बुधवार, २३ फेब्रुवारी, २०११

ई-तुका
तुकयाची नॅनो---९

९) गेयता व अल्पाक्षरे :
गेयते साठी कमीत कमी अक्षरांचे शब्द असावेत हे तर जे शास्त्रीय संगीत ऐकतात त्यांच्या एव्हाना लक्षात आलेच असेल. कारण जेव्हा गायक ताना घेतात, त्यात चढ उतार करीत वेगवेगळ्या चालीत बदल करत असतात तेव्हा शब्दांऐवजी ते सरगम वापरतात जसे: म म ग ग रे ग सा वगैरे. नुसते स्वर हे एक अक्षरी शब्द असतात. आता दर वेळी एकाक्षरी शब्द सुचणे व ते वापरणे काव्यात शक्य होत नाही. तेव्हा त्यातल्या त्यात जवळचे अल्पाक्षरी शब्द असतात दोन अक्षरी. आणि आपण पाहिले की तुकाराम महाराज अभंगात ७० टक्क्यांनी असे दोन अक्षरी शब्द वापरतात. त्यामुळेच तुकारामाचे अभंग हे अप्रतीम गेय होतात.
तामिल शास्त्रीय संगीतात प्रत्येक गायकाने कमीत कमी दोन तरी तुकारामाचे अभंग गावेत अशी परंपरा आहे असे श्री गणेशकुमार सांगतात. हे गृहस्थ चेंबूरच्या फाइन आर्ट सोसायटीचे अध्यक्ष असून त्यांना पंढरपूरच्या देवस्थानाने अभंग-रत्न हा किताब दिलेला आहे.ह्यांचे मराठी अभंग विषयावर एक भाषण होते. अभंगाचे हे लेक्चर-डेमोंन्स्ट्रेशन होते. त्यादरम्यान त्यांनी काही माहीती सांगितली ती थक्क करणारी आहे. सर्वात मोठ्ठे विठ्ठल मंदीर भारतात कांचीपूरम येथे आहे. तिथे विठ्ठलाची १२ फूट उंचीची मूर्ती असून इतर संतांच्या १० फुटी मूर्ती आहेत. संपूर्ण पंढरपूरच्या देवळाची आसपासची प्रतिकृतीही केलेली आहे. तंजावरचा दक्षिण भजन संप्रदायात हटकून मराठी अभंग म्हटले जातात. तिथल्या गायकांना दोन तरी मराठी अभंग म्हणावेच लागतात. त्यांच्याकडची हरिकथा पद्धती म्हणजेच प्रवचनाचा एक प्रकार आहे. प्रसिद्ध तमिळ संगीतगुरू त्यागराज ह्यांच्या समाधी मागेच विठ्ठलाचे मंदीर आहे.
सर्वात ज्यास्त लोकप्रिय मराठी अभंग तामिळ नाडूत म्हटले जातात. म्हणूनच भीमसेनजी, कुमार गंधर्व, जितेंद्र अभिषेकी, अजित कडकडे ह्यांचे तुकारामाचे अभंग लोकप्रिय झाले असून सर्वात गेय आहेत हे जाणवते. ( क्रमश: )

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा