मंगळवार, ७ डिसेंबर, २०१०

तुकयाची नँनो 4

तुक्याची नॅनो----४

४) "न", "ना", "नाही" ची नॅनो :
वर आपण मोजकाम करताना पाहिले की न, ना, नाही हे शब्द सगळ्यात ज्यास्त वेळा ( १७०९,१२४ व २००० वेळा अनुक्रमे ) येतात म्हणून त्यांना तुकारामाची लाडकी नॅनो आपण म्हणू शकतो. शैली मीमांसेत हे त्यांचे खासे वेगळेपण आहे असे म्हणायचे तर आपल्याला सध्याचे कवीही हे शब्द वापरतात का ते बघणे भाग पडते. ह्यासाठी कोणी एक कवी घेण्यापेक्षा मी "दृश्यांतर, स्वातंत्र्यानंतरची मराठी कविता" हे चंद्रकांत पाटील संपादित पुस्तक धुंडाळले. त्यात एकूण ५० कवींच्या १९० कविता आहेत. ( प्रसिद्ध कवी आहेत: विंदा, मुक्तिबोध, सुर्वे, पाडगावकर, आरती प्रभू, सुरेश भट, अरुण कोलटकर, वगैरे ). त्यात "न" हे अक्शर मोजले तर निघाले फक्त ३६ ठिकाणी. एक कविता हा एक अभंगच(चार ते पाच खंडांना मिळून एक अभंग मोजतात) मानला, तर हे प्रमाण भरते अवघे १८ टक्के, तर तुकारामाचे भरते ३६ टक्के.
तुकाराम हे बंडखोर कवी आहेत तसेच ते वृत्ताच्या रचनेबाबत, भक्तिसंप्रदायाबाबत, परंपरा पाळणारेही आहेत. मग वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे ज्ञानेश्वर "न" हा एकेश्वरी शब्द वापरत असत का हे पाहणे योग्य ठरेल असे वाटून सबंध ज्ञानेश्वरी धुंडाळली तर आढळले की, त्यांनी ज्ञानेश्वरीत एकूण १८ अध्यातल्या ८१४४ ओव्यात ११७३ वेळा "न" वापरलेला आहे. ( हे प्रमाण भरते १४.५ टक्के व ते एक प्रकारची परंपराच दाखवते.). मूळ संस्कृतातली भगवदगीता तपासली तर त्यातही हे न चे प्रस्थ हमखास दिसेल कारण त्यातले काही प्रसिद्ध श्लोक पाहिले तर न सर्वत्र दिसते ते असे : न कांक्षे विजयं कृषणं न च राज्यं सुखानि च ।; नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक: ।; न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत: ।; यो न ह्रष्यन्ति न द्वेष्टि न शोचति न काङक्षति ।; न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावक: ॥
न ना ची ही रट, एकप्रकारचा नकारार्थी रेटा आहे का? तर तसे नसावे. कारण कुठल्याही क्रियेच्या व्यापात, करणे जसे असते तितक्याच प्रमाणाने किंवा ज्यास्त, "न करणे" ही असते. वेदांमध्ये जेव्हा देव कसा आहे असे वर्णन करायचे होते तेव्हा "नेति नेति" असेच म्हटले आहे ( म्हणजे न इति न इति, असा नाही असा नाही ! ). पदार्थविज्ञानातसुद्धा ( मॅटर ) पदार्थाखेरीज "न-पदार्थ ( ऍंटी मॅटर ) अशीही कल्पना आहे. उलट न-पदार्थाचे विश्व हे पदार्थी विश्वापेक्षा विशाल आहे म्हणतात. ती कल्पना काही नकारार्थी नाही, तर केवळ योग्य शब्दाअभावी "न-पदार्थ" अशी संबोधिली गेली आहे. "येथे"च्या उलट "तेथे" असे होते, पण "न येथे" म्हणजे काही "तेथे" होत नाही.येथपासून तेथपर्यंत जे विश्व आहे तेच आहे "न येथे"! तसेच, "बोलणे" ह्या विरुद्ध खरे तर क्रियेच्या दृष्टीने "ऐकणे" असे व्हावे. . "न बोलणे " ह्याने बोलण्याशिवाय जे खाणाखुणांचे, ईंटिश्यूनने सांगण्याचे, देहबोलीचे, वातावरणाचे अपार विश्व आहे ते सांगितल्या जाते व ते काही नकारार्थी असत नाही. नुसते असते. वेगळे जरूर असते. कलेच्या क्षेत्रात जे महत्व धूसरपणाचे ( एबस्ट्रॅक्टचे ) आहे, तेच अशा "न"वापरून केलेल्या शब्दांनी साधल्या जाते. म्हणून हे न-पुराण नकारार्थी नाही. उलट अर्थाचा वेगळा पसारा मांडणारे आहे. कदाचित हेच तत्व भाषाशास्त्री "बायनरी ऑपोजिशन" ह्या प्रकरणातून सांगत असावेत. ( जिथे असे सांगण्यात येते की जेव्हा आपण दोन विरुद्ध अर्थी शब्द एकत्र वापरतो तेव्हा वाचकाला त्या दोहोंच्या दरम्यानचे साम्य, विरोध, संबंध, व अर्थ शोधणे भाग पडते.). ........( क्रमश: )
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

शुक्रवार, ३ डिसेंबर, २०१०

तुकयाची नँनो 3

तुकारामाची नॅनो---३

३) काही अल्पाक्षरी उदाहरणे ( नॅनो रचना ) :
अगदी एकच अक्षराचा शब्द करून रचना करणे हे खूपच अवघड काम. ते तुकाराम महाराज विषयाला बाधा न आणता सहजी करतात व त्यावरून त्यांची भाषेची हातोटी दिसून येते. उदाहरणार्थ एक ओळ पहा: मी तें मी तूं तें तूं । ( कुंकुड हे लाडसी ) ॥ ( २१९५ देहू प्रत) . असेच एके ठिकाणी : हें तों नुरे ये रुचि ( ३३४३ देहू प्रत )
दोन अक्षरी शब्दांवर तर त्यांची जाम हुकुमत चालते. इतकी कोणाला गजलच वाटेल अशी ही प्रसिद्ध रचना पहा:
हे चि माझे तप । हे चि माझे दान । हे चि अनुष्ठान । नाम तुझे ॥
हे चि माझे तीर्थ । हे चि माझे व्रत । सत्य सुकृत । नाम तुझे ॥
हा चि माझा धर्म । हे चि माझे कर्म । हा चि नित्यनेम । नाम तुझे ॥
हा चि माझा योग। हा चि माझा यज्ञ । हे चि जपध्यान । नाम तुझे ॥
हे चि माझे ज्ञान । श्रवण मनन । हे चि निध्यासन । नाम तुझे ॥
हा चि कुळाचार । हा चि कुळधर्म । हा चि नित्यनेम । नाम तुझे ॥
हा माझा आचार । हा माझा विचार । हा माझा निर्धार । नाम तुझे ॥
तुका म्हणे दुजे । सांगायासि नाही । नामेविण काही । धनवित्त ॥
ह्याच धर्तीवर दोन अक्षरी शब्दांच्या रचना आहेत : चित्त शुद्ध तरी । शत्रु मित्र होती । व्याघ्र हे न खाती । सर्प तया ॥; गोड तुझे रूप । गोड तुझे नाम । देई मज प्रेम । सर्व काळ ॥; तुका म्हणे काही । न मागे आणिक । तुझे पायी सुख । सर्व आहे ॥; हे चि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥; तसेच : हीन माझी याति । वरी स्तुती केली संती ॥ अंगी वसू पाहे गर्व । माझे हरावया सर्व ॥; याती हीन मति हीन कर्म हीन माझे । तुज मज नाही भेद । केला सहज विनोद ॥; देव ते संत देव ते संत । निमित्य त्या प्रतिमा ॥; तुका म्हणे जया गावा जाणे जया । पुसोनिया तया वाट चाले ॥; शब्द नाही धीर । ज्याची बुद्धी नाही स्थिर ॥; चित्ती नाही आस । त्याचा पांडुरंग दास ॥; तुका म्हणे भाव । शुद्ध बरा सोंग वाव ॥; आम्ही घ्यावे तुझे नाव । तुम्ही आम्हा द्यावे प्रेम ॥; बीज पेरे सेती । मग गाडेवरी वाहाती ॥ वाया गेले ऐसे दिसे । लाभ त्याचे अंगी वसे ॥; ज्याची खरी सेवा । त्याच्या भय काय जीवा ॥; बोले तैसा चाले । तुका म्हणे तो अमोल ॥; नव्हे साच काही कळों आले मना । म्हणोनि वासना आवरली ॥; प्रीती करी सत्ता । बाळा भीती माता पिता ॥; तूं माझा आकार । मी तों तूं च निर्धार ॥; तुज न भें मी कळिकाळा । मज नामाचा जिव्हाळा ॥; मानसाची देव चालवी अहंता । मी चि एक कर्ता म्हणों नये ॥; पुरविली आळी । जे जे केली ते ते काळी ॥.... वगैरे.
अल्पाक्षरात काव्य करणे हे आधुनिक काळातही चलतीचे आहे, असे आरती प्रभू ह्याच्या ह्या कवितेवरून दिसते : लव लव करी पात: डोळं नाही थार्‍याला; एकटक पाहू कसं, लुक लुक तार्‍याला ? चव गेली सारी, जोर नाही वार्‍याला; सुटं सुटं झालं मन: धरू कसं पार्‍याला ? ....किंवा विंदा करंदीकर : तुका म्हणे विल्या । तुझे कर्म थोर । अवघाचि संसार । उभा केला ॥...तुका म्हणे बाबा। त्वा बरे केले । त्याने तडे गेले । संसाराला ॥;
तुकारामाच्या काळात मौखिक परंपरा होती हे आपण लक्षात घेतले तर म्हणताना अल्पाक्षरी शब्दच बरे पडतात हे आपल्याला सहजी पटू शकते, जसे कोणाला "अगं गंगू" असं म्हणण ज्यास्त बरे पडते, "अगं गंगाभागिरथे" पेक्षा ! (क्रमश:)
arunbhalerao67@gmail.com

शनिवार, २७ नोव्हेंबर, २०१०

तुकयाची नँनो 1

तुकारामाची नॅनो !

रचनेतली नॅनो रचना:
नाव जरी "मोठा अभंग" असले तरी रचनेच्या दृष्टीने अभंग हे अक्षरवृत्त तसे अल्पाक्षरीच आहे. कारण प्रत्येक चरणात असावे लागतात फक्त सहा अक्षरे. अशी तीन चरणे व शेवटच्या चरणात चार अक्षरे. प्रथम शेवटचे चरण पाहू. चार अक्षरात दोन शब्द बसवायचे म्हटले तर ते असू शकतात प्रत्येकी दोन अक्षरी किंवा एक तीन अक्षरी व दुसरा एक अक्षरी. त्यात शेवटच्या चरणात एक प्रकारचा पंच किंवा फटका यायला हवा असतो जो दोन अक्षरी शब्दांनीच बहुदा साधला जातो. आता पहिल्या तीन चरणात सहा अक्षरात परत तोच पेच पडतो व मग अल्पाक्षरी शब्दच निवडावे लागतात. उपक्रम.कॉम नावाच्या संकेतस्थळावर देवळेकर ह्यांनी सबंध गाथाच संगणकाद्वारे तपासली तेव्हा त्यांना आढळले की सबंध गाथेत एकदाच वापरलेले शब्द मोजले तर ते भरतात ३० हजार. त्यापैकी २७,४७९ शब्द हे अल्पाक्षरी म्हणजे १ ते ४ अक्षरी आहेत, तर ५ पेक्षा ज्यास्त अक्शरे असलेले शब्द आहेत;२६५३.
आता कोणी नवख्या कवीला जर हे कोडे घातले तर तो साहजिकच म्हणेल अगदी अल्पाक्शरी शब्दच योजावेत. मग एकच अक्षर असलेले शब्द आपल्याला वापरणे सर्वात सोयीस्कर. ( जसे भल्या मोठ्या कादंबरीचे नाव श्रीमती महाजन ठेवतात एकाक्षरी "ब्र", व कदाचित कोणी पुरुष कादंबरीकार लिहील "ब्रा" ! ). असे एकच अक्षर असलेले वापरण्यायोगे व अर्थ असलेले शब्द होतात: उ, ए, ये, का, की, खा, खो, गा, गे, गो, घी, घे, घो, चि ( हे चि ), छे, छू, जा, जे, जो, ठो, तो, ती, दो, न, ना, नि, पी, पै, फू, बा, बी, बे, भे, मा, मी, या, ये, री, रे, वा, शी, हा, ही, हे, हो. आता ह्या शब्दांचा अर्थ होत असला तरी विषयाप्रमाणे व तेही काव्यात वापरण्यासारखे एकाक्षरी शब्द फारच कमी असतात. गाथेतले शब्द मोजायला संगणक जाणण्यार्‍यासाठी कोडच्या कळी आहेत पण मी एक अगदी सोपी युक्ती वापरतो. जसे "फाइंड" वर टिचकी देऊन आपल्याला कुठला शब्द मोजायचा तो खिडकीत लिहायचा व "फाइंड नेक्स्ट" टिचकावायचे की गाथेत तो शब्द कुठे असेल तिथे ब्लॉकमध्ये दिसतो व मग परत "फाइंड नेक्स्ट" व मोजायचे मनात दोन.... असे करत एकाक्षरी शब्द मी मोजले ते निघाले असे : ये--१४९ वेळा, हे--६०६ वेळा, गे--४७ वेळा, रे--४५७ वेळा, या---९५०वेळा, वा--५ वेळा, हा---६०० वेळा, ही---३५० वेळा, हे---५०० वेळा, हो---१५० वेळा, तू---१० वेळा, का--३५ वेळा, की--२ वेळा, खा---२ वेळा, गा---१४३ वेळा, जा---१५ वेळा, जे---१०० वेळा, जो---११५ वेळा, तो---११०० वेळा, चि---१३०० वेळा, ती--२३ वेळा, दो--६ वेळा, पै--१ वेळा, बा---४२ वेळा, भे--२ वेळा, मा-- २ वेळा, मी---४५० वेळा, ए--५ वेळा. खो, शी, उ,घी, घो, छे, छू, पी, ठो, बी, आणि बे, ही-अक्षरे एकही वेळ वापरली नाहीत.
वरील मोजकामात सर्वात ज्यास्त वापरलेला शब्द गवसला : चि ( हे चि दान दे गा देवा---ह्या छोट्या छोट्या शब्दातला चि ) जो भरला ४५८३ अभंगात १३०० वेळा. म्हणजे टक्केवारीत ( अभंग संख्येच्या वर) वापर होतो अवघा : २८ टक्के. पण तुकाराम महाराज हे निष्णात कवी आहेत. ते "न" हा शब्द वापरतात ; १७०९ वेळा, "ना" हा शब्द वापरतात: १२४ वेळा, व "नाही" हा शब्द वापरतात: २००० वेळा ज्यावरून तेच त्यांचे लाडके शब्द आपण म्हणू शकतो. ( कारण हा वापर भरतो ८३ टक्के ). हीच आहे तुकाराम महाराजांची रचनेतली नॅनो रचना ! ( क्रमश: )

मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०१०

मोठे अभंगकार

तुकाराम महाराज हे मोठे अभंगकार !
अभंग हे एक अक्षरवृत्त आहे. त्यात दोन मुख्य प्रकार आहेत. एक मोठा अभंग व दुसरा लहान अभंग.
मोठा अभंग चार चरणांचा असतो, पहिल्या तीन चरणात प्रत्येकी सहा अक्षरे, दुसर्‍या व तिसर्‍या चरणांशेवटी यमक असते. चौथे चरण फक्त चार अक्षरांचे असते. उदाहरण म्हणून प्रसिद्ध मंगलाचरण पहा: सुंदर ते ध्यान । उभे विटेवरी । कर कटेवरी । ठेवूनिया ॥
लहान अभंगात दोन चरण असतात, त्यात साधारणपणे प्रत्येकी आठ आठ अक्षरे असतात. उदाहरण म्हणून पहा: लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥ ज्याचे अंगी मोठेपण । तया यातना कठिण ॥ ( आठ अक्षरांऐवजी कधी नऊ तर कधी दहाही अक्षरे असतात.)
आता स्वत: तुकाराम महाराजांना कोणता अभंग आवडत होता ? जोग प्रतीत एकूण अभंग दिलेत ४१४९ व क्षेपक ( म्हणजे हे तुकारामाचेच आहेत ह्याविषयी संशय आहे असे ) अभंग ४०९. तर प्रथम मोजण्याच्या सोयीसाठी लहान अभंग कोणते आहेत त्यावर खुणा केल्या. हे सोयीचे कसे ? तर फक्त शेवटच्या शब्दांकडे पहायचे. ते यमकांनी शेवट होणारे असतील तर लहान अभंग. जसे : दया , क्षमा, शांती । तेथे देवाची वसती ॥ खुणा करून झाल्यावर त्यांची संख्या मोजली. १ ते १००० ह्या अभंगात लहान अभंग भरले : १५४३ ( खंड, चार किंवा पाच खंडांचा एक अभंग असतो ). आता १००० अभंगात खंड होते ४२३३. म्हणजे लहान अभंगांचे प्रमाण भरते: ३६.४५ टक्के. साहजिकच उरलेले मोठे अभंग मग भरतात : ६३.५४ टक्के. असेच १००१ ते २०००, २००१ ते ३०००, ३००१ ते ४००० व ४००१ ते ४१४९ व क्षेपक ह्यातून मोजले तर मोठया अभंगांचे प्रमाण अनुक्रमे भरले : ६१.११, ७०, ७०.८९, व ७०.७१ टक्के. म्हणजे मोठे अभंग सरासरीने आढळतात : ७० टक्के.
तर तुकाराम महाराज असे आहेत, मोठे अभंगकार !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

सोमवार, २५ ऑक्टोबर, २०१०

ढेकणाचे संगे अमेरिकन डायमंड भंगले

ढेंकणाचे संगे, अमेरिकन डायमंड, भंगले !
तुकाराम महाराज म्हणाले होते, ढेंकणाचे संगे हिरा जो भंगला !
कोणी ह्याची शहानिशा करायला धजत नाही. कारण न जाणो, खरेच जर हिरा ढेंकणाजवळ ठेवल्याने भंगला तर त्याचे पैसे भरावे लागतील. पण खर्‍या हिर्‍यापेक्षा, अमेरिकन डायमंड बरेच स्वस्त असतात. आता त्यावर पडताळा करून पहायला हरकत नव्हती. पण, इतके दिवस हे पडताळणे अवघड होते. कारण अमेरिकेत, अमेरिकन डायमंड आहेत, पण ढेंकूण नसायचे. पण आता अमेरिकेत, न्यू यॉर्कला, नुकत्याच आलेल्या बातमीवरून भरपूर ढेंकूण झाले आहेत.
ढेंकणाचे संगें हिरा जो भंगला । कुसंगें नाडला तैसा साधु ॥१॥ओढाळाच्या संगें सात्विक नासलीं । क्षण एक नाडलीं समागमें ॥ध्रु.॥डांकाचे संगती सोनें हीन जालें । मोल तें तुटलें लक्ष कोडी ॥२॥विषानें पक्वान्नें गोड कडू जालीं । कुसंगानें केली तैसी परी ॥३॥
भावें तुका म्हणे सत्संग हा बरा । कुसंग हा फेरा चौर्‍याशीचा ॥४॥
ह्या मूळ अभंगाचे अमेरिकेला आता चांगलेच प्रत्यय येत आहेत. भारतीय, कोरियन, चिनी, मेक्सिकन वगैरे लोक प्रचंड प्रमाणात गेल्या कित्येक वर्षांपासून स्थलांतरित होत आहेत. इतके की आता तिथे मॉल्स मध्ये मूळचे गोरे लोक फारच कमी दिसतात व काळे, मेक्सिकन, भारतीय, चिनी हेच लोक ज्यास्त दिसतात. आता राहणीमानाच्या दृष्टीने तुलना केली तर आपला त्यांना "कुसंग"च वाटणे साहजिक आहे. पचापच थुंकणे काय, नाकात बोटे घालणे काय, शरीराला दुर्गंधी येणे काय, दात खराब असणे काय, शिवाय एक ना अनेक व्याधी. तरी बरे पूर्वीचे खरूज, नायटे, सर्दीपडसे, खोकला वगैरे आजकाल नाहीयत. आता ह्या कुसंगाचा त्यांना प्रत्यक्ष फटका दिसतोय तो ढेंकणाच्या अमेरिकेत येण्याने.
आताच्या अमेरिकेला जाणार्‍यांना कल्पना नाही, पण पूर्वी ( ३० वर्षांपूर्वी ), अमेरिकेला जायच्या आधी एक पी फॉर्म भरून द्यावा लागायचा. त्यात सरकारी डॉक्टरांकडून तपासून घ्यावे लागे की तुम्हाला कॉलरा, पीतज्वर, टी.बी. वगैरे रोग नाहीत. आता कस्टम्सना नवीन यंत्रे बसवावी लागतील, सामानात, अंगावर, ढेकूण आहेत की नाही ते बघायला. हाच तो कुसंगाचा फेरा असावा !
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

सोमवार, ११ ऑक्टोबर, २०१०

तुकयाची ग्वाही 12

तुक्याची ग्वाही-१२
"मुंगिचिया घरा कोण जाय मूळ । देखोनिया गूळ धाव घाली ॥" ( १६२०, जोग प्रत)
ज्याला आपल्या स्वहिताची चाड, काळजी आहे त्याने आपण होऊन हरीकथेवर लक्ष द्यावे असे म्हणत असताना इथे तुकाराम महाराज व्यवहारातला दाखला देत आहेत तो असा की मुंगीला गूळ आवडतो तर ती आपण होऊन गुळाकडे धाव घेते, कोणी आमंत्रण ( मूळ पाठवणे) देण्याची वाट पहात नाही. तसेच जो दाता आहे त्याला देण्यात आनंद आहे तर त्याने कोणी याचना करण्या आधीच आपण होऊन दान द्यावे. अन्न व पाणी आपल्याला निमंत्रण देण्याअगोदरच आपण ते गिळंकृत करतो. ज्याला काही व्याधी, रोग झाला आहे तो आपण होऊनच वैद्याकडे धाव घेतो. असेच आपले हित हवे असेल तर आपण होऊन आपण हरीकथेकडे धाव घ्यायला हवी. आपल्या हिताचा कळवळा आपल्यालाच सहजतेने यायला हवा तरच तो परिणामकारक होईल, दुसर्‍याने सांगून करून काही उपयोग होत नाही असा हा रोकडा उपदेश आहे.

अरुण अनंत भालेराव
भ्र: ९३२४६८२७९२ arunbhalerao67@gmail.com

सोमवार, ४ ऑक्टोबर, २०१०

तुकयाची ग्वाही 11

तुक्याची ग्वाही-११
"डोळ्यामध्ये जैसे कणु । अणु तेंहि न साहे ॥ तैसे शुद्ध राखा हित । नका चित्त बाटवू ॥" ( १५७७, जोग प्रत )
आपल्या बाळाचा जसा कळवळा असतो तसा स्वहिताचा कळवळा राखावा असे इथे तुकाराम महाराज सांगत आहेत. एक छोटासा कण जरी डोळ्यात गेला तरी तो जसा डोळ्याला खुपतो, सहन होत नाही, तसेच इतर अनेक वासनांना दूर सारून फक्त स्वहिताचाच विचार करावा. इतर वासना चित्ताला जणु बाटवतात, तर त्या डोळ्यातल्या शल्यागत समजून त्या दूर साराव्यात. कुठलाही विचार दीर्घ पल्ल्याचा करायचा असेल तर तो सार रूप करून त्याचा प्रसार करतात तसे आपल्या स्वहिताचे करावे. इथे बीज रूपात साठवण करणे ही बाब फार मोलाचे दर्शन देणारी आहे. धान्याचे बीज चारशे पाचशे वर्षे टिकवलेले आपण जुन्या इजिप्शियन ममीच्या शेजारी सापडलेल्या बीजांवरून जाणतो, तसेच स्वहित हे माणसाने मूळ बीज समजावे.

अरुण अनंत भालेराव
भ्र: ९३२४६८२७९२ arunbhalerao67@gmail.com