शुक्रवार, ३ डिसेंबर, २०१०

तुकयाची नँनो 3

तुकारामाची नॅनो---३

३) काही अल्पाक्षरी उदाहरणे ( नॅनो रचना ) :
अगदी एकच अक्षराचा शब्द करून रचना करणे हे खूपच अवघड काम. ते तुकाराम महाराज विषयाला बाधा न आणता सहजी करतात व त्यावरून त्यांची भाषेची हातोटी दिसून येते. उदाहरणार्थ एक ओळ पहा: मी तें मी तूं तें तूं । ( कुंकुड हे लाडसी ) ॥ ( २१९५ देहू प्रत) . असेच एके ठिकाणी : हें तों नुरे ये रुचि ( ३३४३ देहू प्रत )
दोन अक्षरी शब्दांवर तर त्यांची जाम हुकुमत चालते. इतकी कोणाला गजलच वाटेल अशी ही प्रसिद्ध रचना पहा:
हे चि माझे तप । हे चि माझे दान । हे चि अनुष्ठान । नाम तुझे ॥
हे चि माझे तीर्थ । हे चि माझे व्रत । सत्य सुकृत । नाम तुझे ॥
हा चि माझा धर्म । हे चि माझे कर्म । हा चि नित्यनेम । नाम तुझे ॥
हा चि माझा योग। हा चि माझा यज्ञ । हे चि जपध्यान । नाम तुझे ॥
हे चि माझे ज्ञान । श्रवण मनन । हे चि निध्यासन । नाम तुझे ॥
हा चि कुळाचार । हा चि कुळधर्म । हा चि नित्यनेम । नाम तुझे ॥
हा माझा आचार । हा माझा विचार । हा माझा निर्धार । नाम तुझे ॥
तुका म्हणे दुजे । सांगायासि नाही । नामेविण काही । धनवित्त ॥
ह्याच धर्तीवर दोन अक्षरी शब्दांच्या रचना आहेत : चित्त शुद्ध तरी । शत्रु मित्र होती । व्याघ्र हे न खाती । सर्प तया ॥; गोड तुझे रूप । गोड तुझे नाम । देई मज प्रेम । सर्व काळ ॥; तुका म्हणे काही । न मागे आणिक । तुझे पायी सुख । सर्व आहे ॥; हे चि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥; तसेच : हीन माझी याति । वरी स्तुती केली संती ॥ अंगी वसू पाहे गर्व । माझे हरावया सर्व ॥; याती हीन मति हीन कर्म हीन माझे । तुज मज नाही भेद । केला सहज विनोद ॥; देव ते संत देव ते संत । निमित्य त्या प्रतिमा ॥; तुका म्हणे जया गावा जाणे जया । पुसोनिया तया वाट चाले ॥; शब्द नाही धीर । ज्याची बुद्धी नाही स्थिर ॥; चित्ती नाही आस । त्याचा पांडुरंग दास ॥; तुका म्हणे भाव । शुद्ध बरा सोंग वाव ॥; आम्ही घ्यावे तुझे नाव । तुम्ही आम्हा द्यावे प्रेम ॥; बीज पेरे सेती । मग गाडेवरी वाहाती ॥ वाया गेले ऐसे दिसे । लाभ त्याचे अंगी वसे ॥; ज्याची खरी सेवा । त्याच्या भय काय जीवा ॥; बोले तैसा चाले । तुका म्हणे तो अमोल ॥; नव्हे साच काही कळों आले मना । म्हणोनि वासना आवरली ॥; प्रीती करी सत्ता । बाळा भीती माता पिता ॥; तूं माझा आकार । मी तों तूं च निर्धार ॥; तुज न भें मी कळिकाळा । मज नामाचा जिव्हाळा ॥; मानसाची देव चालवी अहंता । मी चि एक कर्ता म्हणों नये ॥; पुरविली आळी । जे जे केली ते ते काळी ॥.... वगैरे.
अल्पाक्षरात काव्य करणे हे आधुनिक काळातही चलतीचे आहे, असे आरती प्रभू ह्याच्या ह्या कवितेवरून दिसते : लव लव करी पात: डोळं नाही थार्‍याला; एकटक पाहू कसं, लुक लुक तार्‍याला ? चव गेली सारी, जोर नाही वार्‍याला; सुटं सुटं झालं मन: धरू कसं पार्‍याला ? ....किंवा विंदा करंदीकर : तुका म्हणे विल्या । तुझे कर्म थोर । अवघाचि संसार । उभा केला ॥...तुका म्हणे बाबा। त्वा बरे केले । त्याने तडे गेले । संसाराला ॥;
तुकारामाच्या काळात मौखिक परंपरा होती हे आपण लक्षात घेतले तर म्हणताना अल्पाक्षरी शब्दच बरे पडतात हे आपल्याला सहजी पटू शकते, जसे कोणाला "अगं गंगू" असं म्हणण ज्यास्त बरे पडते, "अगं गंगाभागिरथे" पेक्षा ! (क्रमश:)
arunbhalerao67@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा