
बुधवार, ३० नोव्हेंबर, २०१६

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६
मी चोर तू पोलीस
चोर पोलीस खेळू ! मी चोर तू पोलीस !
-----------------------------------
आमच्या लहानपणीचा सगळ्यात लोकप्रिय खेळ होता चोर पोलीस. ह्यात कोणालाही पोलीस व्हायला आवडायचे नाही. प्रत्येकाला चोरच व्हायचे असायचे. अगदी नाईलाजाने ज्याच्यावर राज्य येई त्याला पोलीस व्हावे लागे.
चोराला लपून बसायला मिळे, पळून जायला मिळे, तर पोलिसाला एकेकाला पकडावे लागे.
व्यवहारात सुद्धा चोर हे नेहमी पोलिसांच्या पुढे एक पाऊल असतात. चोर हुशार असतात.
जे पदार्थ तब्येतीला वाईट असतात नेमके तेच चवीला छान असतात. आपल्याला वाईटच आवडते. अळणी नको असते.तुकाराम महाराज हेच सांगताना म्हणतात की चांगले सुगंध सोडून माशी पहा कशी दुर्गंधीपाशी जाते : राउळासी जातां त्रास मानी मोठा । बैसतो चोहोटां आदरेशीं ॥1॥
न करी स्नान संध्या ह्मणे रामराम । गुरुगुडीचे प्रेम अहनिऩशी ॥ध्रु.॥देवाब्राह्मणासी जाइऩना शरण । दासीचे चरण वंदी भावें ॥2॥सुगंध चंदन सांडोनियां माशी । बसे दुर्गंधीशीं अतिआदरें॥3॥तुका ह्मणे अरे ऐक भाग्यहीना । कां रे रामराणा विसरसी ॥4॥
ह्या सगळ्याच्या मुळाशी म्हणे माणसाचे रॅशनल नसणे आहे. आपण म्हणे ईरॅशनल बुद्धीचे असतो. आपली ठेवणच तशी आहे म्हणे ! अनेक लोकांच्या अथक प्रयत्नांनी आपण रॅशनल होतो ( ते ही झालो तर...!).
---------------------
-------------
सोमवार, १० ऑक्टोबर, २०१६
कारणा कारण
कारणा कारण
विज्ञानाच्या अभ्यासामुळे आपला असा समज होतो की जे काही आपल्या अवती भवती घडते आहे त्याला काही ना काही कारण असतेच. सगळ्याच ज्ञानशाखांचा रोख हे कारण शोधण्याकडे असतो.
आग, पाणी, तेज, वायू, आकाश, ही आदिम पंचमहाभूते घेतली तरी विज्ञान म्हणते की ती काही स्वयंभू अशी असत नाहीत. काही तरी कारण घडते आणि ही पंचमहाभूते प्रकटतात. सगळे जगच जर पंचमहाभूतांचे बनलेले असेल तर मग जगात विनाकारण असे काही नाहीच म्हणायचे !
आपण माणसे ह्या जगात अगदी एकमेवाद्वितीय आहोत असा भ्रम जरी खरा मानला तरी आपल्यावरही कोणा कोणाचा प्रभाव पडतच असतो असे कोणतेही प्राथमिक मानसशास्त्र आपल्याला सांगून जाते.
एकूण काय कुठलेही निरिक्षण, कुठलाही विचार, कुठलेही प्रमेय, कुठलाही वाद, काहीही घेतले तरी ह्या कार्य-कारणातून आपल्या समजाची काही सुटका दिसत नाही. आणि हे वैज्ञानिक कार्यकारण शोधणे इतके धोक्याचे असते की इथे किती टक्क्याचे कारण हे खरे कारण असा काही ठोकताळा नाही. अगदी नोबेल पारितोषिक मिळालेल्या ग्रॅंगर-कॉज च्या समीकरणातही किती टक्क्याचे प्रमाण म्हणजे खरे कारण असे काही सापडत नाही. म्हणजे सगळ्या ज्ञानाचा आटापिटा हा असा मोघमच !
ह्या गदारोळातून तुकाराम महाराजांनी भक्तिमार्गाचा उपाय सुचविला आहे. ते म्हणतात : ( २८७१, जोग प्रत,) : कारणा कारण ( कार्यकारण ) वरियेले जेथे । जातों तेणे पंथे सादावित ॥ संती हे पईल लाविले निशाण । ते खूण पाहोन नाम गर्जे ॥ तुका म्हणे तुम्ही चला याचि वाटे । पांडुरंग भेटे भरवंसेनी ॥ ( जोग प्रतीतला अर्थ : ज्या ठिकाणी कार्यकारण नाहींसे होते ( शेतात बी पेरले असतां धान्य पिकते, यज्ञ केला असता स्वर्ग प्राप्त होतो, हा कार्यकारण भाव प्रवृत्तीमध्ये असतो. ही प्रवृत्ती ज्या मार्गात बाजूला सारली आहे त्या निवृत्तीच्या ) मार्गाने मी लोकांना सांगत जात आहे. भवसमुद्राच्या पैलतीरास जाऊन संतांनी कीर्तीचा ध्वज उभारला आहे, ती खूण पाहून हरिनामाची गर्जना मी करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अहो जन हो, तुम्ही ह्याच मार्गाने चला, म्हणजे भरंवशाने पांडुरंगाची भेट होईल.
-------------------------------------
अरुण अनंत भालेराव
-------------------------------------
मंगळवार, २० सप्टेंबर, २०१६
शंका फिटणे
शंका फिटणे
--------------------
संत श्री ज्ञानेश्वरांची एक विराणी ( विरहिणी ) :
माझी शंका फिटले | लाजा सांडिले | आवघे घातले |
मज निरसुनिया ||१|| अठरा भार वनस्पती | सुरवर वोळंगती || देवोदेवि आदिपती | कृष्ण काळा गे माये ||२||ऐसा कृपानिधी सांवळा| कीं बापरखुमादेवीवरु गोंवळा || त्याचा मज चाळा | बहु काळ गे माये ||३||
माझी शंका फिटली, माझी लाज लुप्त झाली, आणि मला सर्व काही अगदी निवडून निरसून दिल्यासारखे दिल्या गेले आहे. हे सुरवर धारण करीत आहेत अठरा भार वनस्पती. तसेच ती धारण करीत आहेत देवोदेवी, आदिपती, व कृष्ण जो काळा आहे. ही कृपा करणारा सांवळा असा आहे की विठ्ठलही त्यात गोवला गेला आहे. त्या कृष्णाचा मला चाळा लागला आहे व तो खूप काळापासून.
ही कृष्णाची हुरहूर आहे तशीच ती अठरा भार वनस्पतीचीही हुरहूर आहे. काय असेल अठरा भार ? भार व धारण करणे ह्यावरून “अठरा भार” हे वनस्पतीचे खूप असण्याचे मोजमाप असावे. जगात वनस्पती किती, जलचर किती, पशू किती, किडे किती, माणसे किती हे मोजण्याचे शास्त्र आहे टॅक्सॉनॉमी नावाचे. ह्यात एक २० मैल बाय २० मैल आकाराचे क्षेत्र घेवून त्यातले स्पीसीज मोजतात. हे मोजणे कैक लक्ष डॉलर खर्चून अजून चालूच आहे.
ज्ञानेश्वरानंतर झालेल्या तुकारामाने त्याला ज्ञात असलेले हे आकडे एका अभंगात असे दिलेत (८४ लक्ष योनी ) : वीस लक्ष योनी वृक्षामाजी घ्याव्या | जलचरी भोगाव्या नव लक्ष || अकरा लक्ष योनी किड्यामाजी घ्याव्या | दशलक्ष भोगाव्या पक्ष्यांमध्ये || तीस लक्ष योनी पशूंचिये घरीं | मानवाभीतरी चार लक्ष || एकएक योनी कोटी कोटी फेरा | मनुष्यदेहवारा मग लागे || तुका म्हणे तेव्हा नरदेह नरा | तयाचा मातेरा केला मूढें ||
तुकारामाच्या काळात २० लक्ष योनी असलेल्या वनस्पती कदाचीत ज्ञानेश्वरांच्या काळात १८ लक्ष असतील तर मग “अठरा भार” हे वनस्पतीचे त्या काळातले मोजमाप असावे.
---------------------
सोमवार, ११ एप्रिल, २०१६
कार्यकारण
गुरुवार, ३१ डिसेंबर, २०१५
अरे तुरे
अरे हा काही शब्दकोशातला शब्द नाही . पण शब्दाच्या व्याख्ये प्रमाणे त्याचा अर्थ होतो, संबोधनार्थ व आपण आजही अहो जाहो च्या विरुद्ध जवळीक किंवा एकेरी दाखवण्यासाठी अरे हे संबोधन वापरतो. इंग्रज लोक, विशेषतः खलाशी , Ahoy, अशी आरोळी ठोकीत व त्याचेच पुढे Hey झाले असे म्हणतात. असेच इथे तुकाराम महाराज अरे असे संबोधत आहेत.
Phonology ह्या शास्त्रात असे दिले आहे की आपल्याला काही आवाज हे सहजी अथवा मोठ्याने ऐकू येतात व असे मोठ्याने ऐकू येणाऱ्या आवाजांची ते एक श्रेणीच देतात. ह्या श्रेणी बरहुकूम आपल्याला स्वर ( अ, आ, इ, ई ....) मोठ्याने ऐकू येतात असे पाहिले आहे. त्यानंतर य र ल व हे द्रव्य व त्यानंतर अनुनासिके अशी उतरंड आहे . कदाचित ह्या व्यवस्थेमुळे आपण कोणाला हाका मारताना शेवटी स्वर येतील अशी हमखास युक्ती करतो. कारण त्या माणसाला ऐकू जाणे हा उद्देश असतो.
तर अशी युक्ती वापरून तुकाराम महाराजांनी खालील अभंगात अरे हा शब्द आवर्जून वापरला आहे व तो परिणामकारक होतो. बघा :
तुका म्हणे काय काहण्या अरे सांगाल गोष्टी । चाटावे तुमचे बोल रे भुका लागल्या पोटीं ।
अरे हें देह व्यर्थ जावें । ऐसें जरी तुज व्हावें । द्यूतकर्म मनोभावें । सारीपाट खेळावा ॥१॥
उगला राहें न करीं चाळा । तुज किती सांगों रे गोवळा । तुझा खडबड कांबळा । अरे नंदबाळा आलगटा ॥ध्रु.॥
अरे गिळिले हो संसारें । कांहीं तरि राखा खरें । दिला करुणाकरें । मनुष्यदेह सत्संग ॥1॥
अरे कृष्णा तुझें नाम बिळवंत । होय कृपावंत राख आतां ॥2॥
तुका ह्मणे अरे कृष्णा नारायणा । गोपाळ करुणा भाकितिले ॥3॥
अरे कृष्णा आह्मी तुझे निज गडी । नवनीत आवडी देत होतों ॥1॥ अरे कृष्णा आतां राखेंराखें कैसें तरीं । संकटाभीतरीं पडियेलों ॥ध्रु.॥ वरुषला इंद्र जेव्हां शिळाधारीं । गोवर्धन गिरी उचलिला ॥2॥ तुका ह्मणे तुझे पवाडे गोपाळ । वणिऩती सकळ नारायणा ॥3॥
अरे कृष्णा तुवां काळया नाथिला । दाढे रगडिला रिठासुर ॥1॥ अरे कृष्णा तुवां पुतना शोषिली । दुर्बुद्धि कळली अंतरींची ॥ध्रु.॥ गोपाळ करुणा ऐसी नानापरी । भाकिती श्रीहरी तुजपुढें ॥2॥ तुझें नाम कामधेनु करुणेची । तुका ह्मणे त्यांची आली कृपा ॥3॥
