥
रोगाऐशा द्याव्या वल्ली । जाणे जाली बाधा ते ॥ध्रु.॥
नेदी रुका वेचों मोल । पाहे बोल प्रीतीचे ॥2॥
तुका ह्मणे दयावंता । सदा चिंता दीनांची ॥3॥
----------------------------------------------------------------------------------------------
आदर्श वैद्य कसा असावा ह्याचे तुकाराम महाराज इथे स्मरण करत आहेत. आदर्श वैद्य हा पांडुरंगासारखा ( पंढरीराव) असावा. पांडुरंग जसा शरण आलेल्या भक्ताचा अंतर्भाव जाणून घेतो तसा आदर्श वैद्य प्रथम पेशंटच्या शरीरात त्याला ( पेशंटला) माहीत असलेले अगर माहीत नसलेले असे कोणते रोग झाले आहेत त्याचे निदान करतो. त्याला कोणत्या रोगाची बाधा झाली आहे ते जाणून घेतो. जसा रोग असेल तशा त्यावर लागू होणार्‍या वृक्षवल्लींचे, जडीबुटींचे, औषध देतो. परमेश्वर जसा आपल्या भक्ताची चिंता वाहतो व त्याला एक पैही खर्च लागू नये अशी काळजी घेतो तशीच काळजी एका आदर्श वैद्याने आपल्या रुग्णाची घ्यायला हवी. त्याला भारी मोलाची औषधे घ्यायला भाग पाडू नये, त्याचा एक रुपयाही खर्च होणार नाही असे पहावे ( नेदी रुका वेचों मोल ). महागडी औषधे घ्यायला न लावता, जी योग्य आहेत व जी हमखास लागू होणारी औषधे आहेत तीच त्याने द्यावी. आजच्या काळात तुकाराम महाराज असते तर कदाचित म्हणाले असते की आदर्श वैद्याने रोग्याला विनाकारण महागड्या टेस्ट करायला लावू नये, इतके आजकाल महागड्या परीक्षांचे स्तोम माजलेले आहे. परमेश्वर जसा आपल्या भक्ताचे अंतर्मन व अंतर्भाव आपोआप ओळखतो तसे आदर्श वैद्याने केवळ जुजबी नाडी परीक्षेने रोग्याचा रोग पीडा अचूक ओळखावी. रोगाची जाण होणे ही अर्धी लढाई जिंकण्यासारखेच असते. एकदा रोग निदान झाले की त्यावर उपाय म्हणून आपल्याकडे वनस्पती, वल्ली, जडी बुटी अशा प्रकारची औषधे हमखास असतात व ती एकदा वैद्याच्या सल्ल्याने योग्य मात्रेने घेतली की माणसाचा रोग लगेच गायब व्हायला वेळ लागत नाही. पांडुरंगाला जशी दीन गरीब भक्ताची दया असते व त्यांची तो चिंता वाहतो तसेच आदर्श वैद्याने आपल्या गरीब पेशंटस्‌ची काळजी करायला हवी. त्यांना आधीच महागाईने जीव मेटाकुटीला आलेला असतो. तेव्हा त्यांना महागडी औषधे न देता रास्त किंमतीची व अगदी परिणामकारक अशी औषधे, तीही माफक किंमतीचीच, द्यावीत.
तुकाराम महाराज आजच्या काळात असते तर ते खचितच आजकाल रोगापेक्षा औषधांच्या दुष्परिणामांबाबत बोलते झाले असते. आजकाल आधुनिक मेडिकल शास्त्रातल्या ऍलोपॅथीच्या प्रथेप्रमाणे आपण जी औषधे घेतो त्यांचा रोगावर प्रभाव पडण्याबरोबरच रोग्याच्या इतर व्यवस्थांवर गैरपरिणाम करणारे प्रभाव पडतात असे आपण पाहतो. आणि इथेच आयुर्वेदाचे महत्व कोणालाही पटावे. कारण ह्यातली औषधे रोगावर प्रभावी ठरतातच व त्याचबरोबर रोग्यावर इतर दुष्परिणाम करीत नाहीत.
रोग्याला व्याधीची पीडा सहन करीत असताना ज्या वेदना होतात, पीडा होतात त्यातून त्याला वाचवणारा वैद्य हाच त्याला त्यावेळी परमेश्वरासारखा असतो ह्याची जाणीवही तुकाराम महाराज इथे वैद्याला पंढरीरावाची उपमा देऊन फार छान करून देतात. हे वर्णन करताना ते रोग्याची मनोव्यथा फार खुबीने चितारत आहेत. व त्यावर आदर्श वैद्याने कशी करुणा वर्षावी त्याचा उपदेश करतात.

-------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा