गुरुवार, ६ जून, २०१३

हंगामा

------------------------------------------
जब के तुझ बिन नहीं कोई मौजूद
फिर ये हंगामा ऐ ख़ुदा क्या है ?
---------------------------------------
    माझे असे एक पाहणे आहे की साधारणपणे ज्या काळात एका मोठ्या माणसाला जे वाटत असते अगदी तसेच दुसर्‍या कोणाला तरी तसेच वाटत असते व तोही तसेच म्हणत असतो. फरक असतो तो भाषेचा, प्रदेशाचा किंवा श्रेणीचा ( डिग्रीचा )  !
    आता वरील गालिबचा शेर आपण सरळ अर्थाने काय म्हणतोय हे पाहिले तर कळेल की
"जर तुजविण नाही कोणी हजर दुसरे
तर गोंगाट/गडबड/बोभाटा हा देवा, काय रे ?"
    आता असेच तुकाराम महाराजांनी म्हटले आहे काय, ह्याचा शोध घेता हा अभंग सापडतो :
पावलें पावलें तुझें आह्मां सर्व । दुजा नको भाव होऊं देऊं ॥
जेथें तेथें तुझीं च पाउलें । त्रिभुवन संचलें विठ्ठला गा ॥ध्रु.॥
भेदाभेदमतें भ्रमाचे संवाद । आह्मां नको वाद त्यांशीं देऊं ॥
तुका म्हणे अणु तुजविण नाहीं । नभाहूनि पाहीं वाढ आहे ॥
    "तुज बिन नही कोई मौजूद" च्या ऐवजी तुकाराम महाराज म्हणत आहेत : "तुका म्हणे अणु तुजविण नाही" . इथे गालिबच्या "कोई"ची वरची डिग्री "अणु"ने दाखविली आहे. तसेच तू सर्व व्यापून आहेस हे सांगताना वरची श्रेणी दाखविलीय ती अणू असूनही "नभाहूनि पाही वाढ आहे" असे म्हटले आहे.
    तसेच "हंगामा"चे हुबेहुब वर्णन "भेदाभेदमते भ्रमाचे संवाद" ह्या भाषांतराने साधले आहे. "तुजबिन नही कोई मौजूद" ह्याचाच अर्थ असा होतो की "सगळीकडे तूच व्यापून आहेस". आणि ह्या अर्थासाठी तुकाराम महाराज म्हणतात : "जेथे तेथे तुझीच पाउले । त्रिभुवन संचले विठ्ठला गा ॥"
    गालिबने जो गझल मध्ये प्रश्न विचारला आहे ( फिर ये हंगामा ऐ खुदा क्या है ? )  त्याचे जणु उत्तरच तुकाराम महाराज देत आहेत ते असे : "पावले पावले तुझे आम्हा सर्व । दुजा नको भाव होऊ देऊ ॥"
    असे पाहिले तर ही तुकारामाची गझलच झाली की, अगदी गालिबच्या हंगामाच्या तोडीची !
-------------------------------------------

सोमवार, १८ मार्च, २०१३

यमकातून अनुप्रास

यमकातून अनुप्रास
-------------------------
यमक जसे शेवटच्या शब्दातल्या शेवटच्या अक्षराच्या आवर्तनाने तयार होते व ते जसे उच्चाराच्या साधर्म्यामुळे लक्ष वेधून घेते  तसाच अनुप्रास हा अलंकार एका अक्षराच्या बर्‍याच वेळा म्हणण्याने तयार होतो हे आपणास माहीत आहेच. लहान मुले हा अलंकार "चंदू के चाचाने , चंदू की चाची को,  चांदनी रातमे, चांदी के चमचसे, चटणी चटायी." असे मोठ्याने म्हणून दाखवतात.  हा अलंकारही उच्चाराच्या चमत्कृती मुळेच तयार होतो. ह्यामुळे काव्य लक्षात राहण्याजोगे होते. अभंग ही रचनाच अनुप्रास साधण्यास फार सोयीस्कर आहे. कारण यमकामुळे चार चरणांपैकी दोन चरणात आधीच अक्षराची द्विरुक्ती झालेली असते. आता फक्त पहिल्या व चौथ्या चरणात यमकाचेच अक्षर असलेला शब्द योजला की झाला अनुप्रास अलंकार. जसे : "उजवला काळ । कुळा लाविला विटाळ ।( २०६ जोग प्रत )"; "मानामान मोह माया मिथ्या ( १९९ जोग प्रत )" ; "दीनानाथा कृपाळुवा । सांभाळावे आपुल्या नावा ॥ ( २९३ जोग प्रत )"; "हिरा हिरकणी । कांढी आंतुनि अहिरणीं ॥ ( ३६४, जोग प्रत )"; "फळले ते लवे भारे । पिक खरे आले तईं ॥ ( ५०४ जोग प्रत )"; "अनुभवे अनुभव अवघाचि साधिला । तरि स्थिरावला मनुं ठायीं ॥ ( ७८३, जोग प्रत )"; "जीवाचे जीवन अमृताची तनु । ब्रह्मांड भुषणू नारायण ॥ सुखाचा सांगात । अंतकासी अंत । निजाचा निवांत । नारायण ॥ गोडाचेहि गोड । हर्षाचेही कोड । प्रीतीचाही लाड । नारायण ॥ भावाचा निजभाव नावाचाही नाव । अवघा पंढरी राव । अवतरलासे ॥ तुका म्हणे जें हे साराचेही सार । माझा अंगीकार तेणें केला ॥ ( १०९०, जोग प्रत )"; "अनंता अरूपा अलक्षा अच्युता ( १२५६ जोग प्रत )"; "भला भला पुंडलिका । मानलासि जनलोकां । ( १४०९, जोग प्रत )"; "जीव जीती जीवना संगे । मत्स्या मरण त्या वियोगे ॥ ( १६१९,जोग प्रत )"; "वेधीं वेधें जीव वेधियेला । ( १६८४,जोग प्रत )"; "गांठ पडली ठका ठका । ( २२२५ जोग प्रत ) "; "आशय शयन भजन गोविंदे । भरले आनंदे त्रिभुवन ॥ ( २३५५ जोग प्रत )"; "रंगी रंगे नारायण ( ३२०१ जोग प्रत )"; "लय लये लखोटा ( ३७२० जोग प्रत )"; "तुका तुकासी तुकला । तुका तुकाहुनि निराळा ॥ तुकी तुकला तुका । विश्वीं भरोनि उरला लोकां ॥".
    अक्षराच्या पुनरावृत्तीने जसा अनुप्रास सजतो तसाच तो एखाद्या संपूर्ण शब्दाच्या परत परत आवृत्त होण्यानेही होतो. पण त्यात उच्चाराच्या साधर्म्यापेक्षा त्या शब्दाला ठसविण्याची प्रक्रिया ज्यास्त होते. भक्तिमार्गात नाम संकीर्तनाची परंपरा आहेच. त्यामुळे विठ्ठल किंवा पांडुरंग शब्द प्रत्येक चरणात योजला तर त्यामुळे तो ठसविला तर जातोच पण त्याला नामसंकीर्तनाचे ही रूप येते. जसे : "विठठल आमचे जीवन । आगमनिगमाचे स्थान । विठठल सिद्धीचे साधन । विठठल ध्यान विसावा ॥ विठठल कुळींचे दैवत । विठठल वित्त गोत चित्त । विठठल पुण्य पुरुषार्थ । आवडे मात विठठला ॥ विठठल विस्तारला जनी । सप्तही पाताळे भरूनी । विठठल व्यापक त्रिभुवनी । विठठल मुनिमानसी ॥ विठठल जीवाचा जिव्हाळा । विठठल कृपेचा कोंवळा । विठठल प्रेमाचा पुतळा । लावियेले चाळा विश्व विठ्ठल ॥ विठठल बाप माय चुलता । विठठल भगीनी भ्राता । विठठलेंविण चाड नाही गोता । तुका म्हणे आता नाही दुसरे ॥ ( ४०६४, जोग प्रत ). " विठठल ह्या शब्दाच्या सारख्या येण्याने सर्व जोर "विठठला"वर येतो व वातावरण "विठठल"मय होते. अशाच होणार्‍या परिणामामुळे सध्या कौशल इनामदार जे समूहगीत "मराठी अभिमान गीत" म्हणून गाववून घेत आहेत त्या सुरेश भटांच्या गजलेत "मर्‍हाटी" शब्द इतका सातत्याने येतो की सगळे महत्व "मराठी"वर येते व मग ते खरेच "मराठी अभिमान गीत" वाटू लागते. अशा रचना करण्यात तुकाराम महाराजांचा हातखंडा आहे. म्हणूनच ते रचतात : " विठ्ठल गीती गावा विठठल चित्ती घ्यावा । विठठल उभा पहावा विटेवरी ॥ ( ५४२ जोग प्रत ) ." ; "विठठल गीती विठठल चित्ती । विठठल विश्रांती भोग जया ॥( ६४८जोग प्रत )" ; "विठठल टाळ विठठल दिंडी । विठठल तोंडी उच्चारा ॥ ( १०२८ जोग प्रत)"; "विठठल भीमातीर वासी । विठठल पंढरी निवासी । विठ्ठल पुंडलिकापासी । कृपादाना विसीं उदार ॥ ( ४११६ जोग प्रत )"; "विठठल विठठल येणे छंदे । ब्रह्मानंदे गर्जावे ॥ ( २२१६ जोग प्रत )" ; "विठठल सोयरा सज्जन सांगाती । विठठल हा चित्ती  बैसलासे ॥ ( ४६२ जोग प्रत)"; "विठठाला रे तू उदारांचा राव । विठठला तू जीव या जगाचा ॥ ( २९७ जोग प्रत )" .....वगैरे. कृष्णाच्या नामसंकीर्तनाचा एक अभंग आहे. यातही "कृष्ण" अनुप्रासाने सर्वत्र वावरतो : "कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता । बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा ॥ कृष्ण माझा गुरू कृष्ण माझे तारू । उतरील पैल पारू भवनदीची ॥ कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन । सोईरा सज्जन कृष्ण माझा ॥ तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा । वाटे न करावा परता जीवा ॥". मग अशाच प्रकारचे रचनाकौशल्य तुकाराम महाराज अध्यात्मातल्या काही संदिग्ध कल्पनांना ठसविण्यासाठी करतात. जसे खरे खोटे पडताळण्यात "लटिके" काय काय आहे ते ठसविण्यासाठी ते म्हणतात : "लटिके ते ज्ञान लटिके ते ध्यान । जरि हरिकीर्तन प्रिय नाही ॥ ( २००० जोग प्रत)" ; "लटिके हासे लटिके रडे । लटिके उडे लटिक्यांपे ॥ लटिके माझे लटिके तुझे । लटिके ओझे लटिक्याचे ॥ लटिके गाये लटिके ध्याये । लटिके जाये लटिक्यांपे ॥ लटिका भोगी लटिका त्यागी । लटिका जोगी जग माया ॥ लटिका तुका लटिक्या भावे । लटिके बोले लटिक्यासवे ॥ ( २०९६ जोग प्रत ) .". अशाच एका "फटकाळ" ह्या शब्दाला ठसविण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात : "फटकाळ देव्हारा फटकाळ अंगारा । फटकाळ विचारा चाळविले ॥ फटकाळ तो देव फटकाळ तो भक्त । करवितो घात आणिका जीवा ॥ तुका म्हणे अवघे फटकाळ हे जिणें । अनुभवी ये खूणे जाणतील ॥ ( २५२४ जोग प्रत ) ".

मंगळवार, १२ मार्च, २०१३

तुकारामाचे अभंग-बिभंग !


तुकारामाचे अभंग-बिभंग !
ध्वनीच्या सारखेपणामुळे जसा यमक हा शब्दालंकार घडतो व तो तुकाराम महाराज आपल्या पद्यरचनेत यथेच्छ वापरतात, तसाच ध्वनीच्या सारख्या व पुनरावृत्तीत होणार्‍या उच्चारामुळे निर्माण होणारा एक खासा "लोकोच्चार" तुकाराम महाराज मुबलक प्रमाणात वापरतात. ही एक खाशी लकब असून विशिष्ट प्रांतीयपण हिला असते. जसे: पंजाबी लोक द्विरुक्ती करीत एखादा शब्द वापरतात. जसे: शादी-वादी ; खाना-पीना ; दारू-शारू ; रोना-धोना ; वगैरे.  मूळ क्रियेच्या शब्दाला यमक देत अशा जोड्या बनवण्यात पंजाबी लोक माहिर-फाहिर असतात. नेहमीच्या बोलण्यातल्या ह्या ढबीला एक प्रकारचे लोककलेचे रूपच मिळते. द्विरुक्ती मुळे मुद्दा ठसतो, उच्चार साधर्म्यामुळे लक्ष वेधल्या जाते, नाद-माधुर्य येते, तर नेहमीच्या वापरातल्या ह्या लकबीमुळे काव्याला संवादमयता लाभते. त्याचबरोबर हे शब्द मूळ आवाजाचेच वर्णन करणारे वाटतात. ना.गो.कालेलकर "ध्वनिविचार" ह्या पुस्तकात अशा शब्दांना ध्वन्यनुकारी शब्द म्हणतात ( इंग्रजीत ओनोमाटोपिया ) . शब्दांनी व्यक्त करण्याच्या कल्पनेला साह्यभूत असे ध्वनी अशा शब्दात वापरलेले असतात. उदाहरणार्थ : पंख; फडत्कार, मासा, कोकिळ ( इंग्रजीतला कक्कू ), कावळा, चिमणी, कावकाव , चिवचिव वगैरे. तसेच नुसते आनंद म्हटल्याने जो बोध होतो तो आनंदी-आनंद या द्विरुक्तीने अधिक परिणामकारक बनतो. अशी उदाहरणे तुकाराम महाराजांच्या गाथेत मुबलक प्रमाणात दिसतात व ते आपल्या वेगळेपणाने आपले लक्ष वेधून घेतात. जसे : "तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊ वाटा आमुचिया ॥" ; "सोंवळ्या-ओवळ्या  राहिलो निराळा । पासूनि सकळां अवघ्या दुरीं ॥" ; "तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुखदु:ख जीव भोग पावे ॥" ; "सदा तळमळ । चित्ताचिये हळहळ ॥ "; "मनाच्या तळमळे । चंदने ही अंग पोळे ॥"; "होतो उठाउठी । लवकरीच उतार ॥"; "लये लये लखोटा । मूळबंदी कासोटा ॥"; "बहु केली वणवण । पायपीटी जाला सीण ॥ "; "तुका म्हणे येर दगडाची पेवें । खळखळ अवघे मूळ तेथे ॥"; "जीवना वेगळी मासोळी । तुका म्हणे तळमळी ॥"; "नानामृत कल्लोळ । वृंदे कोंदली सकळ । आले वैष्णवदळ । कळिकाळ कांपती ॥"; "जनकाची नंदीनी दु:खे ग्लानी थोरी । चुकली कुरंगिणी मेळा तैशा परी । संमोखी त्रीजटा स्थिर स्थिर वो करी । घेइल तुकयास्वामी राम लंकापुरी ॥"; "मनीं धृढ धरि विश्वास । नाही सांडीमांडीचा सायास । साधुदर्शन नित्यकाळ त्यास । तुका म्हणे जो विटला जाणिवेस रे ॥ "; "जे का रंजले-गांजले । त्यासि म्हणे जो आपुले । "; "बरवे बरवे केले विठोबा बरवे । पाहोनि आत क्षमा अंगी कांटीवरी मारविले ॥"; "पावलो पावलो । देवा पावलो रे ॥"; "भरिला उलंडूनि रिता करी घट । मीस पाणियाचे गोविंदाची चट । चाले झडझडा उसंतूनि वाट । पाहे पाळतूनि उभा तोचि नीट वो ॥": ...वगैरे. ( विस्तारभयापोटी चरण न उद्‌धृत करता नुसते असे लोकोच्चारी शब्द वानगीदाखल आता देत आहे. ते असे : येणे-जाणे ; परता-परता ; सासू-सून ; काज-काम ; धांवति-धांवति ; बहुती बहू : बोभाटा; बाप-माय ; जाणीव-नागवण ; जाणीव-नेणीव; मोलाची महिमा ; फजीती फुका ; प्रवृत्ती-निवृत्ती; धांगडा-धिंगा ; बोध-बिरडे ; पाहे-बाहे ; ठायी ठायी ; जन धन तन ; ऋद्धि-सिद्धि ; शुभाशुभ ; हर्षामर्ष ; जीव-शीव ; कर्म-अकर्म ; पाटी-पोटीं ; थोडें-फार ; अंत-पार ; नव्हे नव्हे ; बहु थोडे ; ठकावला ठायी ; लाभ हानी ; देखीचा दिमाख ; जीवाचे जीवन ; वेळ-अवेळ ; भीड-भार ; दान-धर्म-शीळ ; शिणले-भागले ; तान-भूक : घात-पात ; रानी-वनी ; घडी घडी ; पडपडताळा ; क्षराक्षरावेगळा ; ठावा ठाव ; दुमदुमले ; खेळीमेळी ; नटनाट्य ; कर्मधर्म ; जैसा तैसा ; लीनदीन ; जें जें तें तें ; जप तप अनुष्ठान ; बोलोंचालों ; तुकी तुकला ; काढाकाढी ; पाठी-पोट ; कोंडा-कणी ; वटवट ; जन वन ; सडा संमार्जन ; देणे घेणे ; कर कर ; बाळ बडिवार ; आशा पाश ; भेदा भेद ; टाळ घोळ ; उभा उभी ; रात्रंदिस ; दिवस रजनी ; हाड हाडी ; ताळा वाळा ; चाळवा चाळवी ; तोंवरी तोंवरी ; रूप नाव ; आकार विकार ; निर्गुण सगुण ; चरफडे चरफड ; धिंदा धिंद ; गाठ पडली ठका ठका ; टाळाटाळी ; साटो वाटी ; यावा गांवा ; खण खणां ; भेदा भेद ताळा ; तडा तोडी ; गदारोळ ; फाडा फाडी ; बुर बुर ; घस घस ; घडघडाट ; थू थू ; डग मगी ; झाडा पाडा ; ठेला ठेली ; वादा वादी ; बळ जोडा ; कौडी कौडी साठी ; सोईरे-धाईरे ; ठेवा ठेवी ; बुट बुट ; भव भय ; आहाचेच आहाच ; भड उभंड ; आम्ही तुम्ही ; हीनवर बिजवर ; ...वगैरे. आवाजाचे उच्चाराचे कौतुक असणारे हे शब्द बोली भाषेत प्रामुख्याने वापरले जातात. ते काव्यात आणल्याने काव्याला साक्षात बोलीचे, संवादाचे  स्तर आपोआप विणल्या जातात व लौकिक अर्थाने काव्य वाचणार्‍याला ते "आपले" वाटू लागते

गुरुवार, ७ मार्च, २०१३

यमक-भक्ताचे विभक्त यमक !

यमक-भक्ताचे विभक्त यमक
---------------------------------
मार्जोरी बोल्टन ने यमकांचा अजून एक प्रकार सांगितलाय. अपूर्ण यमक किंवा विभक्त यमक. तुकाराम महाराजांच्या बर्‍याच अभंगात हे यमक दिसून येते. इथे अगदी कमी कमी अक्षरांचे चरण असणे ही अभंगाची रचना अथवा घाट अशा अपूर्ण यमकांसाठी जबाबदार असावी हे सहजी लक्षात येते. विशेषत: शेवटच्या चरणात चारच अक्षरे योजावयाची असल्याने तिसर्‍या चरणाचे शेवटचे दोन अक्षरी यमक व चौथ्या चरणाची चार अक्षरे असे मिळून एक सहा अक्षरी शब्द दिला तर सर्वच साधल्या जाते. तिसर्‍या चरणाचे यमक व चौथ्या चरणाचे चार शब्द. फक्त म्हणताना यमकानंतर थोडेसे थांबले की झाले. उदाहरणार्थ : "मृत्युलोकी आम्हा । आवडती परि । नाही एका हरिनामाविण ॥ ( २२४ जोग प्रत, हरि हे परि चे यमक आहे हे हरि-नामाविण असे फोडले तर लक्षात येते.)" ; "व्यभिचार माझा । पडिला ठाऊका । न सर ती लोकांमाजी आले ॥ ( १० देहू प्रत. इथे ठाऊका ला यमक जुळते लोकां, पण पूर्ण शब्द लोकांमाजी असा असल्याने तो यमकासाठी तोडलेला आहे. )." ; "तुका म्हणे येणे । जाणे नाही आता । राहिलो अनंताचिये पायीं ॥ ( १४, देहू प्रत, इथेही अनंताचिये पैकी अनंता वर यमक जुळवलेले आहे. )" ; "याचसाठी सांडियेले भरतार । रातलो या परपुरुषाशी ॥ ( १६ देहू प्रत, इथे सहा अक्षरांचा चरण केला तर सांडि व येले तोडावे लागते व परपुरुषाशी मधल्या पर शी भरतार शी यमक होते, ) "; "तुका म्हणे जालो । उदास मोकळ्या । विचरों गोवळ्यासवें आम्ही ॥ ( १९ देहू प्रत, इथेही गोवळ्यासवे तोडून मोकळ्या शी यमक जुळते.) " ; "तुका म्हणे धीरा । विण कैसा होतो हिरा ॥ ( २७३ देहू प्रत, इथे धीराविण तोडून धीरा व हिरा ही यमक जोडी चांगली जमते.)" ; "खासेमध्ये धन पोटासी बंधन। नेणे ऐसा दानधर्म काही ॥ ( ४५३ देहू प्रत, इथे दानधर्म तोडून दान यमक बनते बंधन शी .)"; "तुका म्हणे विष्णुशिवा । वाचुनि देवा भजती ती ॥ ( ७९१, देहू प्रत, इथे विष्णु व शिवा वेगळे केल्यावर वाचुनि हे विष्णु ला यमक जुळते तर विष्णुशिवा ला देवा हे यमक जुळते. )" ; "जाणोनिया नेणता तुका । नव्हे लोकांसारिखा ॥ ( ३६९३, देहू प्रत, इथे लोकांसारिखा तोडून तुका ला लोकां चे यमक बनते." ; "आता परदेशी तुका । जाला लोकांवेगळा ॥ ( ४१२०, देहू प्रत, इथे लोकांवेगळा तोडावे लागते.) ". उस्फूर्त प्रतिभेशी जी रोमांचकारी नाळ जोडलेली असते तिला जरा ही धक्का न लावता इथे अपूर्ण अथवा अर्ध-यमकाची ही कलाकुसर तुकाराम महाराजांच्या कवित्वाची रोख पावतीच आपल्याला देते. शिवाय तुकाराम महाराज लिखित कविता करीत असत हा कयासही इथे संभवनीय़ ठरतो.

सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१३

तुकाराम महाराजांचे आर्तभूत यमक


तुकाराम महाराजांचे आर्तभूत यमक
फक्त शेवटचे एकच अक्षर जुळवलेल्या यमकाला इंग्रजीत पुल्लिंगी यमक म्हणतात व दोन व ज्यास्त अक्षरे जुळवलेल्या यमकाला स्त्रीलिंगी यमक म्हणतात, असे मार्जोरी बोल्टन ही तिच्या "द ऍनॉटॉमी ऑफ पोएट्री", ह्या पुस्तकात दाखवते खरी, पण प्रत्यक्षात बहुतेक यमके एकच अक्षर जुळवलेली असतात. ( पुरुष, स्त्री यमके असा भेद करण्यामागे लिंग-सादृष्यता असावी ! ) . बर्‍याच वेळा आपला समज होतो की यमके ही यांत्रिकतेने, शेवटचे अक्षर तेच ठेवायचे व अगोदरचे क,ख,ग,...असे क्रमाने बदलत करतात व हे "काम" बरेच सोपे असावे. पण लक्षात घ्या, इंग्रजीत "ऑरेंज" ( Orange ) ह्या शब्दाला अजूनही यमक साधणारा शब्द मिळालेला नाही. आणि ही नुकताच दहा लाखावा शब्द डिक्शनरीत नमूद करणार्‍या भाषेची परिस्थिती, तर केवळ ६०/६५ हजार शब्द असणार्‍या मराठीत यमकांची हालत कठीणच ! उदाहरण म्हणून व आपलीच परीक्षा घेण्यासाठी एक शब्द घेऊ : "आर्त". ज्ञानेश्वरांनी "विश्वाचे आर्त, माझ्या मनी प्रकटले" ह्या अभंगातून म्हटलेला हा शब्द : आर्त. शिवाय आपण म्हणतो की तुकाराम महाराजांनी आपल्या सबंध काव्यात भक्तीची जी "आर्तता" दाखविली आहे ते वर्णन करणारा हा शब्द : आर्त. आता शेवटचा "र्त" कायम ठेवीत अगोदरचा "आ" क्रमाक्रमाने क,ख,ग,घ,....असा बदलत बघा काय शब्द मिळतात ते ! मला बर्‍याच प्रयत्नांती मिळाले : कीर्त ; तूर्त ; अमूर्त ; यथार्त ; शर्त ; ....बस्स. आता तुकाराम महाराजांनी ह्या "आर्त"शी कोणती यमके जुळविलीत ती पहा : पदार्थ ; समर्थ ; सर्वत्र ; मात्र ; आर्त ; आर्तभूत ; पात्र ; गीत ; त्वरित ; मात. एक दोन अभंग पहा ज्यात हे शब्द आर्तशी यमक म्हणून जुळवलेले आहेत . जसे : "पुरवी मनोरथ । अंतरीचे आर्त । धायेवरि गीत । गाईं तुझे ॥" ( ३८८८, देहू प्रत ) . "तुका म्हणे ऐसे । अंतरीचे आर्त । यावे जी त्वरित । नारायणा ॥" ( ३८९६, देहू प्रत ) . आर्त हा शब्द यमक जुळवायला असा कठिण जातोय हे पाहून मग एखाद्या हुशार संपादकासारखे तुकाराम महाराज आर्त अशा ठिकाणी दुसर्‍या शब्दाने जोडुन घेतात की तिथे मग तिथे दुसर्‍या जोडलेल्या शब्दाला यमक जुळवावे लागते, आर्तला नाही. जसे: "नाम धरिले कंठी । असे आर्तभूत पोटीं ॥ "( १६५३ देहू प्रत ); किंवा "आर्तभूत माझा । जीव जयांसाठी । त्यांच्या जाल्या भेटी । पायांसवे ॥"( १९५८, देहू प्रत ). तर यमक जुळवणे हे काही तसे यांत्रिक काम नाही. प्रतिभेची परिक्षा घेणारेच ते असते !

गुरुवार, २१ फेब्रुवारी, २०१३

तुकाराम महाराजांच्या भेंड्या

तुकाराम महाराजांच्या भेंड्या
-----------------------------------
अंताक्षरी किंवा भेंडया ह्या खेळात शेवटच्या अक्षरापासून आपण वेगळे गाणे म्हणतो. हा एक प्रकारचा यमकाचाच खेळ आहे. एकाखडी किंवा बाळक्रीडेचे अभंग ह्यात शेवटी जे अक्षर येते त्याच अक्षरापासून पुढचा अभंग सुरू करतात, तुकाराम महाराज. वानगीदाखल पहा : "कवतुक केले सोंग बहुरूप । तुका म्हणे बाप जगाचा हा ॥"( ४४९४ देहू प्रत ). आणि ह्या पुढचा अभंग ( ४४९५, देहू प्रत) असा सुरू होतो: "जगाचा हा बाप दाखविले माये । माती खाता जाये मारावया ॥ ". असल्या रचनेत क्रीडेचा भास होतो.

सोमवार, १८ फेब्रुवारी, २०१३

यमकांचा बाप : तुकान्त

ई-तुका
-----------------------
यमकांचा बाप, तुकान्त !
----------------------------------
२५ हजारापेक्षा ज्यास्त असणार्‍या यमक-जोड्या तुकाराम गाथेत एरव्ही वाचत शोधणे हे फारच जिकीरीचे काम . पण संगणकाची मदत घेऊन पाहिजे त्या शब्दांच्या यमकांना सहजासहजी शोधता येते. "हरी"ला जुळणारी यमके आपण वर पाहिलीच. भक्तीमार्गातले इतर काही कळीचे शब्द पाहिले तर असे आढळले की, "नारायण"ला जुळणारी १५० यमके आहेत ज्यापैकी वानगीदाखल ही पहा वैशिष्टयपूर्ण असणारी अशी आहेत : अभिमान, मेदिनी, जनार्दन, धणी, खाणी, वेदवाणी, समचरणी, पाळण, स्वगुण, वदन, वगैरे. "वाणी" ह्या शब्दाला जुळणारी ७५ यमके आढळली ज्यातली ही वानगीदाखल पहा : घाणी, कारणी, गणी, व्यभिचारिणी, शिरोमणी, आणी, प्राणी, छळणी, कडसणी,अंत:करणी वगैरे. "पांडुरंग" ह्या दैवताला जुळणारी यमके आढळली ७५, ज्यातली ही उदाहरणार्थ पहा : अंग, रंग, संग, चांग, पटंगा, तरंग, लिंग, मृदंग, पांग, भंगा वगैरे. "कीर्तन" ह्या शब्दाला जुळणारी यमके आढळली ६०, "ध्यान"ला जुळणारी ४०, व सर्वात ज्यास्त ( ५०० ) यमके आढळली "मन"ला जुळणारी. संत रामदासांनी "मनाचे श्लोक" करून "मनाचा" जो मरातब वाढवला व कदाचित भक्तिमार्गात त्याच "मन" ची महानता ओळखून तुकाराम महाराजांनी "मन"ला जुळणारी इतकी प्रचंड यमके जुळविली असावीत. पैकी खास वाटणारी अशी : घाणा, राणा, जना, ध्यान, सपनी, इंधन, आंचवण, दर्शन, खंडण, जन, दहन, मौन्य, दुकान वगैरे.
    इतकी प्रचंड प्रमाणात यमके पाहिल्यावर कोणालाही सजज जाणवावे की तुकाराम महाराजांच्या कवित्वाचे, प्रतिभेचे, खरे गमक आहे यमक ! यमकांच्या बाबतीत सहस्त्रावधी यमके अवतरवून यमकाचे जणु "बापपण"च तुकाराम महाराजांनी स्वत:कडे घेतले आहे. पटवर्धनांच्या "छंदोरचना" ह्या पुस्तकात एक मोठी यथार्थ नोंद आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की यमकाला गुजरातीत व हिंदी छंदरचनेत चक्क "तुकान्त" असा शब्द आहे !
--------------------------------------------------------------------

शनिवार, १६ फेब्रुवारी, २०१३

यमक जोड्या

भाषाशास्त्रात असे म्हणतात की आपण जे शब्द तयार करतो त्याने आपण केवळ भेद दाखवत असतो. म्हणजे जेव्हा आपण "गोड" हा शब्द योजतो तेव्हा तो "तिखट" ह्या शब्दापासून कसा वेगळा आहे हेच आपण दाखवत असतो. असे भेद दाखवणारे व विरुद्ध अर्थाचे शब्द जर आपण एकत्र केले तर असे दिसते की विरुद्ध अर्थाचे शब्द हे नेहमी ( ७० टक्के ) त्या अर्थाच्या एका शब्दाला यमक योजून केलेले असते. उदाहरणार्थ आपण काही विरुद्ध अर्थाच्या शब्दांच्या जोडया प्रथम पाहू. त्या अशा आढळतील : १) अधोगती-प्रगती २) अनाथ-सनाथ ३) अपेक्षित-अनपेक्षित ४) अब्रू-बेअब्रू ५) आघाडी-पिछाडी ६) आदर-अनादर ७) आवक-जावक ८) आशा-निराशा ९) आस्तिक-नास्तिक १०) इमान-बेइमान ११) इलाज-नाइलाज १२) इष्ट-अनिष्ट १३) इहलोक-परलोक १४) उत्तीर्ण-अनुत्तीर्ण १५) उन्नती-अवनती १६) उचित-अनुचित १७) उच्चा-नीच १८) उत्कर्ष-अपकर्ष १९) एकमत-दुमत २०) कडू-गोड २१) कृतज्ञ-कृतघ्न २२) कृपा-अवकृपा २३) खंडन-मंडन २४) चल-अचल २५) जहाल-मवाळ २६) तारक-मारक २७) दुष्ट-सुष्ट २८) नि:शस्त्र-सशस्त्र २९) प्रसरण-आकुंचन ३०) प्राचीन-अर्वाचीन ३१) पुरोगामी-प्रतिगामी ३२) भरती-ओहोटी ३३) माजी-आजी ३४) माहेर-सासर ३५) राजमार्ग-आडमार्ग ३६) वंद्य-निंद्य ३७) विधायक-विध्वंसक ३८) विसंवाद-सुसंवाद ३९) वैयक्तिक-सामूहिक ४०) शुद्धपक्ष-वद्यपक्ष ४१) सगुण-निर्गुण ४२) सजातीय-विजातीय ४३) समता-विषमता ४४) सावध-बेसावध ४५) स्वकीय-परकीय ४६) स्वार्थ-परमार्थ ४७) साधार-निराधार ४८) साक्षर-निरक्षर ४९) सुकाळ-दुष्काळ ५०) सुचिन्ह-दु:श्चिन्ह ५१) सुपीक-नापीक ५२) सुरस-नीरस ५३) सुलक्षणी-दुर्लक्षणी ५४) सुसंगत-विसंगत ५५) सुर-असुर ५६) सुज्ञ-अज्ञ ५७) सोय-गैरसोय ५८) स्वतंत्र-परतंत्र ५९) स्वदेशी-विदेशी ६०) स्वस्ताई-महागाई ६१) स्वस्थ-अस्वस्थ ६२) होकार-नकार ६३) ज्ञानी-अज्ञानी ६४) ज्ञात-अज्ञात ....वगैरे.आपण नेहमी जे विरुद्ध अर्थाचे शब्द करतो त्यांची तुम्ही जंत्री केलीत तर तुम्हाला हमखास आढळेल की बहुतेक जोड्या ह्या यमकानेच होतात. "ऍन ऍनॉटॉमी ऑफ पोएट्री" ह्या मार्जोरी बोल्टन ह्यांच्या ग्रंथात आपण पाहिलेच आहे की यमकाने दोन अक्षरांच्या साम्यामुळे एक प्रकारचा समीपपणा येतो. तसेच इथे आपण पहात आहोत की यमकामुळे विरुद्ध अर्थाची दोन टोके वाटतील असे शब्द तयार होतात. आता कवीकल्पनेत व अध्यात्मात अनेक वेळा दोन टोकांच्या कल्पना सांगाव्या लागतात. त्यामुले यमके वापरून शब्द केले तर ते किती सहजतेने जमते हे आपल्या संतांना माहीत होते असे दिसते. कारण तुकाराम महाराजांनी अशा दोन विरुद्ध टोकाच्या कल्पना सांगण्यासाठी यमके वापरली आहेत हे सोदाहरण दिसते. पहा : १) सुख पाहतां जवापाडें । दुःख पर्वता एवढें ॥ ( सुख व दु:ख ह्या विरोधी कल्पना व जवापाडे-पर्वताएवढे हे यमक) २) शांतीपरतें नाहीं सुख । येर अवघें ची दुःख ॥ ३) मोक्षायेवढें सुख । सुख नव्हे चि तें दुःख ॥  ४) ताप हें हरण श्रीमुख । हरी भवरोगा ऐसें दुःख । अवलोकितां उपजे सुख । उभें सन्मुख दृष्टीपुढें ॥  ५) तुका ह्मणे अवघीं दुःखें । येती सुखें वस्तीसी ॥  ६) विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा। तुकया मुखा विठ्ठल ॥.