सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१

तुकारामाची खूण

तुकारामाची खूण ———————— उठता बसता तुकाराम वाचणे हे कंटाळा येणारे होऊ शकते. पण तुकाराम महाराज तसे होऊ देत नाहीत. ह्याचा पडताळा घ्यायचा तर “कंटाळा” ह्या विषयावरचा तुकाराम महाराजांचा हा एक अभंग पहा: ——- नाही कंटाळलो परि वाटे भय । करावे ते काय न कळता । जन वन आम्हा समानचि झाले । कामक्रोध केले पावटणी । षडउर्मी शत्रु जिंकिले अनंता । नामाचिया सत्ताबळे तुझ्या । मुख्य धर्म आम्हा सेवकांचा ऐसा । स्वामी करी शिरसा पाळावे ते । म्हणवुनि तुका अवलोकुनि पाय । वचनाची पाहे वास एका ।। ( ३३०२ जोग प्रत ) —— ( हे देवा मी कंटाळलो नाही, पण मला काय करावे हे न कळल्यामुळे भय वाटत आहे. जन-वन हे सर्व आम्हाला सारखे आहे. आम्ही कामक्रोधाच्या पायाखालील पायऱ्या केल्या आहेत. हे अनंता, तुझ्या नामचिंतनाच्या बलाने क्षुधा, तृषा, शोक,मोह,जरा,मरण हे सहा मनोविकार व काम,क्रोध,लोभ,मोह,मद, मत्सर हे सहा शत्रू जिंकले. स्वामी जे करील ते शिरसावंद्य करावे, हाच आमचा सेवकांचा मुख्य धर्म होय. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून मा आपल्या पायांकडे पाहून आपल्या मुखातून एखादा शब्द येण्याची वाट पाहात आहे. ). —— रोजच्या ठिकाणी राहून कंटाळा यावा व सुट्टीच्या ठिकाणी जावे हे आता इतक्या वेळेला झालेय की जन-वन आम्हा समानचि झाले. हा आपला नित्याचा अनुभव झाला आहे. जरा म्हणजे म्हातारे होणे व मरणे म्हणजे जगणे सोडणे हे क्षुधा, तृषा, शोक व मोह ह्या मनोविकाराबरोबर जोडलेले पाहून हे त्तवविचार खोलात जाऊन पाहणे मोठे मनोहारी होईल. देवाने सेवकाला आज्ञा द्यावी व ती त्यांनी शिरसावंद्य मानावी म्हणून देवाच्या वचनाची वाट पाहणाऱ्या सेवकाची जाणीव वर्णन करताना जोग महाराजांनी तुकाराम महाराजांच्या मूळ “वास” ह्या शब्दाचा “वाट” असा अर्थ काढलेला असला , तरी “जन-वन” असा काव्यमय शब्द योजणाऱ्या तुकाराम महाराजांचे कवित्व ह्या अभंगात नक्कीच बहरून आले असावे व त्यांनी “ वाट” हा रुळलेला शब्द न योजता “वास” वापरले असावे. “वास” ह्याचा एक अर्थ “खूण” असा आहे. वास म्हणजे “ गंध” ह्या अर्थानेच ताडलेला खूण हा अर्थ आहे. नुकत्याच कोव्हिड झालेल्यांना हे पटेल की जेव्हा त्यांचे वास येणे गेले तेव्हाच कोव्हिड झाल्याची “ खूण” पक्की झाली होती. असेच देवाचे पाय पाहून काही करण्याबरोबर एखादी वचनाची “खूण” पटण्याची वाट पाहाणे हे सेवकाच्या जास्त भरवशाचे आहे. म्हणून कविराज तुकाराम महाराज वाट पाहण्याचा कंटाळा न करता “ वचनाची एका वास पाहे “ असे म्हणत आहेत. आणि हीच तुकारामाची खूण आहे. —————

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा