सोमवार, १८ मार्च, २०१३

यमकातून अनुप्रास

यमकातून अनुप्रास
-------------------------
यमक जसे शेवटच्या शब्दातल्या शेवटच्या अक्षराच्या आवर्तनाने तयार होते व ते जसे उच्चाराच्या साधर्म्यामुळे लक्ष वेधून घेते  तसाच अनुप्रास हा अलंकार एका अक्षराच्या बर्‍याच वेळा म्हणण्याने तयार होतो हे आपणास माहीत आहेच. लहान मुले हा अलंकार "चंदू के चाचाने , चंदू की चाची को,  चांदनी रातमे, चांदी के चमचसे, चटणी चटायी." असे मोठ्याने म्हणून दाखवतात.  हा अलंकारही उच्चाराच्या चमत्कृती मुळेच तयार होतो. ह्यामुळे काव्य लक्षात राहण्याजोगे होते. अभंग ही रचनाच अनुप्रास साधण्यास फार सोयीस्कर आहे. कारण यमकामुळे चार चरणांपैकी दोन चरणात आधीच अक्षराची द्विरुक्ती झालेली असते. आता फक्त पहिल्या व चौथ्या चरणात यमकाचेच अक्षर असलेला शब्द योजला की झाला अनुप्रास अलंकार. जसे : "उजवला काळ । कुळा लाविला विटाळ ।( २०६ जोग प्रत )"; "मानामान मोह माया मिथ्या ( १९९ जोग प्रत )" ; "दीनानाथा कृपाळुवा । सांभाळावे आपुल्या नावा ॥ ( २९३ जोग प्रत )"; "हिरा हिरकणी । कांढी आंतुनि अहिरणीं ॥ ( ३६४, जोग प्रत )"; "फळले ते लवे भारे । पिक खरे आले तईं ॥ ( ५०४ जोग प्रत )"; "अनुभवे अनुभव अवघाचि साधिला । तरि स्थिरावला मनुं ठायीं ॥ ( ७८३, जोग प्रत )"; "जीवाचे जीवन अमृताची तनु । ब्रह्मांड भुषणू नारायण ॥ सुखाचा सांगात । अंतकासी अंत । निजाचा निवांत । नारायण ॥ गोडाचेहि गोड । हर्षाचेही कोड । प्रीतीचाही लाड । नारायण ॥ भावाचा निजभाव नावाचाही नाव । अवघा पंढरी राव । अवतरलासे ॥ तुका म्हणे जें हे साराचेही सार । माझा अंगीकार तेणें केला ॥ ( १०९०, जोग प्रत )"; "अनंता अरूपा अलक्षा अच्युता ( १२५६ जोग प्रत )"; "भला भला पुंडलिका । मानलासि जनलोकां । ( १४०९, जोग प्रत )"; "जीव जीती जीवना संगे । मत्स्या मरण त्या वियोगे ॥ ( १६१९,जोग प्रत )"; "वेधीं वेधें जीव वेधियेला । ( १६८४,जोग प्रत )"; "गांठ पडली ठका ठका । ( २२२५ जोग प्रत ) "; "आशय शयन भजन गोविंदे । भरले आनंदे त्रिभुवन ॥ ( २३५५ जोग प्रत )"; "रंगी रंगे नारायण ( ३२०१ जोग प्रत )"; "लय लये लखोटा ( ३७२० जोग प्रत )"; "तुका तुकासी तुकला । तुका तुकाहुनि निराळा ॥ तुकी तुकला तुका । विश्वीं भरोनि उरला लोकां ॥".
    अक्षराच्या पुनरावृत्तीने जसा अनुप्रास सजतो तसाच तो एखाद्या संपूर्ण शब्दाच्या परत परत आवृत्त होण्यानेही होतो. पण त्यात उच्चाराच्या साधर्म्यापेक्षा त्या शब्दाला ठसविण्याची प्रक्रिया ज्यास्त होते. भक्तिमार्गात नाम संकीर्तनाची परंपरा आहेच. त्यामुळे विठ्ठल किंवा पांडुरंग शब्द प्रत्येक चरणात योजला तर त्यामुळे तो ठसविला तर जातोच पण त्याला नामसंकीर्तनाचे ही रूप येते. जसे : "विठठल आमचे जीवन । आगमनिगमाचे स्थान । विठठल सिद्धीचे साधन । विठठल ध्यान विसावा ॥ विठठल कुळींचे दैवत । विठठल वित्त गोत चित्त । विठठल पुण्य पुरुषार्थ । आवडे मात विठठला ॥ विठठल विस्तारला जनी । सप्तही पाताळे भरूनी । विठठल व्यापक त्रिभुवनी । विठठल मुनिमानसी ॥ विठठल जीवाचा जिव्हाळा । विठठल कृपेचा कोंवळा । विठठल प्रेमाचा पुतळा । लावियेले चाळा विश्व विठ्ठल ॥ विठठल बाप माय चुलता । विठठल भगीनी भ्राता । विठठलेंविण चाड नाही गोता । तुका म्हणे आता नाही दुसरे ॥ ( ४०६४, जोग प्रत ). " विठठल ह्या शब्दाच्या सारख्या येण्याने सर्व जोर "विठठला"वर येतो व वातावरण "विठठल"मय होते. अशाच होणार्‍या परिणामामुळे सध्या कौशल इनामदार जे समूहगीत "मराठी अभिमान गीत" म्हणून गाववून घेत आहेत त्या सुरेश भटांच्या गजलेत "मर्‍हाटी" शब्द इतका सातत्याने येतो की सगळे महत्व "मराठी"वर येते व मग ते खरेच "मराठी अभिमान गीत" वाटू लागते. अशा रचना करण्यात तुकाराम महाराजांचा हातखंडा आहे. म्हणूनच ते रचतात : " विठ्ठल गीती गावा विठठल चित्ती घ्यावा । विठठल उभा पहावा विटेवरी ॥ ( ५४२ जोग प्रत ) ." ; "विठठल गीती विठठल चित्ती । विठठल विश्रांती भोग जया ॥( ६४८जोग प्रत )" ; "विठठल टाळ विठठल दिंडी । विठठल तोंडी उच्चारा ॥ ( १०२८ जोग प्रत)"; "विठठल भीमातीर वासी । विठठल पंढरी निवासी । विठ्ठल पुंडलिकापासी । कृपादाना विसीं उदार ॥ ( ४११६ जोग प्रत )"; "विठठल विठठल येणे छंदे । ब्रह्मानंदे गर्जावे ॥ ( २२१६ जोग प्रत )" ; "विठठल सोयरा सज्जन सांगाती । विठठल हा चित्ती  बैसलासे ॥ ( ४६२ जोग प्रत)"; "विठठाला रे तू उदारांचा राव । विठठला तू जीव या जगाचा ॥ ( २९७ जोग प्रत )" .....वगैरे. कृष्णाच्या नामसंकीर्तनाचा एक अभंग आहे. यातही "कृष्ण" अनुप्रासाने सर्वत्र वावरतो : "कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता । बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा ॥ कृष्ण माझा गुरू कृष्ण माझे तारू । उतरील पैल पारू भवनदीची ॥ कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन । सोईरा सज्जन कृष्ण माझा ॥ तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा । वाटे न करावा परता जीवा ॥". मग अशाच प्रकारचे रचनाकौशल्य तुकाराम महाराज अध्यात्मातल्या काही संदिग्ध कल्पनांना ठसविण्यासाठी करतात. जसे खरे खोटे पडताळण्यात "लटिके" काय काय आहे ते ठसविण्यासाठी ते म्हणतात : "लटिके ते ज्ञान लटिके ते ध्यान । जरि हरिकीर्तन प्रिय नाही ॥ ( २००० जोग प्रत)" ; "लटिके हासे लटिके रडे । लटिके उडे लटिक्यांपे ॥ लटिके माझे लटिके तुझे । लटिके ओझे लटिक्याचे ॥ लटिके गाये लटिके ध्याये । लटिके जाये लटिक्यांपे ॥ लटिका भोगी लटिका त्यागी । लटिका जोगी जग माया ॥ लटिका तुका लटिक्या भावे । लटिके बोले लटिक्यासवे ॥ ( २०९६ जोग प्रत ) .". अशाच एका "फटकाळ" ह्या शब्दाला ठसविण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात : "फटकाळ देव्हारा फटकाळ अंगारा । फटकाळ विचारा चाळविले ॥ फटकाळ तो देव फटकाळ तो भक्त । करवितो घात आणिका जीवा ॥ तुका म्हणे अवघे फटकाळ हे जिणें । अनुभवी ये खूणे जाणतील ॥ ( २५२४ जोग प्रत ) ".

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा