मंगळवार, १ फेब्रुवारी, २०११

तुकयाची नँनो 1

ई-तुका
तुकयाची नॅनो

८) लांबलचक शब्दांची मालगाडी व तिचा खडखडाट :
मराठी शब्दकोश पाहिला व त्यात पाच अक्षरे व त्याहून ज्यास्त असलेले शब्द मोजले तर आपल्याला आपल्या भाषेचाच कल अल्पाक्षराकडे आहे का ते समजेल. ह्या दृष्टीने वा.गो.आपट्यांचा शब्दरत्नाकर हा कोष पाहिला. आता सगळा कोश मोजणे जिवावर आले. म्हणून त्यात संख्येने ज्यास्त शब्द असलेले "स" पासून सुरू होणारे ५८८८ शब्द तपासले ( कोशात एकूण ६०,५५९ शब्द आहेत ). म्हणजे हा १० टक्क्याचा मासला ( सॅंपल ) होतो. तर " स"पासून सुरू होणारे ५व त्यापेक्षा ज्यास्त अक्षरांचे मोठे शब्द खुणा करून मोजले तर भरले एकूण ७१२. टक्केवारीत हे पडतात १२ टक्के. म्हणजे भाषेतच ८८ टक्के शब्द हे अल्पाक्षरी आहेत म्हणायचे. आता तुकाराम गाथेत आपल्याला अल्पाक्षरी शब्द आढळले होते एकूण ३० हजारापैकी २७४७९ म्हणजे ९१ टक्के. आता हे साहजिकच भाषेच्या कलाप्रमाणेच आहे हे दिसून येईल. आता साहजिकच लांबलचक मालगाडी सारखे शब्द असू नयेत हा नियम ओघानेच येतो व तो तुकारामांनी तंतोतंत पाळलेला आहे हेही लक्षात येते.
आपण जो आवाज काढतो तो टाळू, दात, दात व टाळू दरम्यानचा भाग, घसा, ह्या ठीकाणी जिभेचा वावर करून व नाक ह्यातून हे तर आता सर्वांना माहीतच असते. आपण जी हवा घेतो ती मोठे शब्द म्हणत असताना लगेच विरून जाते. म्हणजे आपली जी व्यवस्था आहे त्याप्रमाणेही अल्पाक्षरे हीच आपली निकड आहे. भाषेतले दोन अक्षरी शब्द मोजले ( स पासून सुरू होणार्‍या ५८८८ शब्दांपैकी ) तर ७५३ म्हणजे १२ टक्के. आणि नेमाडे संपादित अभंगगाथेतले पहिले १०० अभंग तपासले तर त्यात दोन अक्षरी शब्द निघाले २३०३ शब्द, म्हणजे २३ अल्पाक्षरे प्रति अभंग किंवा ३६ शब्दापैकी ( चार खंडांचा एक अभंग व एका अभंगात एकूण ३६ शब्द) २३ शब्द दोन अक्षरी भरले. तर अशा रितीने ७० टक्के शब्द तुकाराम महाराज दोन अक्षरी वापरतात हे दिसून येते. ते लांबलचक शब्दांची मालगाडी अशी टाळतात व त्यायोगे होणारा खडखडाटही मग टळतो.
हे अल्पाक्षरी काव्य करणे "येरा गबाळ्याचे " काम नाही हे आजकालच्या काही आधुनिक कवींच्या रचना अल्पाक्षरांसाठी मोजल्या तर लक्षात येऊ शकेल. "दृश्यांतर" ह्या चंद्रकांत पाटील संपादित पुस्तकातून विंदा करंदीकर, सुर्वे, कोलटकर, पाडगावकर, सुरेश भट, ह्यांच्या ३७७२ एकूण शब्द असलेल्या कविता तपासल्या तेव्हा त्यात अवघे १५६७ दोन अक्षरी शब्द आढळले. म्हणजे ४१ टक्के व हेच तुकारामाच्य अभंगात प्रमाण आहे दोन अक्षरी शब्दांचे ७० टक्के. अल्पाक्षरी काव्य ह्यात तुकाराम महाराजांची अशी हातोटी सिद्ध होते. ( क्रमश: )

-------अरूण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा