बुधवार, ३१ मार्च, २०१०

तुकाराम आणि शेक्सपियर 1

ई-तुका:३
तुकाराम महाराज आणि शेक्स्पीयर-१
नावात काय आहे ?
सर्व मोठी माणसे एकसारखाच विचार करीत असावेत. भाषा काळ वेगळाले असले तरी मुळात विचार एकसारखे असणे शक्य आहे का ? असा विचार शेक्स्पीयर आणि तुकाराम महाराज यांचे साहित्य वाचून करण्याचे ठरविले, तर खूपच सारखेपणा आढळतो. वानगीदाखल शेक्स्पीयरचे एक प्रसिद्ध वाक्य घेऊ: "नावात काय आहे ? " मुळात हे वाक्य रोमियो-ज्युलियट मध्ये ज्युलियटच्या तोंडी असे येते:"नावात काय आहे ? ज्याला आपण गुलाब म्हणतो ते दुसर्‍या कुठल्याही नावाने तेवढेच गोड, सुवासिक लागेल . ( व्हाट इज इन ए नेम? दॅट विच वि कॉल ए रोज, बाय एनी अदर नेम, वुड स्मेल ऍज स्वीट ! )." ह्याला समविचारी मराठी वाक्प्रचार लोक देतात: नाव सोनुबाई नि हाती कथलाचा वाळा ! म्हणजेच नावात काय आहे ? हाच मतितार्थ. हेच तुकाराम महाराज म्हणतात असे म्हणतात : "तुका म्हणे राजहंस ढोरा नावें । काय तया घ्यावे अळंकाराचे ॥ ( अभंग २००६,जोग प्रत ) ." म्हणजे एखाद्या बैलाचे राजहंस असे नाव ठेवले तर ह्या अलंकारिक नावाचा त्या बैलाला काय उपयोग ? असाच मतितार्थ असणारा अजून एक अभंग आहे : "सावित्रीची विटंबना । रांडपणा करीतसे ॥ काय जाळावे ते नाव । अवघे वाव असे तें ॥ कुबेर नाव मोळी पाहे । कैसी वाहे फजीती ॥ ( १४७७,जोग प्रत ). " नाव सावित्री पण विधवा झाल्यावर त्या नावाची फजीती. नाव कुबेर पण विकतो लाकडाच्या मोळ्या . अशी नावे काय जाळायची ? शेक्स्पीयरच्या अवतीभवतीच्या सुबत्तेमुळे गुलाबासारखे गोड उदाहरण तो घेऊ शकला असेल व जीवनाच्या खडतर धबडग्यामुळे तुकाराम महाराज रोखठोक, पण जमीनीवरचे ( भले ते गोड, आशावादी नसेल ) उदाहरण घेत असतील. पण मुळातला विचार दोघांचाही सारखाच !

अरुण अनंत भालेराव
टेल: ९३२४६८२७९२

३ टिप्पण्या:

  1. समकालीन थोर पुरूषांच्या विचरातील साम्य शोधण्याचा उपक्रम स्तुत्य अहे. अभिनन्दन.
    वसन्त पाण्डव

    उत्तर द्याहटवा
  2. प्रिय वसंत पांडव,
    आपण आवर्जून प्रतिसाद दिलात त्याबद्दल आभार.

    अरूण भालेराव

    उत्तर द्याहटवा