शुक्रवार, १७ जानेवारी, २०१४

संताने सुखवस्तू असू नये?

----------------------------------------
संताने सुखवस्तू असू नये ?
-------------------------------
परवा माझ्या एका मित्राने खास आळंदीला जाऊन एक तुकाराम महाराजांचा छोटेखानी शाडूचा पुतळा मला भेट म्हणून दिला. आम्ही मित्र भेटलो होतो शिर्डीला, पण त्याने तिथे खास पुण्याहून हा पुतळा काळजीपूर्वक सांभाळून आणलेला होता. भेट देण्यामागे त्याने हेरलेले माझे तुकाराम महाराजांवर नेमाने लिहिणे अभ्यासणे होते असे त्याने बोलूनही दाखविले. मूर्ती तशी छानच होती व त्यावर धूळ वगैरे बसू नये म्हणून मूर्तीभोवती चहूंबाजूने एक काचेची पेटी बनवलेली होती.
आमची मोलकरीण रोजचे झाडणे करताना एक हात ह्या मूर्तीवरून फिरवत होती. ही मोलकरीण तशी अशिक्षितच व तशात कोकणच्या बाजूची. महाबळेश्वरला जाताना लागते त्या माणगावची. तिने अंदाजे आम्हाला विचारले की हे कोण बाबा आहेत. तुम्ही गेला होतात शिर्डीला, पण हे काही साईबाबा दिसत नाहीत. आता आपण म्हणतो की तुकाराम महाराज हे खेडोपाडी प्रसिद्ध आहेत. वारीला जाणार्‍यांना तुकारामाचे अभंगही पाठ असतात व ह्या मोलकरणीला तुकाराम माहीत नव्हता हे आश्चर्याचेच होते. म्हणून तिला विचारण्याआधी मी मूर्तीकडे जरा परत एकदा निरखून पाहिले. मूर्ती तशी सुबकच होती. फक्त तुकारामाचे गाल जरा गुबगुबीत रेखलेले होते व मिशा जरा जादा झुबकेदार झालेल्या होत्या. त्यामुळे हा तुकाराम आजकालच्या बोवा लोकांप्रमाणे, पाहताच गुबगुबीत व सुखवस्तू दिसत होता.
ह्या सुखवस्तू दिसण्यानेच त्याचे संतपण हरवले होते व तो व्यवसायाने "बोवा" असल्यासारखा दिसत होता. संताने असे सुखवस्तू असून कसे चालेल ? तो दिसायलाही दीनदुबळाच हवा !
----------------------------------------






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा