रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०

न वजे वाया, वाया न वजे

 तुकारामाची एक गज़ल 

—————————-

न वजे वायां काही ऐकता हरिकथा । आपण करिता वायां न वजे ।।

न वजे वायां काही देवळासी जाता । देवासी पूजितां वायां न वजे ।।

न वजे वायां काही केलिया तीर्थ  । अथवा कां व्रत  वायां न वजे ।।

 न वजे वायां काही झाले संतांचे दर्शन ।  शुद्व आचरण वायां न वजे ।।

तुका म्हणे भाव असतां नसतां  । सायास करिता वायां न वजे ।।

( जोग प्रतीतला अर्थ : श्रीहरीची कथा दुसऱ्याच्या मुखाने श्रवण केली, अथवा आपण केली तर ती काही वायां जाणार नाही. देवळात जाऊन देवीचे दर्शन घेतले अगर त्याचे पूजन केले कर ते काही वायां जाणार नाही. एखाद्या तीर्थयात्रेस जाणे अगर कोणतेही व्रत करणे , हे काही वायां जाणार नाही. संतांचे दर्शन घेतले असता वाया जाणार नाही ; अशा प्रकारची कोणत्याही चांगली आचरणे वायां जाणारी नव्हेत. तुकाराम महाराज म्हणतात, अशा कर्तव्यामध्ये भाव, श्रद्धा, असो अगर नसो, चांगल्या आचरणाचे श्रम केले असतां वायां जाणार नाहीत. )

न वजे वायां — —- — । — — —- वायां न वजे ।। हे शब्द व त्यांचा क्रम चारही ओळीत सारखा ठेवून एक अप्रतीम कुसर इथे दिसून येते. नेपोलियन बोनापार्ट ज्या एल्बाच्या लढाईत हरला त्याबद्दलचे एक त्याचे वाक्य फार प्रसिद्ध आहे: Able was I ere I saw Elba. ह्यातली अक्षरे पुढून मागे वा मागून पुढे वाचली तरी वाक्य तेच राहते. तशीच कुसर तुकाराम महाराज इथे करीत आहेत, तेच शब्द उलट सुलट वापरून. ह्याने नादमयता साधली जाते, जसे गजलेचे वृत्त देते. 

गजलेत एकाच कल्पनेला उलट सुलट करून, त्याच रूपकाला फिरवून शेर केलेला असतो व एक तत्व सांगितलेले असते. जसे: हजारों ख्वाइशे ऐसी की हर ख्वाइश पे दम निकले. तसेच इथे चांगल्या आचरणाचे तत्व, फिरवून, सांगितलेय. जसे: हरिकथा आपण आपल्या मुखाने केली काय वा दुसऱ्याने केलेली ऐकली काय, ते आचरण चांगलेच होय. देवळात जाऊन देवांचें दर्शन केले काय किंवा घरच्या देवांची पूजा केली काय ते आचरण चांगलेच होय. 

एरव्ही हेच तुकाराम महाराज “भाव तेथे देव” म्हणणारे आहेत पण इथे चांगले आचरण वाखाणण्यासाठी ते भाव नसला तरी चालेल अशी मुभा देत आहेत. हे जमीनीवरचे संत असल्याचेच द्योतक आहे. 

———

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा