बुधवार, ३१ मार्च, २०१०

संपत्ती

ई-तुका: २
संपत्ती
कवण दिस येइल कैसा । न कळे संपत्तीचा भरंवसा ॥
चौदा चौकडिया लंकापती । त्याची कोण जाली गती ॥
लंकेसारिखे भुवन । त्याचे त्यासी पारखे जाण ॥
तेहतीस कोटी बांदवडी । राज्य जाता न लगे घडी ॥
ऐसे अहंतेने नाडिलें । तुका म्हणे वाया गेले ॥

आयुष्यभर संपत्ती कमावयाची, अपार मेहनत करायची, दिवस-रात्र एक करायचा आणि आयुष्य़ाच्या उतरणीवर कळू यावे की हे सगळे "वाया गेले !" ही केवढी मोठी शोकांतिका ! कमवायला सुरुवात करताना आदर्श ठेवायचा "दहा पिढया बसून खातील एवढे कमवायचे" हा. आणि शेवटी शेवटी जाणवते की जगराहटीत हे शक्यच होत नाही.
रावण, लंकापती, लंकेत सोन्याच्या विटा, चौदा चौकडया ( म्हणजे खूप खूप ज्यास्त !)संपत्ती, तेहतीस कोटी बांदवडी, वगैरे जाऊ द्या. आजच्या काळातली उदाहरणे घ्या. एकेकाळी किर्लोस्कर घराणे किती श्रीमंत वाटायचे. पण आता तिसर्‍या पिढीत ते साधारण-श्रीमंतच म्हणायचे. आजुबाजूच्या श्रीमंतांची दखल घेऊन बघा, तिसर्‍या पिढीतच संपत्ती कंटाळायला लागते. आणि रहाटी अशी की मग पुढची पिढी परत कर्तबगार निघते, प्रयत्न करते, व परत संपत्ती जमवावयाला लागते.
संपत्तीचे हे चक्र कोणाला न टळणारे आहे. शिवाय ती वारसां मध्ये भांडणे लावते ते निराळेच.तसे हिशोब केला तर एका माणसाला लागते तरी किती संपत्ती.सरासरी आयुष्य समजा धरले ८० वर्षांचे तर: जेवण-खाण दरमहा:१०००+कपडालत्ता दरमहा:२००+दळणवळण:५००+शिक्षण:५००+इतर:५००=एकूण रु.२७०० दरमहा कींवा पूर्ण ८० वर्षांसाठी २५ लाख रु.घर साधारण १२० वर्षे टिकेल असे धरले तर ४० लाखाचे घर ८० वर्षांसाठी पडेल २५ लाखाला.म्हणजे एका माणसाला पूर्ण
आयुष्यभरासाठी लागतात फक्त ५० लाख आणि तो आजकाल मागे ठेवतो १ कोटी. अर्थात ह्या रकमा सगळ्यांनाच सरसकट लागू होणार नाहीत पण सरासरी सुखवस्तु माणसाला लागू होतील व त्यातून हे सहजीच जाणवेल की संपत्ती शेवटी "वाया जाते !"
तुकाराम महाराज हे अहंकाराने होते असे म्हणतात ते प्रथम आपल्या ध्यानात येत नाही. आपल्याला वाटते संपत्तीचे वाया जाणे हे मोहापायी घडते आहे. मोह हा आपल्या अहंकारापायीच होत आहे ही बारीक बाब आपल्या ध्यानात येत नाही.

---अरूण अनंत भालेराव
दूरभ्रमण: ९३२४६८२७९२

1 टिप्पणी:

  1. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी । सांगातें कवडी गेली नाहीं !! हे बाकी अगदी खरे. फारच छान आहे आपला व्यासंग. तुकारामाची अशी ओळख होणे / करणे फारच आवडले.

    उत्तर द्याहटवा